विक्रांत भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विद्यार्थी मित्रहो, आज आपण सुविचारांवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी काय करणे आवश्यक असते याची चर्चा करणार आहोत.
भारतीय आणि पाश्चात्त्य विचारवंतांचे योगदान हा अभ्यासक्रमात दिलेला एक घटक आहे. या घटकावर बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे प्रश्न येतात. या प्रश्नांमध्ये विचारवंतांचे नाव नमूद न करता त्यांचा सुविचार दिलेला असतो आणि मग एखादा संदर्भ देऊन सुविचारांचा अर्थ आणि त्याला लागू होणारी उदाहरणे विचारली जातात. अशा प्रश्नांना हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या विचारवंताच्या सिद्धांताचे योग्य आकलन आणि उपयोजन माहिती असणे आवश्यक असते. असे प्रश्न प्रकार बऱ्याचदा पाश्चात्त्य विचारवंतांच्या बाबतीत दिसून येतात.
उदा. ‘‘ Human beings should always be treated as k endsl in themselves and never as merely ` meansl.’’ Explain the meaning and significance of this statement, giving its implications in the modern techno- economic society. (150 words, 10 marks)
‘‘व्यक्तींचा कायमच स्वयंमेव साध्य म्हणून विचार केला गेला पाहिजे आणि त्यांना कधीही केवळ साधन म्हणून पाहू नये.’’ आधुनिक तंत्रज्ञान-आर्थिक समाजावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून या विधानांचा अर्थ आणि महत्त्व विशद करा. (१५० शब्द, १० गुण)
हे विधान म्हणजे इम्यान्यूअल कान्टचे मानवतचे सूत्र आहे. म्हणजे इथे संदर्भ आणि पार्श्वभूमी माहिती असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पाश्चात्त्य विचारवंतांच्या सिद्धांतांवर आधारित असे प्रश्न वारंवार आलेले आहेत.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
भारतीय विचारवंतांच्या बाबतीत विचारलेले प्रश्न मात्र प्रत्यक्ष सुविचार देऊन आणि त्याचा सध्याच्या काळातला अर्थ विचारणारे आलेले आहेत. या प्रश्नांचे उत्तर लिहिताना त्या सुविचाराचा वा विचारवंताने तसे कधी म्हटले हा संदर्भ माहिती असणे वा लिहिणे आवश्यक नसते. तर सुविचाराचा नेमका अर्थ सांगून तसे का म्हटले याबद्दल सुयोग्य कारणे देऊन स्पष्ट करणे अपेक्षित असते. तसेच सध्याच्या काळात तो सुविचार का महत्त्वाचा वा सुसंगत आहे हे सांगणे आणि त्यासाठी सुसंगत उदाहरणे लिहिणे अपेक्षित असते. हे सर्व करत असताना सुविचाराच्या विरुद्ध जाणारे वा त्याचे खंडन करणारे मुद्दे मांडू नये. तसेच एक सुविचार विशद करण्यासाठी दुसरा सुविचार वापरू नये हे आवर्जून लक्षात ठेवावे.
कधी कधी सुविचार हे अमूर्त ( abstract) संकल्पनांवर आधारित असतात. अशावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा नेमका अर्थ लावणे अवघड वाटू शकते. अशावेळी जर पुढील पायऱ्या वापरल्या तर हे काम अचूकपणे करता येऊ शकते.
१. सुविचारातील कळीचे शब्द ओळखणे.
२. कळीच्या शब्दांमधील सामान्यत: समजले जाणारे नाते वा संबंध ओळखणे.
३. विचारवंताने या कळीच्या शब्दांमध्ये काय नाते सांगितले आहे हे पाहणे आणि त्याची तुलना सामान्यत: जोडल्या जाणाऱ्या संबंधाशी करून तो फरक आहे का व तो का आहे हे स्पष्ट करणे.
४. सुसंगत उदाहरणे देऊन सुविचाराचे अंतरंग स्पष्ट करून सांगणे आणि समपर्क शेवट करणे.
उदाहरणे देताना ती ऐतिहासिक, चालू घडामोडींवर आधारित, वैयक्तिक आयुष्यात घडलेली किंवा काल्पनिक वा तर्काधारित असू शकतात. परंतु ती ऐन परीक्षेमधे नेमकी अचूकपणे सुचणे आणि लिहिता येणे हे दुरापास्त आहे. म्हणून यासाठी उदाहरणांचीदेखील पूर्व तयारी करावी लागते.
आता आपण २०२३ मध्ये आलेला एक सुविचार आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे हे पाहूयात.
Que. ‘‘ The simplest acts of kindness are by far more powerful than a thousand heads bowing in prayers.’’ – Mahatma Gandhi (150 words, 10 marks)
प्र. ‘‘हजारो व्यक्तींच्या प्रार्थनेपेक्षा दयेच्या प्रेरणेतून केलेल्या साध्या कृती अधिक प्रभावी असतात.’’ – महात्मा गांधी (१५० शब्द, १० गुण)
या प्रश्नाच्या उत्तरासाठीच्या सूचना – या सुविचारामध्ये दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. एकीकडे आहे प्रार्थना आणि दुसरीकडे आहे दया दाखवून कृती करणे. ही तुलना करून यातील दुसरी गोष्ट पहिल्या गोष्टीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करण्यासाठी थोडासा खोलात जाऊन विचार करावा लागेल. यासाठी प्रार्थना करणे म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होतो याचाही विचार करावा लागेल. तसेच फक्त प्रार्थना करून प्रश्न सुटत नाहीत यावर भाष्य करावे लागेल. कधी कधी फक्त प्रार्थना करून देव मदत करेल असा भरवसा ठेवण्याने हतबलता आणि निष्क्रियता येऊ शकते. या बद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल. यामुळे मानवी गुणांचा विकास होईलच असे नाही. याउलट प्रत्यक्ष कृतीतून दया दाखवणे यातून बऱ्याच समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तसेच यामुळे चारित्र्याचा विकास होतो. मानवी संबंध चांगले होतात आणि समाजात सौहार्द नांदू शकते याकडे लक्ष वेधावे लागेल. या पुढील लेखामध्ये आपण या प्रश्नाचे आणि अजून एका सुविचारावर आधारित प्रश्नाचे उत्तर पाहूयात. तोपर्यंत तुम्ही वर दिलेल्या सूचनांनुसार उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करून पहा.