आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना नवी नाही. गेली काही वर्षे त्याविषयी ऐकले, बोलले जात आहे. खरी क्रांती आली आहे ती जनरेटिव्ह एआय आल्यापासून. म्हणजे केवळ उपलब्ध माहितीच्या पुढे जाऊन एआय आपल्या गरजेनुसार माहिती तयार करू लागला तेव्हापासून एआयने हलकल्लोळ माजवला आहे. याच जनरेटिव्ह एआयच्या आधारे साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय मुलीने आपला उद्योग सुरू केला. विशेष म्हणजे तिचे शिक्षण प्रचलित कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीतून झालेले नाही. कंपन्यांना एआयबेस्ड सोल्युशन्स पुरवण्याचे काम करतात उज्ज्वला फडतरे या नवउद्यामी. त्यांच्या उद्योगाविषयी जाणून घेऊ त्यांच्याच शब्दांत.
माझं शिक्षण जनरल सायन्समधील. साताऱ्यातील महाराजा सयाजीराव कनिष्ठ महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बीएस.सी.,एम.एस.सी यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयातून केले. मी बीएससी इन मॅथेमटिक्स केले आहे. मास्टर्स क्वांटम मॅथेमॅटिक्समधून केले. पुढे क्वांटम कॉम्प्युटिंगवर संशोधन-विकास सुरू केला होता. तेव्हा आमच्या महाविद्यालयात २०१८ साली विनायक गोडसे यांचे एक व्याख्यान होते. येत्या दशकात टेक ट्रेंड्स काय असतील या विषयावर त्यांचे व्याख्यान होते. प्लेन बीएससी करणारेही जर त्यांनी गणित, स्टटेस्टिक्ससारखे अनालिटिकल विषय घेतले असतील तर तेही कॉम्प्युटर, एआयमध्ये काम करू शकतात, असाच त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. विनायक गोडसे सर हे डीएससीआय (डेटा सिक्युरिटी काऊन्सिल ऑफ इंडिया) चे सीईओ आहेत. जर कोणी या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करू इच्छित असेल तर आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असं आवाहन त्यांनी केलं. मी तयार झाले. स्नेहा घारगे आणि ऋतुजा साळुंखे या दोघीदेखील माझ्यासोबत आल्या.
आम्ही चार डोमेनमध्ये काम करत आहोत – जनरेटिव्ह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि हार्डवेअर डेटा मॅनेजमेंट सिस्टीम. आम्ही कंपन्यांना कस्टमाइज्ड एआय सोल्युशन्स पुरवतो. उदाहरणार्थ, एखाद्या स्टार्ट अपला किंवा एखाद्या कंपनीला त्यांच्या उद्याोगात एआय आणायचे आहे तर आम्ही सर्वात आधी एआय असेसमेंट करतो, म्हणजे त्यांच्या कंपनीत एआयची काय गरज असू शकते त्याचा अभ्यास करतो आणि त्यानंतर पीओसी करतो. (प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणजे जे अमलात आणायचे ते खरेच आणता येणार आहे का) आणि मग नंतर जेव्हा ते यशस्वी होईल तेव्हा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून कंपनीला ते उपलब्ध करून देतो.
याशिवाय आमचे दुसरे एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे – रेझ्युमे आणि जॉब डिस्क्रीप्शन जनरेटिव्ह एआयच्या आधारे मॅच करणे. मार्केटमध्ये या प्रकारचे प्रोडक्ट आहेत, पण आतापर्यंत पारंपरिक एआयच्या आधारे रेझ्युमे आणि जॉब डिस्क्रीप्शन जुळवले जात होते. पण आता हेच आम्ही जनरेटिव्ह एआयच्या आधारे करणार आहोत. २०१९ ला आम्ही आमची क्यूहिल्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. नावाची कंपनी नोंदणी केली. विनायक गोडसे सर आमचे मेंटॉर आहेत. गीता गोडसे आणि डॉ. गीतांजली पोळ या दोघी कंपनीच्या संस्थापक आहेत. एखादी स्टार्टअप आयडिया आहे आणि त्यांना अर्ली मार्केटमध्ये यायचे असेल तर त्यांना एक कम्प्लीट डिजिटल प्लटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो. त्याला आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, त्यात एआयसह अन्य सर्व गोष्टी उदाहरणार्थ, वेब प्लटफॉर्म, वेब अप्लिकेशन वगैरे आम्ही देतो. आम्ही अनेक कंपन्यांसाठी सोल्युशन बनवले आहेत. आमची कंपनी साताऱ्यातलीच नोंदणीकृत आहे. आणि ऑफिस सायन्स कॉलेजमधीलच एक इनक्युबेशन सेंटर आहे, तिथून आम्ही ऑपरेट करतो.
