डॉ. आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्वदीचे दशक सुरेल संगीतासाठी ओळखले जाते, तसेच ते कदाचित भांडवली बाजारातील घोटाळ्यांसाठीदेखील ओळखले जाते. मध्यमवर्गीय विशेषतः मराठी माणूस भांडवली बाजारापासून दूर राहिला याचे हेच कारण असावे. कित्येक जणांनी आपली स्वकष्टाची कमाई इथे फसवणुकीतून गमावली असावी. याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंडामधील सीआरबी घोटाळा. सीआरबी म्हणजे चेन रूप भन्साळी आणि त्याची ही कंपनी.

राजस्थानातील सूरजगढ येथून पुढे कोलकात्यामध्ये आपले सनदी लेखापालचे शिक्षण पूर्ण करून भन्साळी मुंबईत आला. कोलकात्यामध्येसुद्धा काही उद्योग करण्याचे त्याचे प्रयत्न फसल्यानंतर त्याने मुंबईची वाट धरली होती. मधल्या काळात त्याने दिल्लीमध्ये काही कंपन्यांच्या नोंदणीकरणाचे काम करण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्याला फसवणुकीच्या आरोपाखाली काढून टाकण्यात आले. भन्साळी चांगला शिकला म्हणजे कंपनी सेक्रेटरी आणि पीएचडीचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला होता. तो व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचादेखील. पण तरीही काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासात स्वतःसोबत इतरांनादेखील फसवले. त्याची एक सीआरबी नावाची सल्लागार कंपनी होती तिचे नाव बदलून त्याने सीआरबी कॅपिटल मार्केट असे करून घेतले आणि १९९४ मध्ये सीआरबी म्युच्युअल फंडची सुरुवात केली. सीआरबीला बँकेतर वित्तीय संस्थेचा (एनबीएफसी) दर्जा प्राप्त असल्यामुळे लोकांकडून ठेवी गोळा करणे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात व्याज देणे असे त्याने सुरू केले.

हेही वाचा >>>ह्युंडाईची भारतात ‘महा-आयपीओ’ची तयारी; गुंतवणूकदारांकडून तब्बल २५ हजार कोटी उभारण्याचे लक्ष्य

हे पैसे अर्थातच भांडवली बाजारात तो गुंतवायचा. नवीन ग्राहकाकडून पैसे आल्यानंतर जुन्यांचे व्याज तो फेडत असे, पण जुन्या ठेवीदारांना हे माहीत नव्हते की, हे पैसे नवीन ठेवीदारांकडून येत आहेत. त्यामुळे सीआरबीची चांगली प्रगती होत होती. पॉन्झी स्कीम हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता, पण त्याचा उगम मात्र सीआरबीने केला असेच म्हणावे लागेल. सीआरबी कंपनी तसे इतर कायदेशीर कामसुद्धा करत होती, जसे स्टॉक ब्रोकिंग, फॉरेक्स, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार वगैरे. भन्साळीचे आपल्या गुंतवणूकदारांबरोबर चांगले संबंध होते. तसेच राजकारणी आणि धार्मिक नेत्यांना तो जवळचा होता. मग सीआरबीने ”अरिहंत मंगल ग्रोथ स्कीम” नावाची योजना सुरू केली ज्यात लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. म्युच्युअल फंडातील पैसे तो स्वतःच्याच कंपन्यांमध्ये गुंतवायचा आणि त्यामुळे त्याच्या कंपन्यांचे भावदेखील तेजीत होते. त्याच्या सगळ्या कंपनांच्या एएए मानांकन प्राप्त होते, त्यामुळे गुंतवणूकदार निश्चिंत होते आणि त्यांना व्याजाचे पैसे वेळेत मिळायचे. वर्ष १९९२ ते १९९५ पर्यंत सगळे सुरळीत चालले होते. रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळवायचा यासाठी त्याचे मोठे प्रयत्न सुरू होते आणि भुवनेश्वर येथे त्याने एक शाखा उघडण्याची तत्त्वतः मान्यता मिळवली होती. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महाशयांनी जे घोटाळे केले ते बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्याची माहिती आपण पुढील भागात घेऊया.

@AshishThatte ashishpthatte@gmail.com लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crb scam in mutual funds print eco news amy
Show comments