प्रामाणिकपणा, दयाबुद्धी, कष्ट, ममत्व,   कार्यक्षमता या गोष्टींबाबत स्वत:चे मूल्यमापन करताना सुमारे ९५ टक्के लोक स्वत:ला या गुणांनी युक्त असल्याचे मानतात. हे संख्याशास्त्रीय असत्य आहे, पण ती माणसाची भावनात्मक गरज आहे. स्वत:च्या गुणदोषांकडे तटस्थपणे बघता यायला हवे. कधीकधी काही व्यक्तींना चांगल्या हेतूने केलेली टीकाही सहन केली जात नाही. त्याचा परिणाम नाराजीमध्ये किंवा संघर्षांत होतो. म्हणूनच अनाहूत सल्ला देऊ नये आणि वैयक्तिक बाबींवर टीका करू नये. त्याचा तुमच्याशी संबंध असेलच, असे नाही.
तुमचा ज्या बाबतीत संबंध येतो, त्याबाबत टीका करणे श्रेयस्कर. योग्य वेळ हीसुद्धा महत्त्वाची असते. तुमचा सहकारी निराश असेल, त्या वेळी टीका करणे म्हणजे आगीत तेल ओतणे होय. त्यातून नको तो प्रसंग उद्भवण्याच्या आधीच हे करणे आवश्यक असते. तुमच्या सहकाऱ्याचा मूड बघून टीका करणे योग्य ठरते. कोणत्या जागी तुम्ही टीका करताना हे महत्त्वाचे ठरते. सार्वजनिकरीत्या अशी टीका केल्याने संकटसाखळीच सुरू होते. टीका करण्यामागचा तुमचा उद्देश काय, हाही महत्त्वाचा घटक आहे. कुणाचेही अपयश अधोरेखित करण्याचा उद्देश असू नये. त्यातून काही मार्ग निघण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यामुळे तुमची टीका ही कृतीला प्राधान्य देणारी असली पाहिजे. मागच्या घटनांची उजळणी करून परत चर्चेला उधाण आणू नये. आपण कोणत्या हेतूने टीका करत आहोत, याची स्पष्ट जाणीव असायला हवी. काही गोष्टींचे भान राखणे अत्यावश्यक ठरते.
*    परिस्थितीचे आकलन करून तर्कशुद्ध पद्धतीने योग्य वेळ पाहून केलेले वक्तव्य.
*    टीकेचा वैयक्तिक परिणाम व आशय बोचरा नसावा.
*    चर्चेतून विधायक मार्ग काढा. आधी समोरच्याचे ऐकून घ्या आणि संयमाने भाष्य करा. समस्या का निर्माण झाली आहे, याची आधी चौकशी करा. कदाचित तुम्हाला माहीतच नसलेले एखादे कारण त्यामागे असेल. मग सहकाऱ्यांना यातून मार्ग कसा काढता येईल, याबाबत विचारणा करा. त्यामुळे ते उपायांबाबत विचार करू शकतील.
*    पुढील कार्याची दिशा अत्यंत कमी शब्दांत विशद करा. मदतीची अपेक्षा असेल तर तसे विचारा. चर्चेच्या शेवटी त्यांना असे वाटले पाहिजे की, यातून काही तरी सकारात्मक मार्ग निघाला आहे व या प्रवासात तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहात.
(मोबाइल एमबीए – जो ओवेने, पिअर्सन, मराठी भाषांतर – डायमंड पब्लिकेशन.)