राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील इतिहास घटकाची तयारी कशी करावी ते या व पुढील लेखामध्ये पाहू.
स्वातंत्र्यपूर्व इतिहास
ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना:
ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या भारतातील सुरुवातीच्या काळातील वखारी, व्यापारी परवानग्या व त्यांचे परिणाम पहायला हवेत. कंपनीची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुध्द झालेली युध्दे पुढील मुद्यांच्या आधारे अभ्यासावीत- भारतीय सत्ता, युद्धाचे ठिकाण, प्रमुख नेते, निकाल, असल्यास तहाच्या तरतूदी, तैनाती फौज धोरण, या धोरणांचा भारतीय राजसत्ता आणि जनता यांवरील परिणाम समजून घ्यावा.
भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास:
काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्थांचा आढावा पार्श्वभूमी, विचार, मागण्या, प्रमुख नेते, योगदान अशा मुद्द्यांच्या आधारे घेता येईल.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करता येईल- सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिध्दांत, दोन्ही कालखंडातील नेत्यांच्या मागण्यांची तुलना, महत्त्वाचे नेते व त्यांचे कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, बंगालची फाळणी, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार.
अभ्यासक्रमामध्ये नमूद महत्त्वाच्या व्यक्तिंची भूमिका अभ्यासताना वैयक्तिक माहिती, शिक्षण, व्यवसाय, व्यावसायिक यशापयश, राष्ट्रवादी विचार, त्यासाठी स्थापन केलेल्या संस्था संघटना, वृत्तपत्रे, अन्य लेखन, सामाजिक सुधारणांमधील भूमिका/योगदान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव
शेतकरी व आदिवासींचे उठाव, साम्यवादी (डावी) चळवळ, १८५७ चा उठाव, कामगार, संस्थानी जनता इ.च्या चळवळी/बंड यांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे पहावे- कारणे/ पार्श्वभूमी, स्वरूप, विस्तार, वैशिष्ट्ये, प्रमुख नेते, ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परीणाम, इतिहासकारांच्या /समकालीनांच्या प्रतिक्रिया.
क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास उदयाची पार्श्वभूमी, स्वरूप, कार्ये, मुख्य ठिकाण, ठळक घडामोडी, महत्त्वाचे नेते, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे/मुखपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्यांच्या आधारे करावा.
आझाद हिंद सेनेची स्थापना, पार्श्वभूमी, राष्ट्रीय लढ्यातील योगदान असे मुद्दे पहावेत.
गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ व अस्पृश्यता निर्मूलन-
गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षाचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया/कायदे, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरु झालेले वैशिष्ट्यपूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, जातीय सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा.
गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यता निर्मूलनाबाबतचा दृष्टीकोन आणि भूमिका, विचार, लेखन, कार्य, महत्वाचे सत्याग्रह/संघर्ष यांचा आढावा घ्यावा.
ब्रिटिश प्रशासनाधीन घटनात्मक विकास आणि सत्तेचे हस्तांतर-
ब्रिटिशांच्या कायद्यांची पार्श्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाईसरॉय इ. मुद्दे एकत्रित अभ्यासता येतील.
सांप्रदायिकतेचा विकास व फाळणी-
मुस्लिम राजकारण आणि हिंदू महासभेचे राजकारण मध्यवर्ती ठेवून सांप्रदायिकतेच्या उदय आणि विकासात महत्वाचे ठरलेल्या घडामोडी, इतर पार्श्वभूमी, नेते, वैचारीक भूमिका, त्यामागची कारणे, सांप्रदायिक राजकारणाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम, स्वातंत्र्य चळवळीमधील या विचारधारांचे योगदान आणि त्यांचा स्वातंत्र्य चळवळींवर झालेला परिणाम, फाळणी, हे मुद्दे समजून घ्यायला हवेत.
स्वातंत्र्योत्तर इतिहास
अंतर्गत राजकारण
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात फाळणीची कारणे, त्यातील गुंतागुंत, परिणाम/स्वरूप आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे.
भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी, संघर्ष, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासायला हवा.
इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळींचा अभ्यास आवश्यक आहे.
काश्मीर, पंजाब व आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद व माओवाद या समस्यांच्या उदयामागची सामाजिक, राजकीय व आर्थिक पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी.
कृषी, उद्याोगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यांमधील प्रगती याबाबतची धोरणे, योजना, स्थापन केलेल्या संस्था यांचा आढावा घ्यावा. पहिल्या सहा पंचवार्षिक योजनांच्या अभ्यासाच्या आधारे नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इ. बाबींचा संकल्पनात्मक अभ्यास शक्य होईल.
आंतरराष्ट्रीय राजकारण
भारताचे परराष्ट्र धोरणाची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, धोरणाची राष्ट्रीय गरज, कारणे, धोरणाचे स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे झालेले बदल व कारणे, धोरणाची अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, धोरणाचे परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया, मूल्यमापन असे मुद्दे विचारात घ्यावेत.
शेजारील देशांशी भारताचे संबंध हे ऐतिहासिक पार्श्वभूमी, सहकार्य आणि संघर्षाची कारणे, स्वरुप, परिणाम, ठळाक करार/निर्णयांचे परिणाम व त्यांमधील नेत्यांची भूमिका अशा मुद्यांच्या आधारे अभ्यासावेत.
steelframe.india@gmail.com