डॉ महेश शिरापूरकर

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील राजकीय व्यवस्था व राजकीय प्रक्रिया या घटकाअंतर्गत घटक राज्यांमधील शासनव्यवस्थेविषयी जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाप्रमाणेच घटकराज्यांमधील शासनप्रणालीदेखील संसदीय पद्धतीची आहे. मात्र, केंद्रीय शासनपद्धतीपेक्षा घटक राज्यांचे शासन पुढील कारणांमुळे काही अंशी वेगळे ठरते. पहिली बाब म्हणजे केंद्रीय संसदेच्या तुलनेत राज्य विधिमंडळाचे घटनात्मक अधिकार आणि भूमिका अत्यंत मर्यादित आहे. दुसरी बाब, राज्यांमधील विधिमंडळाची रचना देशात सर्वत्र एकसारखी नाही. भारतीय संघराज्य विशेषत्वाने एकात्म स्वरूपाचे असल्यामुळे घटकराज्यांच्या कायमस्वरूपी अस्तित्वाची हमी राज्यघटनेने दिलेली नाही. तसेच घटकराज्यांमध्ये संसदेप्रमाणेच कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील अशी तरतूद केलेली नाही. सध्या केवळ ६ राज्यांमध्ये विधान परिषद हे दुसरे सभागृह आहे. त्यामुळे बहुतांश राज्यातील राज्यकारभार विधानसभा या केवळ एकाच सभागृहाद्वारे नियंत्रित केला जातो.

Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या 'कारभारा'वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या ‘कारभारा’वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
ugc dharmendra pradhan marathi nmews
अग्रलेख : प्रधान की सेवक?
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
State Tribal Development Minister Ashok Uike appointed as Guardian Minister of Chandrapur district print politics news
पंधरा वर्षानंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री; जिल्ह्यातील आमदारांना सांभाळून काम करण्याचे आव्हान

सर्वप्रथम आपण घटकराज्यातील कार्यकारीमंडळाचा आढावा घेऊ. राज्याच्या कार्यकारीमंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाचा समावेश होतो. तथापि, सदर लेखामध्ये आपण फक्त राज्यपाल पदाविषयी चर्चा करणार आहोत. भारतातील घटकराज्यांचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. संविधानातील कलम १५३ ते १६७ यामध्ये राज्यपालांसंबंधीच्या तरतुदींचा समावेश आहे. यापैकी कलम १५५ नुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून राष्ट्रपती घटकराज्यासाठी राज्यपालांची नियुक्ती करतात व कलम १५६ नुसार राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. राज्यपाल हा केंद्र शासन व घटकराज्य यांना जोडणारा दुवा असून त्याद्वारे भारतीय संघराज्यामधील राजकीय एकात्मीकरण साधण्यात येते. संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक किंवा दोन वा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल नियुक्त करण्याची तरतूद केलेली आहे. राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, इतर मंत्री, लोकसेवा आयोगाचे सदस्य इत्यादींची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.

हेही वाचा >>> ग्रंथालय तंत्रज्ञान : आवाहने आणि संधी

राज्यपाल पदाचे अध्ययन करताना राज्यपालांचे स्व-विवेकाधीन अधिकार, कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, न्यायिक अधिकार, आणीबाणीविषयक अधिकार यांची माहिती घ्यावी. तसेच, राज्यपालांना काही राज्यांमधील प्रदेशांबाबत विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत त्याविषयी जाणून घ्यावे. उदा. महाराष्ट्राच्या राज्यपालास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करण्याचा अधिकार आहे. राज्यपाल पदाची तयारी समकालीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर करणे आवश्यक ठरते. २०२२ सालच्या मुख्य परीक्षेत राज्यपाल पदासंबंधी पुढील प्रश्न विचारला होता-‘राज्यपालांद्वारा वैधानिक अधिकार वापरण्याच्या आवश्यक अटींची चर्चा करा. अध्यादेश विधिमंडळासमोर न मांडता राज्यपालांद्वारे पुन्हा जारी करणे कितपत विंध ठरते, याची चर्चा करा.’ (१५ गुण, २५० शब्द).

