पंकज व्हट्टे

या लेखामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताच्या इतिहासाचा आढावा घेऊयात. आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे घटक समजून घेण्याआधी आपण अभ्यासक्रम समजावून घेणे आवश्यक आहे.

आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात कधी झाली याबाबत इतिहासाकारांमध्ये एकमत नाही. परंतु केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर १ च्या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी अठराव्या शतकाच्या मध्यापासून समकाळापर्यंतचा अभ्यास करावा. म्हणजेच आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून (प्लासीच्या लढाईपासून, १७५७) झाली हे मानले जाते. असे असले तरी १७४० आणि १७५० च्या दशकामधील फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामधील कर्नाटक युद्धेदेखील अभ्यासायला हवीत.

आधुनिक भारताच्या इतिहासाचे सर्वसाधारणपणे दोन कालखंडामध्ये झ्र कंपनीची सत्ता (१७५७-१८५७) आणि ब्रिटिश राजसत्ता (१८५८-१९४७) – विभाजन केले जाते. कंपनीची सत्ता असा शब्दप्रयोग करणे १८१८ पर्यंत विसंगत ठरेल. कारण १८१८ मध्ये कंपनीची सत्ता ही भारतीय उपखंडातील सर्वोच्च सत्ता बनली. १७५७-१८१८ या कालखंडामध्ये कंपनीने बंगालमधून सत्ता स्थापनेस सुरुवात केली आणि उर्वरित भारतात टप्प्याटप्प्याने सत्ताविस्तार केला.

संपूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासाचा आढावा एकाच लेखामध्ये घेणे शक्य नाही. त्यामुळे आपण आजपासून पुढील तीन लेखांमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात. आजच्या पहिल्या लेखामध्ये आपण भारतीय उपखंडातील ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराबाबत जाणून घेऊया. या काळातील सर्वात बलाढ्य सत्ता म्हणजे मराठा साम्राज्य. अठराव्या शतकाच्या मध्यापासून आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी १७०७ (मुघल सम्राट औरंगजेबचा मृत्यू) ते १७५७ (उत्तरकालीन मुघल शासकांचा कालखंड) या काळातील महत्त्वाच्या घटनांचा पार्श्वभूमी म्हणून अभ्यास करायला हवा. कारण या काळात मराठा सत्तेचा साम्राज्य म्हणून उदय झालेला पाहता येतो.

हेही वाचा >>> माझी स्पर्धा परीक्षा: नियमितता, नियोजन आणि फोकस महत्त्वाचा

उत्तरकालीन मुघल कालखंडामध्ये मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि स्वायत्त आणि प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. या सत्तांचा आपापसात संघर्ष चालू होता. याचा फायदा युरोपीय व्यापारी कंपन्यांनी घेतला. युरोपीय कंपन्यांनी व्यापारावर मक्तेदारी प्रस्थापित करण्याच्या हेतूने राजकीय सत्ता हस्तगत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. अठराव्या शतकाच्या मध्यावर भारताला विखंडित राज्यव्यवस्थेच्या समस्येने कशाप्रकारे ग्रासले होते असा प्रश्न २०१७ सालच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता.

या काळातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे मराठा साम्राज्याचा उदय. थोरले बाजीराव पेशवे (पहिले बाजीराव) यांच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत मराठा सत्तेला साम्राज्याचे स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी मराठ्यांच्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. थोरले बाजीराव यांचे उत्तराधिकारी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या पेशवेपदाच्या कारकिर्दीत भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या तीन महत्त्वाच्या घटना- मराठा साम्राज्य सर्वोच्च शिखरावर पोहचले, अफगाण शासक अहमदशहा अब्दाली भारतावर आक्रमणाच्या तयारीमध्ये होता आणि ब्रिटिश कंपनी बंगालची वास्तविक सत्ताधीश बनली – घडल्या. मराठ्यांनी मुघल बादशहाचे अफगाणी आक्रमणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी पत्करली होती. याची परिणती १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये झाली. साम्राज्यांना हादरवून टाकणाऱ्या लढाया पानिपत येथेच का लढल्या गेल्या, हे पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या संदर्भात स्पष्ट करा, असा प्रश्न २०१४ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेला होता.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय उपखंडामध्ये अनेक युद्धे लढली गेली. उत्तर भारतात ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईव्यतिरिक्त बक्सारची लढाई (१७६४) जिंकली. यामध्ये त्यांनी मीर कासीम, अवधचा नवाब शुजा आणि मुघल सम्राट शाहआलम दुसरा यांचा पराभव केला. या विजयामुळे कंपनीचे बंगालवर सुरुवातीला दुहेरी राज्यव्यवस्थेद्वारे आणि नंतर प्रत्यक्ष वर्चस्व प्रस्थापित झाले. तसेच अवधचा नवाब आणि मुघल सम्राट यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित झाले. या घटनांचे आणि लढाईचे महत्त्व याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे अपेक्षित आहे. दख्खनमध्ये ब्रिटिशांनी मराठे, निजाम आणि हैदर अलीच्या नेतृत्वाखालील म्हैसूर यांच्यातील संघर्षाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश-म्हैसूर युद्धांदरम्यान पक्ष बदलण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या. सरतेशेवटी चार म्हैसूर युद्धांमध्ये ब्रिटिशांनी म्हैसूरचा पराभव केला. टिपू सुलतानचे व्यक्तिमत्व वैशिष्ट्यपूर्ण होते. कारण तो ऊर्जावान शासक होता. त्याचप्रमाणे पौर्वात्य परंपरानिष्ठतेपासून दूर होता. त्याने प्रशासनामध्ये नवनवीन बदल अंमलात आणले, त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा. १८१८ मध्ये तिसऱ्या ब्रिटिश-मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांच्या पराभवाची कारणे अभ्यासणे आवश्यक आहे. निजाम यापूर्वीच ब्रिटिशांचा मांडलिक बनला होता. राजपुतांचे स्वातंत्र्य विविध तह करून संपुष्टात आणले गेले आणि तेही ब्रिटिशांचे मांडलिक बनले.

काही काळ काहीशा शांततेमध्ये गेल्यानंतर १८४३ मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रदेश बळकावला. महाराजा रणजीतसिंग यांच्या मृत्यूनंतर दहाच वर्षात म्हणजेच १८४९ मध्ये शिखांचे राज्य ब्रिटिशांनी आपल्या प्रदेशात विलीन करून घेतले. ब्रिटिशांनी १८५५ साली कर्नाटकवर आणि १८५६ साली अवधवर कब्जा केला. याप्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यविस्तार पूर्ण झाला. या घटना अठराव्या शतकाच्या मध्यापासून घडल्या. परिणामी, त्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे अपेक्षित आहे. संख्येने अधिक आणि तांत्रिकदृष्ट्या सरस असणाऱ्या भारतीय सत्तांच्या सैन्याला संख्येने कमी आणि भारतीय सैनिकांचीच भरती असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने कशाप्रकारे पराभूत केले याची कारणे द्या असा प्रश्न २०२२ सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेला होता.

ब्रिटिशांना केवळ भारतीय सत्ताधीशांशी संघर्ष करावा लागला असे नाही. त्यांच्या धोरणांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यांनी कंपनी विरोधात ठिकठिकाणी उठाव केले. कंपनीच्या कार्यकाळातील १०० वर्षांमध्ये ठिकठिकाणी छोटे-मोठे उठाव झाले. याबाबत २०१९ सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता. कंपनीच्या काळातील धोरणाबाबत आपण पुढील लेखामध्ये चर्चा करूया.

(अनुवाद – अजित देशमुख)