मागच्या आठवड्यातील लेखांमधून आपण भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा आजवरचा प्रवास कसा झाला आणि आगामी काळात त्यात कोणते बदल संभवतात याचा आढावा घेतला. आजच्या लेखातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी कसे लाभदायक ठरले आहे आणि भविष्यात त्यासंबंधी कोणत्या शक्यता आहेत याचा आढावा घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निफ्टी आयटी इंडेक्समध्ये कोफोर्ज, एचसीएल टेक्नॉलॉजी, एमफसीस, एल टी टेक्नोलॉजी, एल टीआय माइंडट्री, इन्फोसिस, पर्सिस्टंट, टाटा कन्सल्टन्सी, टेक महिंद्र आणि विप्रो या दहा कंपन्यांचा समावेश होतो. या सगळ्याच दहा कंपन्यांच्या मागच्या तीन वर्षाच्या निकालांचा अभ्यास केल्यास गुंतवणूकदारांसाठी कमी जोखीम असलेले क्षेत्र म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र का ओळखले जाते याचा आपल्याला अंदाज येईल. या क्षेत्रातील कंपन्यांचे खर्च भांडवली स्वरूपाचे नसून कर्मचारी आणि मनुष्यबळावरील असतात. यामुळे कंपन्यांना कारखाने उभारणे, यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञान यांची सतत खरेदी करणे असे खर्च कमी असतात. सरकारी पाठबळावर उभ्या राहिलेल्या आयटी पार्कमध्ये व्यवसाय सुरू करणे सोपे आहे. व्यवसायासाठी लागणारे हार्डवेअर- नेटवर्किंग आणि तत्सम यंत्रसामग्री वगळता कंपन्यांना मिळणाऱ्या नफ्याच्या तुलनेत खर्च कमीच असतो. कंपन्यांच्या अभ्यासामध्ये कंपनी ‘कर्जमुक्त’ (Debt Company) असणे हा महत्त्वाचा निकष मानला जातो आणि भारतातील आयटी कंपन्यासुद्धा याला अपवाद नाहीत. कर्जाचा डोलारा नसणे आणि हातात खेळता पैसा असणे या दोन्हीमुळे जोखीम आणि परतावा या सूत्रामध्ये आयटी कंपन्या चपखल बसतात. परिणामी, आयटी क्षेत्रातील सर्वच कंपन्या गुंतवणूकदारांना लाभांशाच्या स्वरूपात घसघशीत पैसे देतात. सरकारने लाभांशातून मिळणारी रक्कम कराच्या जाळ्यात आणल्यामुळे गेल्या काही वर्षांत आयटी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेमुळे गुंतवणूकदारांना घसघशीत लाभ झाला आहे.

हेही वाचा – Money Mantra: क्रेडिट कार्डाचे किती प्रकार असतात?

बायबॅक आणि लाभाचे गणित

मागच्या पाच वर्षांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा विचार केल्यास टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो या तीन कंपन्यांनी दीड ते दोन वर्षांच्या अंतराने सतत गुंतवणूकदारांसाठी बायबॅक योजना आणली. इन्फोसिस कंपनीने २०१७ या वर्षात (१३,००० कोटी) २०१९ या वर्षात (८,२६० कोटी) आणि २०२१ मध्ये (९,२०० कोटी) अशा बायबॅक योजना आणल्या. साधारणपणे त्या वेळच्या बाजारातील शेअरच्या किमतीच्या २० ते २५ टक्के अधिमूल्य गुंतवणूकदारांना बायबॅक योजनांच्या माध्यमातून देण्यात आली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने २०१७ या वर्षात पहिल्यांदा १६,००० कोटी रुपयांची बायबॅक योजना आणली. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा १६,००० रुपयांची योजना, वर्ष २०२० मध्ये १६,००० कोटी आणि वर्ष २०२२ मध्ये १८,००० कोटी रुपयांच्या अशा सलग बायबॅक योजनांमुळे गुंतवणूकदारांना भरभरून फायदा झाला आहे.

