पुणे : भारतीयांकडून गुंतवणूक म्हणून हिऱ्यांकडे पाहिले जात असल्यामुळे नैसर्गिक हिऱ्यांना मागणी आहे. याच कारणामुळे त्यांची तुलना कृत्रिम हिऱ्यांशी होऊ शकणार नाही, ते कधीही नैसर्गिक हिऱ्यांची जागा घेऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांनी येथे केले.

तनिष्कने पुण्यात साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांचा टप्पा ओलांडला असून, त्यातील १ लाख ६३ हजार ४४६ महिलांनी तनिष्ककडून हिरे खरेदी केली आहे. याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात नारायणन बोलत होते. ते म्हणाले की, नैसर्गिक हिऱ्यांना गुंतवणूक मूल्य असते. त्यांची किंमत कमी होत नाही. कृत्रिम हिऱ्यांची स्थिती याउलट आहे. नैसर्गिक हिऱ्यांना ते पर्याय ठरू शकत नाहीत. फॅशन उद्योगात कृत्रिम हिऱ्यांचा वापर वाढू शकतो. मात्र दागिन्यांच्या क्षेत्रात त्याला मर्यादा आहेत. नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांचा व्यवसाय अगदी नगण्य म्हणावा असा आहे.

हेही वाचा >>> Current Account Deficit : चालू खात्यावरील तुटीत वाढ

सोन्याच्या भावातील वाढीबाबत नारायण म्हणाले की, सोन्याच्या भावात सातत्याने वाढ सुरू आहे. त्यामुळे कमी वजनाचे आणि टिकाऊ दागिने बनविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. याचबरोबर देशातील कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये असलेली दागिन्यांची श्रेणी आम्ही सादर करीत असतो. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी सुमारे ४० टक्के ग्राहक जुने सोने देऊन नवीन खरेदी करतात. त्यातून त्यांनाही फायदा होतो आणि सोन्याची आयातही कमी होते.

सध्या ग्राहक ऑनलाइन दागिन्यांची निवड करतात आणि त्यानंतर ते दालनात येऊन तो दागिना पाहून खरेदी करतात. थेट ऑनलाइन दागिने खरेदीचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. आगामी सणासुदीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत चांगली वाढ नोंदविण्यात येईल. – अरुण नारायण, उपाध्यक्ष, तनिष्क