कौस्तुभ जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विलग झालेला तिचा वित्तीय उपक्रम जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे भांडवली बाजारात पदार्पण झाले. त्यासाठी २० जुलै रोजी विशेष सत्र आयोजित करून त्याची किंमत निश्चित करण्यात आली होती. भांडवली बाजारात सुचिबद्ध झाल्यापासून सलग चार सत्रात कंपनीच्या समभागात एकूण २० टक्क्यांची घसरण झाली आणि शुक्रवारच्या सत्रात प्रथमच सकारात्मक पातळीवर स्थिरावला. मात्र यानिमित्ताने वित्तीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त करत असलेल्या एनबीएफसी अर्थात बँकेतर वित्तीय क्षेत्र बहरते आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७५ वर्षात देशातील बहुसंख्य लोकसंख्येचा बँकिंग क्षेत्राशी जवळून संबंध येणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर बँकेतर वित्तीय क्षेत्र विस्तारत जाणे ही नव्या आर्थिक समीकरणांची पहाटच ठरणार आहे. बाजारात वित्त क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा अजूनही दबदबा आहे. त्याचबरोबर उदारीकरणानंतर जन्माला आलेल्या आणि मोठ्या होत चाललेल्या खासगी क्षेत्रातील बँका सुद्धा आहेत. याच बरोबरीने आता खांद्याला खांदा लावून बँकेतर वित्तीय कंपन्या उभ्या राहत आहेत. बजाज फायनान्स लिमिटेड, चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स, श्रीराम फायनान्स, सुंदरम फायनान्स, महिंद्र फायनान्शियल सर्व्हिसेस, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट या कंपन्यांनी आपला ठसा बाजारपेठेत उमटवायला सुरुवात केली आहे. भारतातील या क्षेत्राच्या विस्तारासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे कारणीभूत ठरले आहेत. त्यातील पहिला म्हणजे भारतातील डिजिटल क्रांती आणि दुसरा एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेची निमशहरी आणि ग्रामीण भागात होत असलेली वाढ आहे.

आणखी वाचा-‘या’ IPO मध्ये बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांची लागली रांग, तो उघडताच १०० टक्के प्रतिसाद

पूर्वी वित्त क्षेत्रात तंत्रज्ञान नसल्यामुळे किंवा तंत्रज्ञानाचा वापर अल्प प्रमाणात होत असल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. गेल्या काही वर्षात गुंतवणूक करणे, आपल्या व्यावसायिक आणि खासगी गरजांसाठी कर्ज घेणे अगदी मोबाईलवर देखील शक्य झाले आहे. करोना टाळेबंदीच्या काळात लोकांनी भांडवली बाजारात पैसे गुंतवायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. अक्षरश: लाखो डिमॅट खाती उघडले गेली. अँड्रॉइडसारख्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ‘अॅप’द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. ही भरारी बँकेतर वित्तीय क्षेत्राच्या देखील पथ्यावर पडली.

याच क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘बजाज फायनान्स’ या कंपनीचा विचार केल्यास गेल्या पंधरा वर्षापासून या कंपनीने एकूण २२ प्रकारची उत्पादने आणि त्याच्या एकूण ४६ प्रकारच्या उपसेवा उत्पादनांमध्ये व्यवसाय करून दाखवला आहे. किरकोळ बाजार, सूक्ष्म- लघु आणि मध्यम उद्योजक अशा थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ६ कोटी ग्राहकांपर्यंत कंपनी पोहोचली आहे. देशभरातील साडेतीन हजारपेक्षा जास्त ठिकाणाहून बजाज फायनान्स कंपनीची उत्पादने विकत घेतली जाऊ शकतात. त्याच बरोबर दीड लाखांहून अधिक व्यवसाय-विक्रेते कंपनीशी संलग्न आहेत. या कंपनीचे ४० हजार स्वतःचे कर्मचारी असणे हेच बँकेतर वित्त व्यवसाय भारतात स्थिरावत असल्याचे लक्षण आहे, असे म्हणता येईल.

