आजच्या या लेखातून नव्या भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या एका क्षेत्राचा आढावा घेऊया. जसजशी व्यापार, उद्योग, व्यवसाय यांची पुरवठा साखळी बदलते आहे म्हणजेच भारताचा या पुरवठा साखळीतील महत्त्वाचा दुवा म्हणून विचार होताना दिसत आहे. अशावेळी ‘ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्स’ या क्षेत्राचे भविष्य उजळणार आहे यात शंकाच नाही. पूर्वीच्या काळापासून रेल्वे आणि रेल्वेचे सुटे भाग बनवणाऱ्या निवडक कंपन्या एवढाच काय तो या क्षेत्रातील कंपन्यांचा शेअर बाजारात बोलबाला असायचा. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. अवजड वाहतुकीसाठी आवश्यक असणारी वाहने, ट्रक, ट्रेलर्स, जहाज, टँकर, जहाजाचे सुटे भाग बनवणाऱ्या, कंपन्या बंदरात माल उतरल्यानंतर विविध ठिकाणी नेण्यासाठी २४ तास कार्यरत असलेली पुरवठा साखळी; अर्थातच त्यातील महत्त्वाचा भाग भारतीय रेल्वे, अलीकडील काळात प्रवासी विमान वाहतुकीचे वाढलेले क्षेत्र, ई-कॉमर्स, कार्गो सेवा, बंदर आणि रेल्वे यांना जोडणाऱ्या मालवाहू रेल्वे गाड्यांतील माल ठेवण्यासाठी असलेली वेअर हाऊस म्हणजेच विशाल गोदामे एवढा मोठा व्यवसाय या क्षेत्रात सामावलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: ‘गोदरेज कंझ्यूमरचे’ पहिल्या तिमाहीचे आकडे समाधानकारक

जसजसा ग्राहक उपयोगी वस्तूंचा व्यवसाय वाढतो आहे, भारतातील नव्याने उदयाला आलेला मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग वाढतो आहे तसतसा वस्तूंची मागणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यामुळे त्याचा पुरवठा करणे हा आव्हानात्मक विचार ठरणार आहे. एखाद्या विशिष्ट वस्तूंचा पुरवठा पूर्वी फक्त मेट्रो शहरांनाच करावा लागायचा. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील शहरांमध्ये आणि नागरी वस्त्यांमध्ये सुद्धा छोट्या पुरवठा साखळ्या अस्तित्वात येत आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या नाशिवंत आणि टिकून राहणाऱ्या मालाचे गणित बदलणार आहे. भारताचे लोकसंख्येच्या निकषावर पृथक्करण केल्यास सर्वाधिक कमावत्या तरुण वर्गाचा देश असल्यामुळे वाहतुकीच्या नव्या गरजा समोर उभ्या आहेत. काही वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर असणाऱ्या विमानतळांची संख्या आता वाढू लागली आहे. येत्या २० ते २५ वर्षात १५ ते २० नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल सुरू होणार आणि त्यामुळे या क्षेत्रात मोठी गुंतवणूक वाढणार आहे. भारतात हाय स्पीड रेल्वेचे जाळे नसल्यामुळे जलद प्रवासासाठी विमानांचा वापर वाढता राहणार आहे. जसजसा शहरातील उच्च मध्यमवर्गीय तरुण पैसे कमवायला लागेल तसे त्याचे आलिशान गाड्या विकत घेण्याकडे असणारा कल वाढणार आहे. एकेकाळी फक्त परवडणाऱ्या गाड्या बनवणारे क्षेत्र म्हणून भारतातील वाहन निर्मिती क्षेत्र प्रसिद्ध होते.

आणखी वाचा: Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या पोर्टफोलिओत हवाच!

