लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन आणि तत्पर बनली आहे, मात्र कर्जवसुली ही भौतिक धाटणीने आणि मानवी सहानुभूती राखूनच होण्याची आवश्यकता भासत आहे, असे नमूद करीत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे. यांनी अनेक वित्ततंत्रज्ञान (फिनटेक) कंपन्यांकडून कर्जाच्या वसुलीसाठी वापरात येणाऱ्या चुकीच्या पद्धतीबद्दल सोमवारी येथे नापसंती व्यक्त केली.

डिजिटल पायाभूत सुविधा आल्याने वित्ततंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या पत नसणाऱ्या ग्राहकांना कर्जे देत आहेत, मात्र त्यांच्याकडून वसुलीसाठी आक्रमक पद्धतींचा त्या अवलंब करीत आहेत, असे सांगून स्वामिनाथन म्हणाले की, कर्ज मंजुरी आणि वितरणाची प्रक्रिया ही अधिकाधिक डिजिटल बनली आहे. याचवेळी वसुलीच्या प्रक्रियेसाठी अद्याप माणसांची आवश्यकता भासत आहे आणि अनेक वेळा नैतिक सीमारेषा ओलांडली जाते.

आणखी वाचा-मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांना आवाहन

ग्राहकाचा खासगीपणा जपणे आवश्यक असताना अनेक वेळा त्याचा भंग केला जातो. वसुली करणारे एजंट ग्राहकाची खासगी माहिती आणि त्याच्या संपर्कातील व्यक्ती यांची माहिती घेतात. वसुलीसाठी या माहितीची गैररीत्या वापर करून ग्राहकाला धमकावले जाते. या सर्व प्रकारांमुळे काही ठरावीक वित्ततंत्रज्ञान मंच नव्हे तर संपूर्ण वित्तीय परिसंस्थेची अप्रतिष्ठा होते, असेही स्वामिनाथन यांनी नमूद केले.

‘गैरवर्तनाची जबाबदारीही टाळू नका’

रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या अनेक वित्तीय संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी त्रयस्थ संस्थांचा वापर केला जातो. या त्रयस्थ संस्थांच्या एजंटाकडून चुकीच्या पद्धतीने वसुली व गैरवर्तन झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित वित्तीय संस्थेला टाळता येणार नाही. वसुली एजंटाच्या चुकीसाठी ही वित्तीय संस्थादेखील तेवढीच जबाबदार असेल, असेही स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.