पीटीआय, नवी दिल्ली
भारत ही अभूतपूर्व उत्साही बाजारपेठ असून, तिच्यावर ॲपलचा प्रामुख्याने भर असेल. भारतात कंपनीच्या व्यवसाय़ाने तिमाहीत विक्रमी पातळी गाठली, अशी माहिती ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी शुक्रवारी दिली.ॲपलने भारतात महत्त्वाकांक्षी विस्तार सुरू केला आहे. कंपनीने मुंबई आणि दिल्लीत दोन विक्री केंद्रे नुकतीच सुरू केली. या निमित्ताने कूक हे स्वत: भारताच्या दौऱ्यावरही आले होते. कंपनीच्या आर्थिक निकालाची घोषणा करताना कूक म्हणाले की, भारतात सुरू केलेल्या विक्री केंद्रांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीचा भारतातील व्यवसाय तिमाहीत विक्रमी पातळीवर पोहोचला आणि दरवर्षी व्यवसायात दोन अंकी दराने वाढ होत आहे. त्यामुळे आमच्यासाठी भारत ही एक अभूतपूर्व उत्साही बाजारपेठ आहे.
‘भारतावर आमचे प्रामुख्याने लक्ष असेल. नुकताच मी भारतात जाऊन आलो. तेथील बाजारपेठेतील गतिशीलता आणि चैतन्य हे अविश्वसनीय आहे. ग्राहकांना जास्तीतजास्त सेवा देता याव्यात, यासाठी आम्ही विस्तार करीत आहोत. तीन वर्षापूर्वी ॲपल स्टोअर ऑनलाइन सुरू केले आणि आता मुंबई व दिल्लीत प्रत्येकी एक विक्री दालने सुरू झाली असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे कूक यांनी सांगितले.
चीनप्रमाणे विस्ताराची योजना
ॲपलने १५ वर्षांपूर्वी चीनमध्ये विस्तार केला होता. तिथे कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या भारतात मध्यमवर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या वर्गामुळे कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. कंपनी उत्पादन केंद्र म्हणूनही भारताकडे पाहत आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी स्मार्टफोन बाजारपेठ असल्याचे कूक यांनी नमूद केले.
कंपनीला ९४.८ अब्ज डॉलरचा महसूल
ॲपलने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मार्चअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीला ९४.८ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ३ टक्के घट झाली आहे. विकसनशील बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने व्यवसाय वाढला आहे. यात मेक्सिको, इंडोनेशिया, फिलिपिन्स, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिराती, ब्राझील, मलेशिया आणि भारत यांचा समावेश आहे.