भारतीय भांडवल बाजार समृद्ध करण्यात अनेक व्यक्तींचे योगदान आहे. आशीषकुमार चौहान यांना डेरिव्हेटिव्ह्जचा जन्मदाता असे म्हणणे काहींना रुचेल न रुचेल. अर्थातच ही संकल्पना बाजारात रुजवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले हेही सांगावेच लागेल. त्यापैकी डॉ. आर. एच. पाटील यांच्यावर या स्तंभातून (अर्थवृत्तान्त, १४ ऑगस्ट २०२३) याआधी लिहिले आहेच. नवी संकल्पना बाजारात आणण्याआधी जुनी संकल्पना बाजारात काय होती? सध्या बाजारात असणाऱ्या गुंतवणूकदारांना याची माहिती नसावी. त्यामुळे त्या पद्धतीचे फायदे-तोटे काय होते यावर आता अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा थोडक्यात त्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करायला हवे.

बाजारात तेजी-मंदी करणाऱ्यांसाठी ‘बदला’ ही संकल्पना होती. त्यात पुन्हा सीधा बदला, उंधा बदला या संकल्पना फार महत्त्वाच्या होत्या. या संकल्पनेचा उल्लेख धीरूभाई अंबानी यांच्यावर लिहिलेल्या स्तंभात (अर्थवृत्तान्त, २० फेब्रुवारी २०२३) केलेला आहे. शेअर बाजाराची गुंतवणूक याकडेसुद्धा व्याज कमावणे या हेतूने हे ‘बदला’ प्रकरण चालायचे. समजा एखाद्या सटोडियाला एखाद्या शेअरमध्ये तेजी करायची आहे. परंतु त्याच्याकडे पैसे नाहीत. परंतु तरी तो दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे उसने घेऊन सट्टा खेळायचा. पैसे उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीला व्याज कमावता यायचे. मग याच्या उलट मंदी करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा उंधा बदला स्वरूपात व्याज कमावता यायचे. बाजारातले व्याजदर तेजी-मंदीचे गणित ठरविण्यात मदत करायचे आणि त्यात पुन्हा पद्धतच अशी होती की, मंदी करणारा जास्त पैसा कमवायचा. जगाच्या बाजारात कोणत्याही देशात ही संकल्पना नव्हती. त्या अर्थाने ही संकल्पना संपूर्ण देशी होती.

हेही वाचा >>>माझा पोर्टफोलियो – लहानग्यांच्या ‘एंजल’ची दिगंत कीर्ती

भारतीय शेअर बाजार जेव्हा जगाच्या बाजाराशी जोडला गेला. तेव्हा जगाच्या बाजारात मात्र जी बाजार खेळण्याची साधने उपलब्ध होती ती वेगळीच होती हे लक्षात आले. ती भारतीय बाजारात उपलब्ध व्हावीत यासाठी परदेशी गुंतवणूक संस्थांनी दबावतंत्र आणण्यास सुरुवात केली. परंतु भारतीय शेअर बाजाराशी संबंधित मग त्यात फक्त सटोडियेच नव्हे, तर बाजाराचे पदाधिकारीसुद्धा डेरिव्हेटिव्ह्जच्या विरोधात होते. अशा वेळेस अजय शहा, सुझॅन थॉमस यांनी बदला पद्धतीपेक्षा डेरिव्हेटिव्ह्ज या संकल्पनेविषयी लिखाण करण्यास सुरुवात केली. स्तंभ लेखकाचा या सर्व घटना आणि सर्व व्यक्ती यांच्याशी संबध आलेला आहे. बाजूचे विरोधी अशी सर्व त्या वेळचे घडलेले नाट्य हे आपल्या डोळ्यांनी बघता आले आणि म्हणून आज आशीषकुमार चौहान यांच्याविषयी लिहिताना डेरिव्हेटिव्ह्जचा जन्मदाता असा मथळा वापरलेला आहे.

