मुंबईत जन्माला आलेले दिलीप पिरामल येत्या नोव्हेंबरमध्ये ७५ वर्षांचे होतील. १९७० ला सिडेनहॅम कॉलेजमधून त्यांनी बीकॉम ही पदवी मिळवली. त्याच वर्षी ते मोरारजी मिल्स या कंपनीचे संचालक झाले. १९७३ ला ब्लो प्लास्ट या कंपनीची स्थापना. १९७५ ला गीता पिरामल यांच्याबरोबर विवाह. २००५ ला घटस्फोट… असा त्यांचा जीवनपट. परंतु आज आपल्याला त्यांच्यावर मुख्य प्रकाशझोत टाकायचा आहे तो म्हणजे वडिलोपार्जित टेक्स्टाइल्स व्यवसायातून बाजूला होणे, संपूर्णपणे नवीन व्यवसाय सुरू करणे, आणि व्हीआयपी इंडस्ट्रीज या कंपनीला लगेज तयार करणारी जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनवणे.

व्हीआयपी हे नाव खरे तर नंतर आले. ही कंपनी सातपूरला असल्यामुळे खूपच जवळून पाहिलेली. या कंपनीबाबत कशाप्रकारे बदल होत गेले हा इतिहास पुन्हा एकदा डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे. कंपन्यांचा अभ्यास करताना नेमके काय करायचे? उत्पादनांचा अभ्यास करायचा, कंपनीच्या आर्थिक आकडेवारीचा अभ्यास करायचा, कंपनीचे यशापयश आर्थिक तराजूने मोजायचे, शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना किती भांडवलवृद्धी मिळाली याचे मोजमाप करायचे… पण यापेक्षाही महत्त्वाचे कंपनी चालवणारी माणसे, त्यांचा कंपनीविषयीचा दृष्टिकोन या सर्वांचा एकत्रित विचार केला गेला पाहिजे.

हेही वाचा : Money Mantra:एनपीएस वात्सल्य योजना काय आहे आणि त्याचा फायदा कुणाला मिळू शकतो?

ब्लो प्लास्ट या कंपनीचा सातपूरला जो कारखाना होता. तो कारखाना एफ. इंजिनीयर या व्यक्तींच्या मालकीचा होता. ही व्यक्ती सातपूरच्या कारखान्यात ‘मजबूत’ या नावाने पादत्राणे तयार करायची. कंपनीने शेअर्सची विक्री करण्याचे ठरवले आणि शेअरची सार्वजनिक विक्री (आयपीओ) झाली. शेअर्सचे वाटप होण्याअगोदर कंपनीच्या संचालकामध्ये बदल झाले. कंपनी दिलीप पिरामल यांच्या मालकीची झाली. त्यावेळचे एक फार मोठे नाव भूपेन दलाल (शेअर दलाल) यांनी या अंगाने फार महत्त्वाची कामगिरी बजावली. नंतर ते कंपनीच्या संचालक मंडळात आले. त्यांच्याविषयी बरेच लिहिता येईल, परंतु ते उप-कथानक झाले. मुख्य कथानक दिलीप पिरामल आणि व्हीआयपी हे आहे. कंपनीने वर्तमानपत्रात जाहिरात दिली की, कंपनीच्या संचालक मंडळात बदल झालेले आहेत. हे बदल मान्य असलेल्या अर्जदाराने भागधारक म्हणून राहण्याची इच्छा असेल तर कंपनी शेअर वाटप करेल आणि समजा हे बदल मान्य नसेल तर अर्जासोबत पाठवलेले पैसे परत मिळतील. तोपर्यंतच्या ५० वर्षांच्या शेअर बाजाराच्या इतिहासात नवीन शेअर विक्रीबाबत या कंपनीबाबत जो प्रकार घडला तसा प्रकार दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या बाबतीत घडलेला नव्हता हे नक्की.

दिलीप पिरामल यांनी पादत्राणे उत्पादन बंद करून, मोल्डेड लगेज हा नवीन व्यवसाय सुरू केला. कंपनीचे नाव बदलले. पत्र्याच्या पेट्या प्रवासासाठी वापरणारे हळूहळू मोल्डेड लगेज वापरू लागले. हे त्या काळातील फार मोठे आव्हान होते. यात स्पर्धा छोट्या उद्योजकांशी होत. परंतु या सर्व प्रकारच्या स्पर्धेवर मात करून दिलीप पिरामल यांनी व्हीआयपीचे उत्पादन जगात पोहचविले. बँडेड लगेजची बाजारपेठ हळूहळू मोठी होऊ लागली. कंपनीच्या नावात बदल करून व्हीआयपी इंडस्ट्रीज असे नामकरण, १९८१ ला १० वर्षे प्रगतीचे दशक म्हणून साजरे करणे, अशा पद्धतीने ही कंपनी जगात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली. अनेक प्रकारच्या उत्पादनाची वाढ करता आली. बॅग दिसायला एक छोटी वस्तू दिसते, परंतु तिच्या निर्मितीसाठी असंख्य सुटे भाग लागतात आणि या सुट्या भागाची निर्मिती करणारे अनेक प्रकल्प नाशिक परिसरात सुरू झाले. म्हणता म्हणता ते प्रकल्पसुद्धा मोठे झाले या सर्वांचे श्रेय व्हीआयपी आणि त्यांचे सर्वेसर्वा दिलीप पिरामल यांना द्यावेच लागेल.