गेल्या दशकभरात ‘सिदान’ श्रेणीतील गाड्या आणि ‘एसयूव्ही’ प्रकारच्या गाड्या भारतीय तरुणांना खुणावत आहेत. या क्षेत्रात अधिकाधिक सुरक्षितता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित होणार आहे. हरित ऊर्जा आणि हरित वाहनांसाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. अधिकाधिक इलेक्ट्रिक गाड्यांवर भारतातील शहरी ग्राहक वर्ग आपले लक्ष केंद्रित करेल, आपली पसंती देईल असे आत्ता दिसते आहे. या पार्श्वभूमीवर हायब्रीड, सीएनजी, हायड्रोजन फ्युएल अशा तंत्रज्ञानाकडे आपण वाटचाल करणार आहोत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, सनरुफ, अलॉय व्हील्स, एलईडी प्रकारचे दिवे असलेल्या गाड्या सर्रास भारतीय बाजारपेठेत दिसू लागल्या आहेत. पाश्चात्य राष्ट्रांची प्रगतीची आकडेवारी आणि त्या देशातील रस्ते रेल्वे आणि विमानसेवा यांची सुविधा यांच्यात घनिष्ठ संबंध आहे. भारतातही या पर्वाला आता सुरुवात होणार आहे. सरकारी प्रसिद्धी पत्रकानुसार लॉजिस्टिक खर्च दहा टक्क्याच्या आसपास ठेवण्यासाठी ‘फ्रेट कॉरिडॉर’ आणि त्या अंतर्गत विशेष गुंतवणुक केली जाणे अपेक्षित आहे. शेती आणि सेवा क्षेत्राच्या बरोबरीने मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक वाढती राहणार आहे.

खुणावणारे निर्यात क्षेत्र

चीन हा जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असला तरीही भारताने गेल्या पंधरा ते वीस वर्षात उत्पादन क्षेत्र आणि त्याच्या निर्यातीमध्ये आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनांच्या निर्यातीत भारताला संधी वाढणार आहे. जीडीपीतील या क्षेत्राचा वाटा २५% पर्यंत वाढवण्याचा सरकारचा इरादा आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, सेमीकण्डक्टर या क्षेत्रात भारताला अजून बरीच मजल गाठायची आहे. २००५ या वर्षात भारतात आठ दशलक्ष गाड्यांची विक्री झाली; २०२२ मध्ये हाच आकडा २२ दशलक्ष गाड्यांवर जाण्याची शक्यता आहे.

सरकारची गुंतवणूक आणि पाठिंबा

‘फ्रेट कॉरिडॉर’ अंतर्गत रेल्वे आणि रस्ते याद्वारे होणाऱ्या वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ‘लोकोमोटिव्ह’ म्हणजेच रेल्वेची इंजिन, रेल्वेचे मालवाहू डबे, पॅसेंजर रेल्वे, गाड्यांचे डबे यांच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष दिले जात आहे. सरकार या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणार असल्यामुळे या क्षेत्राला सुगीचे दिवस येणार यात शंकाच नाही.

बाजारात गुंतवणुकीची संधी कुठे?

गाड्यांचे सुट्टे भाग, लॉजिस्टिक सोल्युशन्स, लोखंडी ओतकाम, टायर आणि रबर उत्पादने, इंजिन आणि इंजिन ऑइल, दुचाकी, तीन चाकी, व्यापारासाठी वापरली जाणारी वाहने, विमान वाहतूक, विमानतळाची देखभाल आणि त्यासाठी लागणारी माहिती तंत्रज्ञान यंत्रणा, बंदर, त्यावरील मालाची चढ-उतार करणारी अत्याधुनिक यंत्रणा, त्यासाठी वापरली जाणारी सॉफ्टवेअर, त्यात भविष्यात येणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाटा, ई-कॉमर्स, ट्रॅक्टर अशा विविध क्षेत्रात मिळून १३४ कंपन्या ‘निफ्टी ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स इंडेक्स’मध्ये अस्तित्वात आहेत. गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओत यातील शेअर्सचा निश्चितच समावेश करता येईल. यातील जोखमीचा मुद्दा असा तो म्हणजे सरकारी धोरणे. सरकारी खर्च आणि सरकारच्या पाठिंब्याशिवाय या क्षेत्रात गुंतवणूक आणि प्रगती होणे अशक्य आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांच्या भरघोस पाठिंब्याने तंत्रज्ञान आदान प्रदान होणार आहे. आयात निर्यात आणि त्या अनुषंगाने येणारे व्यापार जागतिक तेजी-मंदीवरही अवलंबून असतात. तरीही दीर्घकालीन उद्दिष्ट असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे क्षेत्र लाभदायी असेल यात शंका नसावी.

**या लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रातील शेअरमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच आणि आपल्या जोखिमेवर गुंतवणूक करावी.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transport logistics cargo warehouses mmdc psp
Show comments