सध्या आशीषकुमार चौहान हे राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विक्रम लिमये यांच्यानंतर त्यांनी कार्यभार स्वीकारला. १९८५ ते १९८९ या चार वर्षांत मुंबईच्या आयआयटीमधून त्यांनी मॅकेनिकल इंजिनीअर ही पदवी मिळवली. १९८९ ते १९९१ कोलकाताच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण केला. १६ मार्च १९६७ ला अहमदाबाद येथे जन्माला आलेल्या चौहान यांनी १९९१ ला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून आयडीबीआय ऑफिसर म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९९३ ला ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला रुजू झाले. पुढे १९९३ ते २००० एनएसईची सुरुवात, नंतर एनएससीसीएल स्थापन करणे, एनएसडीएल स्थापन करणे अशा महत्त्वाच्या कामांत त्यांचे योगदान राहिले. एनएसई सोडून ते २००१ ला रिलायन्स इन्फो कॉमकडे आले. २००४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी झाले, तर २००५ ला उद्योग समूहाचे सीआयओ झाले. रिलायन्सने स्थापन केलेल्या मुंबई इंडियन्स संघाचेसुद्धा ते सीईओ झाले आणि या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. परंतु त्यानंतर २००९ ला ते मुंबई शेअर बाजाराकडे आले. अगोदर डेप्युटी सीईओ, २०१२ ला सीईओ या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मुंबई शेअर बाजारासाठीसुद्धा अनेक महत्त्वाची कामे केली. या सर्वाचा अतिशय धावता उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे एसएमई प्लॅटफॉर्मची निर्मिती, ओएफएस, २०१३ मध्ये म्युच्युअल फंड वितरणासाठी स्टार एमएफची निर्मिती (२०१८ ला ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंड बाजारपेठेत याचा ७० टक्के हिस्सा होता). अभिमान वाटावा अशी कामगिरी म्हणजे त्यांच्या कारकीर्दीत एकूण २७५ एसएमई कंपन्यांची बाजारात नोंदणी झाली. त्यापैकी ५४ कंपन्यांचे शेअर्स मुख्य बाजारमंचावर प्रमोट झाले. जानेवारी २०१७ ला इंडिया आयएनएक्स यांची त्यांनी सुरुवात केली. तर २०१७ ला बीएसई लिमिटेडच्या ‘आयपीओ’चे काम १० वर्षे रखडलेले होते ते त्यांनी पूर्ण करून दाखविले. त्या वेळेस बीएसई शेअर्ससाठी ५१ पट जास्त मागणी आली होती.

हेही वाचा >>>बाजारातली माणसं : वर्तमानात भविष्याची वाट दाखवणारा – ख्रिस्तोफर वुड

चौहान २०२२ मध्ये परत एनएसईकडे आले. त्यांच्या आणखी जबाबदाऱ्यांबद्दल बरेच काही लिहिता येईल. परंतु सर्वात मोठी कामगिरी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार दोन्ही बाजारांनी डेरिव्हेटिव्ह्ज ही संकल्पना यशस्वी करून दाखविली.

मुंबईच्या एका कार्यक्रमात त्यांच्याकडे मागणी केली होती. मुंबई शेअर बाजार भगवद् गीतेच्या १८ अध्यायांसारखे १८ व्हॉल्यूम प्रसिद्ध करून दर आठवड्याला नवीन आकडेवारी एका क्षेत्राच्या दोन-चार कंपन्यांची अशा प्रकारे वर्षभरात १८ व्हॉल्यूम्सचे रूंपातर नव्याने केले जायचे. हे पुन्हा सुरू करावे या मागणीला त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते प्रचंड खर्चाचे काम झाले होते. बाजारात माहिती उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान विकसित झाले होते. आता भ्रमणध्वनीवर एखाद्या कंपनीची माहिती उपलब्ध होते, असे त्यांचे म्हणणे.

ज्या चौहान यांनी भारतात शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह्जची सुरुवात केली. त्यांनी एका व्यासपीठावरून छोट्या गुंतवणूकदारांनी डेरिव्हेटिव्ह्जच्या नादी लागू नये, असा इशारा दिला. अर्थातच हा इशारा गुंतवणूकदारांच्या हितासाठी होता. कारण मुळात डेरिव्हेटिव्ह्ज हे हत्यार छोट्या गुंतवणूकदारांच्या हातात असणे अयोग्य आहे. हा खेळ मोठ्या गुंतवणूकदार संस्था, परदेशी गुंतवणूक संस्था यांचा आहे. परंतु कोणीही किती सल्ले दिले तरी कमी पैशात झटपट मोठे होण्याची इच्छा असलेले परंतु डेरिव्हेटिव्ह्जचा अभ्यास नसलेले खेळणारच. काही जण कमावणार तर काही गमावणार हे निश्चित. मात्र म्युच्युअल फंड हेसुद्धा डेरिव्हेटिव्ह्जच्या प्रकारातले आहेत. मात्र त्यात कमी जोखीम आहे. त्यामुळे चौहान यांनी एक गोष्ट करावी ज्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. डेरिव्हेटिव्ह्ज हा विषय समजतो किंवा ते शास्त्र शिकून परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे. अशाच व्यक्तींना व्यवहार करण्याची मुभा असावी.