Huge Investment: व्हायब्रंट गुजरातला यंदा बाहेरील कंपन्यांकडून विशेष पाठिंबा मिळाला आहे. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय आणि विदेशी कंपन्यांनी गुजरातमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या अनेक घोषणा केल्यात. अदाणी समूह, टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डीपी वर्ल्डसह अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक प्रस्तावांसाठी ४१,२९९ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्यात. या प्रकल्पांच्या माध्यमातून गुजरातमधील कंपन्यांनी अंदाजे २६.३३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

हरित ऊर्जा क्षेत्रात अनेक मोठे करार

गुजरात सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, व्हायब्रंट गुजरातच्या १० व्या आवृत्तीत हरित ऊर्जा क्षेत्रात अनेक मोठे करार करण्यात आलेत. २०२२ मध्ये कंपन्यांनी गुजरातमध्ये १८.८७ लाख कोटी रुपयांच्या ५७,२४१ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केले होते. २०२१ मध्ये होणारी परिषद कोविड १९ च्या वाईट साथीमुळे रद्द करण्यात आली. अशा प्रकारे गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये एकूण ९८५४० प्रकल्पांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात आणि सुमारे ४५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातमध्ये आली आहे.

हेही वाचाः आता टाटा समूह थेट नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर, ‘ही’ कंपनी खरेदी करणार

परिषदेत ३५०० परदेशी प्रतिनिधी सहभागी झाले होते

व्हायब्रंट गुजरातच्या अधिकृत एक्स हँडलने पोस्ट केले आहे की, सेमीकंडक्टर, ई-मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या तीन दिवसांत ३५०० परदेशी प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ३४ भागीदार देश आणि १६ भागीदार संस्था होत्या. या परिषदेचा उपयोग ईशान्येकडील राज्यांमधील गुंतवणुकीच्या शक्यता दर्शविण्यासाठीही करण्यात आला.

हेही वाचाः Nifty At All time High: निफ्टीनं रचला तेजीचा नवा विक्रम, ऐतिहासिक उच्चांक गाठला, आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले

या कार्यक्रमात देश-विदेशातील प्रसिद्ध उद्योगपतींनीही सहभाग घेतला

यंदा झालेल्या कार्यक्रमात तोशिहिरो सुझुकी, लक्ष्य मित्तल, मुकेश अंबानी, संजय मेहरोत्रा, गौतम अदाणी, जेफ्री चुन, एन चंद्रशेखरन, सुलतान अहमद बिन सुलेम, शंकर त्रिवेदी आणि निखिल कामत इत्यादींनी भाग घेतला. पंतप्रधान मोदींनी बुधवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाहदेखील सहभागी झाले होते.

Story img Loader