हर्षद मेहता १९९२ ला व्हीआयपीचे शेअर्स खरेदी करू लागला. बाजारात शेअरचे भाव वाढले. आणि त्यानंतर दिलीप पिरामल यांनी आपल्याकडील काही शेअर्सची विक्री केली. ही बातमी जेव्हा बाजारात आली त्यावेळेस त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला, परंतु त्यावेळेस प्रसारमाध्यमांना त्यांनी विचारलेला प्रश्न अजूनही पक्का डोक्यात साठवलेला आहे. तो प्रश्न म्हणजे जर इतर जण कंपनीच्या शेअर्सची विक्री करून पैसा कमावतात तर मग प्रवर्तकालासुद्धा आपल्या कंपनीचे शेअर्स विक्री करून पैसे कमावण्याचा हक्क जरूर असायला हवा. त्यानंतर मग सेबीने प्रवर्तकांच्या शेअर विक्रीसंबधी अनेक नियम बनवले. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा शेअर्स खरेदी-विक्रीचे नियम बनवले गेले. नियम मोडले तर सेबीकडून दंड होऊ लागला.

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो – उज्ज्वल भवितव्य, अंगभूत मूल्य : पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड

वडिलोपार्जित कापड उत्पादनाचा प्रकल्प असताना पूर्णपणे नवीन उत्पादन ते यशस्वी होईल का नाही? हा प्रश्न दिलीप पिरामल यांना पडला नाही. कोण हे दिलीप पिरामल आणि कोणती त्यांची कंपनी आणि त्यांचा इतिहास यांचा मागोवा घेतला की गोष्टी स्पष्ट होतात. पिरामल चतुर्भूज यांचा मुलगा गोपीकृष्ण पिरामल. गोपीकृष्ण पिरामल यांना तीन मुले दिलीप, अजय आणि अशोक. अशोकचे १९९४ ला कॅन्सरने निधन झाले. अजय पिरामल यांच्यावर याच स्तंभातून (अर्थ वृत्तान्त, १३ फेब्रुवारी २०२३ ) लिखाण केलेले आहे. १९३४ ला मोरारजी मिल्स या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीचे दिलीप पिरामल १९७० ला संचालक झाले. १९७३ ला त्यांनी ब्लो प्लास्ट या कंपनीची स्थापना केली. मोरारजी मिल्सचे १९७५ ला ते व्यवस्थापकीय संचालक झाले. १९७९ ला गोपाळकृष्ण पिरामल यांचे निधन झाले. तिन्ही मुले १९८० ला वेगवेगळी झाली. दिलीप पिरामल यांनी मोरारजी मिल्सचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, परंतु ती माहिती बाजूला टाकणे उत्तम. मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीबाबत महत्त्वाचा उल्लेख करावाच लागेल तो म्हणजे गीता पिरामल यांनी इंग्रजी साहित्य व्यवसायाच्या इतिहासात एक नवीन दालन उघडले. परदेशातल्या कंपन्यांचा, उदयोग समूहाचा अगदी १००/२०० वर्षांचा इतिहाससुद्धा उपलब्ध आहे, परंतु काही थोडे टाटा, बिर्लासारखे उद्योग समूह वगळता इतर उद्योग समुहाचा एकत्रित इतिहास उपलब्ध नव्हता. ते महत्त्वाचे काम गीता पिरामल यांनी केले. १९७५ ला दिलीप पिरामल यांच्याबरोबर लग्न झाले आणि २००५ ला घटस्फोट झाला ही घटना बाजूला ठेवली पाहिजे.

हेही वाचा : आपले बचत खाते भाड्याने देणे

आपल्या ६० व्या वाढदिवसाला दिलीप पिरामल यांनी खंत व्यक्त केली. ती म्हणजे मला शिस्तबद्ध आयुष्य जगता आले नाही. आयुष्यातल्या प्रवासातले यश-अपयश मैलाचे दगड असतात. दिवंगत राहुल बजाज यांना ते आपला मेन्टॉर मानायचे आणि त्यांचे दुसरे आदर्श हे सुनील गावस्कर. जगभर फिरणे विशेषतः युरोपचे आकर्षण त्यांना जास्त आहे. संगीताची आवड आहे. जातिवंत खवय्ये आहेत. पण ठरवले तर हा माणूस खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून इतके वजन कमी करतो की, कंपनीच्या वार्षिक सभेसाठी सातपूरला निवेक हॉलमध्ये ते आले तेव्हा सुरुवातीला ओळख पटेना. व्हीआयपी आज ८ हजार कोटी रुपये बाजार मूल्यांकन असलेली कंपनी आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे, परंतु तिला प्रथम क्रमांकाची कंपनी करण्याची महत्त्वाकांक्षा ७५ व्या वर्षात प्रवेश करणाऱ्या दिलीप पिरामल यांना राहिलेली नाही. या पुढील काळात कंपनीची वाटचाल कशी राहील या प्रश्नाला आज उत्तर नाही.