विधानसभा

विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभेत राज्याच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी ६० ते जास्तीत जास्त ५०० सभासद असतात. या सभागृहाचे सदस्य प्रादेशिक मतदारसंघांमधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे प्रौढ मताधिकाराच्या तत्त्वांनुसार निवडले जातात. प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या व प्रतिनिधींची संख्या यांच्यातील गुणोत्तर संपूर्ण राज्यभर शक्यतो सारखेच रहावे अशी दक्षता घेतली जाते. विधानसभेची रचना, अधिकार लोकसभेप्रमाणेच आहे. परीक्षेच्या दृष्टीने विधानसभेची तयारी करताना विधानसभेच्या अधिकारांवर असणाऱ्या मर्यादा जाणून घेणे आवश्यक ठरते. उदा. काही विधेयके विधिमंडळात मांडण्यापूर्वी त्यांना राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घ्यावी लागते किंवा घटनात्मक आणीबाणी, राज्यपालांचा स्वाविवेकाधिन अधिकार तसेच समवर्ती सूचीबाबत केंद्रीय कायद्यांचे श्रेष्ठत्व इ.

विधानपरिषद

विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. एखाद्या राज्यात विधानपरिषदेची निर्मिती करता येते अथवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करता येते. त्यासाठी पुढील बाबींची पूर्तता आवश्यक ठरते. १) संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने असा ठराव पारित करावा लागतो आणि २) हा ठराव संसदेने साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. सध्या भारतामध्ये सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये विधिमंडळ एकगृही आहे.

विधानपरिषदेची राज्यसभेशी तुलना केल्यास विधान परिषदेला राज्यसभेपेक्षाही दुय्यम स्वरूपाचे अधिकार आहेत असे आढळून येते. परिणामी, ज्या राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे तिथे विधानसभेचे वर्चस्व असल्याचे पहावयास मिळते. विधानपरिषदेत कमीत कमी ४० आणि जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य असतात. विधानपरिषद या घटकाची तयारी करताना विधानपरिषद व विधानसभा यांचा तुलनात्मक अभ्यास करणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. २०२३ च्या मुख्य परीक्षेमध्ये या घटकावर पुढील दोन प्रश्न विचारण्यात आले आहेत.

१) विधिमंडळीय कामकाजादरम्यान सुव्यवस्था आणि नि:पक्षपातीपणा राखण्यातील तसेच सर्वोत्तम लोकशाही व्यवहार सुकर करण्यातील राज्य विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चर्चा करा. (गुण १०, शब्द १५०).

२) भारतातील राज्यांच्या विधिमंडळांमध्ये स्त्रियांच्या परिणामकारक आणि अर्थपूर्ण सहभागासाठी तसेच प्रतिनिधित्वासाठी नागरी समाज गटांनी दिलेल्या योगदानाची चर्चा करा. (गुण १५, शब्द २५०).

घटकराज्यांचे शासन या अभ्यासघटकाची तयारी ‘भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया खंड १’ (सहावी आवृत्ती, २०२४, युनिक अॅकॅडमी प्रकाशन), आणि इंडियन पॉलिटी या विषयावरील एखादा चांगला संदर्भ तसेच समकालीन घडामोडींकरीता ‘द हिंदू’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही वृत्तपत्रे आणि योजना, EPW यांसारखी मासिके अभ्यासावीत.©

राज्यपालपदावर टीका

केंद्र शासनाच्या इच्छेनुसार राज्यपालांच्या नेमणुका होत असल्यामुळे राज्यपाल पद हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. विशेषत: कलम ३५६ च्या तरतुदीमुळे राज्यपाल पद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कलमासंबंधी राज्यपालांच्या पक्षपाती भूमिकेमुळे कित्येकदा वाद निर्माण झाले आहेत. तसेच कलम २०० नुसार राज्य विधिमंडळाचे एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. असे विधेयक राज्यपालांनी राखीव ठेवल्यास राष्ट्रपतींच्या संमती खेरीज त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. परिणामी, राज्यपाल पद केंद्राचे हस्तक आहे अशी टीका करण्यात येते.

Story img Loader