बँकिंग, विमा व भांडवली बाजार सेवा या तीन प्रमुख वित्तीय सेवा आहेत. बँकिंग आणि भांडवली बाजार सेवा याबद्दल ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर माहिती आहे. तथापि, त्यांच्या तुलनेत भारतात विम्याचा फारसा प्रसार झालेला दिसत नाही. याची अनेक कारणे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात लोकांची बचत करण्याची क्षमता कमी आहे. त्यातही साठवलेले पैसे रोटी, कपडा व घर घेण्यात, तसेच मुलाबाळांच्या लग्नकार्यात खर्च होतात. अशात विम्याची बाजू दुर्लक्षित राहते. विम्याविषयी वाटणारा अविश्वास हेही एक प्रबळ कारण यामागे आहे. काही विमा एजंट लोकांच्या जरुरीपेक्षा त्यांना जास्त कमिशन देणाऱ्या पॉलिसिज विकतात हेही एक कारण आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात विम्याविषयी अविश्वासाची भावना निर्माण झालेली असते. तसेच काही लोकांच्या मनात एक चुकीची भावना असते की, आपण विमा फक्त कष्टाने कमावलेल्या पैशाने घेतो; पण परतावा त्या मानाने काहीच मिळत नाही. परिणामी, इतर देशांच्या तुलनेत भारतात विमा पेनिट्रेशन म्हणजेच विम्याचा प्रसार कमी झाला आहे.

हेही वाचा… Money Mantra: विवाहितांचे विमा नियोजन कसे असावे? (पूर्वार्ध)

विमा जागरूकतेचा अभाव हाही देशभरात विम्याचा प्रसार होण्यातील एक अडथळा असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकांना विम्याची गरज आणि उपयोगिता समजावून देणे आवश्यक आहे. याचसाठी राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस दरवर्षी २८ जून रोजी साजरा केला जातो. भारतीय विमा क्षेत्राविषयी माहिती देणे आणि विविध विमा योजनांत गुंतवणूक करण्यामुळे होणाऱ्या अनेक फायद्यांबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा आपण तरुण, निरोगी असतो तेव्हा आपण अनेकदा विसरून जातो की, जीवनात किती अनिश्चितता असणाऱ्या बाबी असू शकतात.

पण, आपण आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेहमी सज्ज असायला हवे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भरपूर आर्थिक मदतीची गरज भासत असते. आरोग्य आणि जीवन विमा या सर्वाधिक महत्त्वपूर्ण योजना आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती नुकसान भरून काढू शकतात आणि अचानक उदभवणारा मृत्यू किंवा आजारपणात त्यांच्या प्रियजनांचे संरक्षण करू शकतात.

हेही वाचा… EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; आज शेवटच्या दिवशीच निर्णय घेण्याची संधी

याव्यतिरिक्त दुखापत, अपघात किंवा व्यवसायातील नुकसान यांसारख्या दुर्दैवी घटनांच्या बाबतीत विविध विमा योजना आर्थिक संरक्षण प्रदान करतात. लाइफ इन्शुरन्स आणि पेन्शन प्लान्सचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला वर्तमानात कमावलेले पैसे वाचवण्यात आणि भविष्यासाठी ते उपलब्ध करण्यात मदत करतात. राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस म्हणजे सर्व लहान अथवा मोठ्या व्यावसायिकांना त्यांच्या विमा योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी त्यांच्या संस्थांकरिता योग्य कव्हरेज असल्याची खात्री देणारे एक स्मरणपत्र आहे. व्यावसायिकांसाठी विमा योजना हा त्यांच्या व्यवसायातील जोखीम हस्तांतरित करण्याचा आणि त्यांचे कर्मचारी, मालमत्ता, वस्तू व साहित्य सामग्री संरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. योग्य विमा हा चोरी किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे व्यवसायाला होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यामध्ये मदत करू शकतो.

विम्याद्वारे डेटा चोरी आणि सायबर हल्ल्यांसारख्या समस्यांपासूनही व्यवसायांचे संरक्षण करता येते. लोकांच्या विम्याच्या गरजा भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात. विमा योजना निवडण्यापूर्वी आणि त्यांच्या आवश्यकता तपासल्याशिवाय कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू नका. कव्हरेज, जोखीम व प्रीमियम हे कोणत्याही विमा योजनेचे महत्त्वाचे भाग असतात. तेव्हा खरेदीपूर्वी ती योजना नीट तपासा आणि समजून घ्या. आरोग्य, जीवन, मोटर किंवा मालमत्ता विमा योजना आणि पॉलिसी या प्रत्येक कंपनीच्या नियमांनुसार भिन्न कव्हरेज देणाऱ्या आणि वेगवेगळ्या प्रीमियमच्या असतात. खरेदीदारांनी आपल्यासमोरील विमा योजना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत का हे तपासणे आवश्यक आहे.

हेही वाचा… बाजारातील माणसं : जिम रॅाजर्स : जगाच्या बाजारातील न टाळता येणारे नाव

विमा ही जोखीम व्यवस्थापनाची पद्धत आहे हे समजून घ्या. विम्याला तुमच्या संपत्ती व्यवस्थापन किटचा भाग असू द्यावे. तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तुमचे विमा संरक्षण मिळवा. निर्णय घेण्यात अडचण आल्यास विमा योजना खरेदीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. राष्ट्रीय विमा जागरूकता दिवसाच्या शुभेच्छा!

deengee@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra national insurance awareness day special why is insurance for mmdc dvr
Show comments