आणखी वाचा-जिओ फायनान्शिअलचा शेअर २६५ रुपयांवर लिस्ट; गुंतवणूकदारांना किती फायदा?

ग्राहक उपयोगी वस्तूंची कर्ज, वैयक्तिक कर्ज, ग्रामीण भागातील कृषी आणि अन्य कर्ज पुरवठा, शेअर तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज देणे, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा असा सेवा देत कंपनीने मोठा विस्तार साधला आहे. मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ११,५०८ कोटी रुपयांचा नफा मिळविला. गेल्या वर्षभरात कंपनीने १.१ कोटी नवीन ग्राहक जोडले. याचबरोबर उल्लेखनीय आकडेवारी डिजिटल माध्यमातून मिळालेल्या ग्राहकांची आहे. कंपनीने ३.५ कोटी ग्राहक डिजिटल माध्यमातून जोडले. इ
‘ईएमआय कार्ड’च्या माध्यमातून कंपनीने ४.२ कोटी ग्राहक जोडले आहेत. या कंपनीची सुरुवात सुमारे ३५ वर्षांपूर्वी बजाज ऑटो या दुचाकी विकणाऱ्या कंपनीच्या वाहन कर्जाच्या पूर्ततेसाठी झाली होती हे समजून घ्यायला हवे. जिथे बँका पोहोचू शकत नाहीत, ज्या ग्राहकांना बँकांच्या नियमानुसार आणि निकषानुसार कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात अशा ग्राहकांना बँकेतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जपुरवठा होऊ शकतो.

या कंपन्यांपुढील महत्त्वाचा आव्हानाचा भाग म्हणजे आपल्या व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असणारी ठेवींची गरज. बँकांचे जाळे दूरवर पोहोचलेले असल्याने त्यांना मुदत ठेवींच्या माध्यमातून सतत पैशाचा पुरवठा होत असतो, या पार्श्वभूमीवर बॅंकेतर वित्त कंपन्या मागे पडतात हे निश्चितच. याच क्षेत्रातील ‘चोलामंडलम’ या कंपनीने व्यावसायिक वाहतुकीसाठी असलेली वाहने, वैयक्तिक वापराच्या गाड्या, बांधकामासाठी लागणारी यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी कर्ज, दुचाकी कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, तीन चाकी पिकप वाहने यांच्यासाठीचे कर्ज, मालमत्ता तारण ठेवून मिळणारे कर्ज, गृह कर्ज याचबरोबर शेअर खरेदी-विक्रीसाठी चोला सिक्युरिटीज, गाडी बाजार म्हणजेच वापरलेल्या गाड्या विकण्यासाठी असलेले संकेतस्थळ असा व्यवसाय विस्तारला आहे. या कंपनीच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) एक लाख कोटींच्या घरात आहे. कंपनीने ‘एनसीडी’च्या माध्यमातून निधी देखील उभारला आहे. या कंपनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील २९ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशात कंपनीचा व्यवसाय सुरू असला तरीही ८० टक्के व्यवसाय हा शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात केंद्रित आहे.

आणखी वाचा-बाजाररंग : डिजिटल बदलासाठी धोरणात्मक वाटचाल

जसजशी अर्थव्यवस्था वाढेल तसे या क्षेत्राला चांगले दिवस येतील यात शंका नाही. एकच मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ‘जिओ फायनान्शिअलच्या’ आगमनानंतर कंपन्यातील व्यवसाय स्पर्धा खूपच वाढणार आहे. याचा फायदा व्यवसाय करणारे आणि ग्राहक या दोघांना होतो का? तसेच या व्यवसाय स्पर्धेमध्ये किती कंपन्या टिकून राहतात हे बघणे महत्वाचे ठरेल.

** सदर लेखात नामोल्लेख असलेल्या कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी अशी शिफारस करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदारांनी स्वतः कंपन्यांचा अभ्यास करून गुंतवणूक जोखीम समजून घेऊन, गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.

लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत

joshikd28@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emergence of non banking financial institutions print eco news mrj
Show comments