आमची आता १५ लोकांची टीम आहे. आतापर्यंत सायन्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षण देत होतो, पण आता आमच्याकडे एमएससी मॅथेमॅटिक्स, स्टॅटेस्टिक्स, इंजिनीअर, एमबीए सेल्ससाठी अशी टीम वाढवली आहे. गेल्यावर्षीपर्यंत तर आम्ही स्वत:ला टेक्निकली अधिक बळकट करण्याचंच उद्दिष्ट ठेवलं होतं. पण आता आम्ही मार्केटिंगवरही भर देत होतो.
कुटुंबाचा पाठिंबा
मी मूळची साताऱ्याचीच. देगाव हे माझे गाव. मध्यमवर्गीय कुटुंब आहे. माझे आई-वडील शिवणकाम करतात. शिक्षणाबाबत मात्र त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. नवीन व्यवसाय सुरू करायचा याची कल्पना मी त्यांना दिली. मी काय करतेय हे त्यांना कळत नव्हतं, ते पुढे किती यशस्वी होईल वा नाही याचीही खात्री नव्हती, तरी त्यांनी मला रोखलं नाही, उलट माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. गेल्याच वर्षी माझे लग्न झाले. सासरहून देखील मला पूर्ण सहकार्य मिळत आहे.
आयआयटी मुंबईसोबत काम
सांगली, कोल्हापूरला जो पूर आला होता, तेव्हा नेमकी कोणती कारणे, कोणत्या गोष्टी डेटा रिलेटेड गोष्टींचा आम्ही रिपोर्ट बनवला होता. केस स्टडीत केवळ एवढंच केलं होतं. पण २०२४ मध्ये आयआयटी मुंबईचा एक जीआयसी हब (जोश पटेल सेंटर) आहे, त्यांची आपत्कालीन व्यवस्थापनावर एक स्पर्धा होती, त्यात आम्ही सहभाग घेतला होता. त्यांच्याकडून आम्हाला या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी निधी मिळाला. आतापर्यंत आम्ही केवळ रिपोर्ट बनवला होता पण त्यांनी आम्हाला डिझास्टर मनेजमेंट सिस्टीम बनवायला सांगितली. कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीचा आधी अंदाज, नंतर प्रत्यक्ष ती स्थिती निर्माण होईल त्यावेळी तिथल्या स्थानिक प्राधिकरणाला मदत म्हणून तेथील जवळची गावे, कुठून मदत मिळेल ती ठिकाणे मॅप करून देणे आणि मग आपत्कालिन परिस्थितीनंतरचे पुनर्वसन. या सिस्टीमवर आम्ही आयआयची मुंबईसोबत काम करत आहोत. याच कामासाठी आम्हाला एमएसआयएनएस (महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी) मार्फत ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वुमन्स स्टार्ट अप स्कीम’अंतर्गत ‘इनोव्हेटिव्ह टेक सोल्युशन्स फॉर रिअल वर्ल्ड चलेंजेस’ या कॅटेगरीत आम्हाला पुरस्कार मिळाला.
एआय खूप वर्षांपूर्वी आलं. पण जेव्हापासून जनरेटिव्ह एआय आलं तेव्हापासून खूप बदल झाले आहेत. एआयने कंपन्यांची कामे सोपी होत आहेत, पण डेटा सिक्युरिटी, प्रायव्हसी या गोष्टींच्या माध्यमातून नवी आव्हाने देखील निर्माण होणार आहेत. त्याला आपण सक्षमपणे सामोरे जायला हवे.
(शब्दांकन : मनीषा देवणे)