वळणावळणाच्या रस्त्याने रात्रीचा प्रवास करून एकदाचे गावाला पोहोचलो. आम्हाला ‘स्टँड’वर घ्यायला काका आधीच हजर होता. रिक्षा चालू झाली, चिऱ्यांची घरे पार करत आम्ही काकाच्या वाडीत वळण घेतले. संपूर्ण लाल मातीचा रस्ता. सकाळची वेळ, मुंबईत न अनुभवलेला फुलांचा वेगळाच दरवळ, बऱ्यापैकी थंडी. घरी आलो.

असंख्य माडांच्या सोबतीत घर उभे होते. पुढले दोन आठवडे आमचा तिथे मुक्काम होता. आंबे, फणस, ताजे मासे आणि समुद्र यांच्या संगतीत आमचे दोन आठवडे कधी संपले ते कळलेच नाही. या माझ्या लहानपणीच्या, पहिल्या पर्यटनाच्या काही आठवणी आहेत. तेव्हा पर्यटन म्हणजे गावाला जाणे इथपर्यंतच मर्यादित होते. ‘बॅग भरो, निकल पडो’ म्हणत कोणीही वेगवेगळ्या देशांच्या पर्यटनाची स्वप्ने दाखवत नसायचे.

हेही वाचा >>>बाजारातली माणसं : वेगळ्या विचारांचा शेअर दलाल- राधाकिशन दमाणी

हे सर्व आठवायचे कारण म्हणजे, राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) जून २०२४ मध्ये ‘निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स’ नावाने नवीन निर्देशांक सुरू केला आहे. पर्यटन क्षेत्राच्या वाढीविषयी आज कोणाच्याच मनात दुमत नाही. त्याविषयी या लेखात मांडतो. करोनाची महासाथ ओसरल्यावर जी पर्यटन क्षेत्रात लाट आली होती, ती आता थांबेल असं वाटत नाही. रोटी कपडा मकान हे भागल्यावर उरलेले पैसे आता वेगवेगळ्या कारणांसाठी खर्च केले जात आहेत आणि त्यात देशा-परदेशातील प्रवासाला प्राधान्य आहे. देवदर्शन, महिला सहल, साहसी पर्यटन तसेच निवांत पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पर्यटन खात्याच्या अहवालानुसार, सुमारे १,५०,००० किलोमीटरचे रस्त्यांच्या जाळ्यामुळे, ५०० नवीन हवाई मार्ग आणि १५० विमानतळांमुळे पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. वेगवान वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत आणि सुमारे १०० पर्यटन पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केल्यामुळे, २०२३ मध्ये भारताने २५० कोटी देशांतर्गत पर्यटक भेटींची नोंदणी केली आहे. जी २०१४ पेक्षा दुपटीने मोठी आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) पर्यटनाचे प्रमाण वाढते आहे. करोनानंतर परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भारतात येत आहेत. निवांत पर्यटनाकडे परदेशी पाहुण्यांचा कल असतो. लाइटहाऊस, क्रूझ, कॅम्पिंग, मेडिकल अशा वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटन नवीन प्रकारांत वाढते आहे.

हेही वाचा >>>बाजाराचा तंत्र-कल : निफ्टीच्या २५,८०० ते २६,१०० या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा

पूर्वी वर्षाकाठी एक कौटुंबिक सहल व्हायची, आज कितीतरी जण एका वर्षात तीन ते चार वेळेस फिरायला बाहेर पडतात. ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यास भारतातील सुंदर पर्यटन स्थळांच्या आजूबाजूला राहून काम करणारी आजची तरुण पिढी दिसतेय. ‘मेक माय ट्रिप’च्या अहवालानुसार आध्यात्मिक पर्यटनात अयोध्या, उज्जैन आणि बद्रीनाथ या शहरांकडे ओढा वाढला आहे. चांगली हॉटेल्स भारतातील लहान शहरातही व्यवसाय सुरू करत आहेत. भारत सरकारच्या उडान, स्वदेश आणि प्रसाद योजनांमुळे पर्यटनाचा अधिक विकास होत आहे. अधिकाधिक शहरीकरण,बाहेरून जेवण मागवण्याकडे कल, महत्त्वाच्या शहरातील उंचावलेले राहणीमान यामुळे खर्चात वाढ होत राहील. पर्यटन क्षेत्रात विमान कंपन्या, विमानतळ, राहण्याची सोय असलेली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, पर्यटन सेवा, टूर प्लॅनिंग करणाऱ्या, बॅग्ज बनवणाऱ्या, पर्यटन विमा अशा कंपन्यांचा समावेश आहे.

निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, इंडियन हॉटेल्स, जीएमआर एअरपोर्ट्स, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (जेएफएल) या पहिल्या पाच (साधारण ७५ टक्के प्रमाण) कंपन्या आहेत. टाटा म्युच्युअल फंड आणि कोटक म्युच्युअल फंडाने या निर्देशांकावर आधारित ‘इंडेक्स फंड’ आणले आहेत.

कृषी पर्यटनाला सरकारचे पाठबळ वाढते आहे. भारताची विविध भाषिक कृषी संस्कृती आपल्याला आपल्या खेड्यात, लहान गावात येण्यासाठी खुणावत आहे. जुन्नर पर्यटन मॉडेल हे आपल्या महाराष्टातील कृषी पर्यटनातील एक सुंदर उदाहरण आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश’ असे आवाहन करून जगाचा शोध घेण्यापूर्वी स्वतःचा भारत शोधण्यासाठी आपल्याला प्रेरित केले आहे. तेव्हा पर्यटनामुळे रोजगार वाढेलच, गरिबांचा जीवनस्तर उंचावेल, अर्थव्यवस्था पुढे जाईल.

जॉन मिओ या अमेरिकी पर्यावरणप्रेमीने असे म्हटले होते की, “The world is big and I want to have a good look at it before it gets dark.”

प्रत्येकाने स्वतःचा ‘प्रहर’ ओळखावा आणि बाहेर पडावे.

पर्यटन हे फक्त नवीन प्रदेश पाहण्यापुरतं मर्यादित नसेल तर वाटेवर कदाचित तुम्हीच तुम्हाला नव्याने गवसाल…!