कृत्रिम प्रज्ञा आणि भारतीय आयटी कंपन्या

कृत्रिम प्रज्ञा हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी सर्वात महत्त्वाचा शब्द ठरणार आहे. इन्फोसिसच्या कोबाल्ट क्लाऊड सेवेद्वारे भविष्यातील नवनवीन व्यवसायांमध्ये कंपनीचे स्थान बळकट होणार आहे. इन्फोसिसचा विचार करायचा झाल्यास १०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त व्यवसाय मिळवून देणारे ४० क्लायंट, अडीच अब्ज डॉलरचा गंगाजळीचा साठा यामुळे नफ्याच्या बाजूने कंपनी भक्कम आहे. वर्ष २०२० पासून सलग चार वर्षे गुंतवणूकदारांना वाढता लाभांश देणे आयटी कंपन्यांना शक्य झाले आहे ते स्वतःला अद्ययावत ठेवल्यामुळेच.

कृत्रिम प्रज्ञा यासंदर्भात जनरेटिव्ह एआय, नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी एआय, महाकाय स्तरावर व्यवसाय करणाऱ्यांसाठी एआय अशा अनेक नवीन व्यवसाय संधी उदयास येत आहेत. मनोरंजन, दूरसंचार, उत्पादन, बँकिंग, वित्त संस्था, विमा या सर्वच क्षेत्रात व्यवसायाचे स्वरूप बदलते राहणार आहे. डिजिटल युगात प्रत्येक कंपनीला आवश्यक असतो तो विदा म्हणजेच डेटा. या क्षेत्रात भारतीय आयटी कंपन्यांचे काम येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. भारतातील वाढते बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र त्याचप्रमाणे वाढता ग्राहक वर्ग यामुळे देशांतर्गत संधीही उपलब्ध होत आहेत. अर्थातच भारतातील आयटी उद्योगाची उलाढाल आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा अत्यंत लहान आहे हेही तितकेच खरे.

व्यावसायिक जोखीम

प्रगत देशातील अर्थव्यवस्थांचा वाढीचा दर आणि भारतीय आयटी कंपन्यांचा व्यवसाय यांच्या व्यावसायिक जोखमीत थेट सहसंबंध आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोप या बाजारपेठेतील मंदी हे भारतीय आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायासंबंधी असलेले सर्वात मोठे दुखणे आहे. भारतातील आयटी कंपन्यांचा मोठा वाटा अमेरिकेतील व्यवसायामधून येतो व हा जोखमीच्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मात्र गेल्या दहा वर्षांत आयटी कंपन्यांनी आपला व्यवसाय युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आग्नेय आशिया या ठिकाणी विस्तारायला सुरुवात केली आहे. लार्सन अँड टुब्रो या महाकाय कंपनीचा भाग असलेल्या एलटीआय माइंडट्री या कंपनीचे सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, चीन, मलेशिया, जपान, फिलिपाइन्स, हाँगकाँग, थायलंड आणि न्यूझीलंड या ठिकाणी व्यवसाय कार्यरत आहेत.

हेही वाचा – Money Mantra: बजेट आणि आठवड्याचे बाजार गणित

गुंतवणूक संधी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व दहा कंपन्यांचा गुंतवणूकदारांनी एकत्र विचार करणे शक्य नाही. आपल्या एकूण पोर्टफोलिओची मर्यादा आणि किती पैसे गुंतवता येतील? या रकमेची मर्यादा यामुळे निवडक दोन ते तीन कंपन्यांचे शेअर विकत घेणे हा एक पर्याय असतो आणि दुसरा पर्याय निफ्टी आयटी ईटीएफ (Exchange Traded Fund) या माध्यमातून या क्षेत्राच्या गुंतवणुकीचा लाभ घेणे हा आहे. ज्यांना दर महिन्याला नियमितपणे गुंतवणूक करायची इच्छा आहे त्यांनी म्युच्युअल फंडातील सेक्टरल प्रकारच्या आयटी फंडांचा विचार करायला हरकत नाही. गेल्या पाच वर्षांत या फंडांनी सरस कामगिरी बजावली आहे. अर्थातच हे सेक्टरल प्रकारचे असल्यामुळे एकूण पोर्टफोलिओच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक एकाच क्षेत्रात असता कामा नये हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवे.

काही निवडक फंड योजनाचे पाच वर्षे गुंतवणूक कालावधीसाठीचे परतावे.

· आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड २५.२९%

· एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड २४.६० %

· फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड २३.९७%

· टाटा डिजिटल इंडिया फंड २३%


लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत.

joshikd282@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It industry new business and investment opportunities mmdc ssb
Show comments