Amravati Chai Seller’s Success Story : असं म्हणतात, जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनापासून मेहनत घेतली, तर तुम्ही भरघोस यश मिळवू शकता. आज आपण महाराष्ट्रातील अशा एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे चहाच्या छोट्याशा टपरीमुळे आयुष्य बदलले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात राहणार्या अनंत ठाकरे यांनी ५०० रुपये खर्च करून चहाची टपरी सुरू केली होती आणि आता ते लाखो रुपये कमवत आहेत. जाणून घेऊ अनंत ठाकरे यांची संघर्ष कहाणी.
अनंत ठाकरे यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचं धाडस दाखवलं. त्यांच्याजवळ शेती नव्हती. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. अनंत हे बी.कॉम.च्या दुसर्या वर्षाला होते, तेव्हा त्यांच्यावर घरची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले; पण त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी नोकरीसुद्धा केली. खासगी नोकरीमध्ये त्यांना १२ ते १३ तास काम करावे लागायचे. त्यामुळे ते दुसरे काम करू शकत नव्हते. त्यांना पगारसुद्धा खूप कमी होता, जो घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसा नव्हता. पुढे त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.
पैशाअभावी त्यांना व्यवसाय सुरू करण्याची हिंमत होत नव्हती. एक दिवस व्हीएमव्ही कॉलेजजवळून जाताना त्यांच्या लक्षात आले की, येथे एकही दुकान नाही. त्यांना चहाची टपरी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि येथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी फ्रेंड्स चाय या नावाची चहाची टपरी सुरू केली
चहाच्या टपरीने त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. चहाची टपरीला ८-१० वर्षं झाली पण या वर्षांमध्ये त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ-उतारात ते कधीही डगमगले नाहीत. परंतु, आज अनंत ठाकरे यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. आज ते दरमहा जवळपास ९० हजार रुपये आणि वर्षाला ११ लाख रुपये कमावतात.
सुरुवातीला लोक यायचे नाहीत; पण हळूहळू लोक टपरीवर चहा प्यायला येऊ लागले. सुरुवातीला त्यांची प्रतिदिन ३०० ते ५०० रुपये कमाई व्हायची. आता ते २,५०० ते ३००० रुपये दिवसाला म्हणजेच महिन्याला जवळपास ९० हजार रुपये कमावतात. त्यांची कहाणी त्या सर्व लोकांसाठी एक प्रेरणा आहे, ज्यांना हार न मानता आयुष्यात स्वत:च्या बळावर काहीतरी करायचे आहे.