सध्या बहुतांश क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आले आहे. हे तंत्रज्ञान कुठपर्यंत गेले आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. या क्षेत्रामुळे नोकऱ्यांवर गदा येईल, अशी भीती बाळगण्याऐवजी त्यातील संधी शोधण्याचा प्रयत्न करावा. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर, त्यांनी ‘पायथन प्रोग्रॅम’ आणि माहितीचे विश्लेषण (डेटा अॅनालिसिस) चे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्यासह, इंग्रजी भाषेबरोबर परदेशी भाषा शिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यास आणि ज्ञान संपादन करून चालणार नाही तर, मानसिक स्वास्थ्याकडे आणि शारीरिक स्वास्थाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी दररोज योग, प्राणायम केले पाहिजे.
इंडस्ट्री ४.० येऊन १२ वर्षे झाली. परंतु, तरी अनेकांना त्याविषयी माहीत नाही, याची खंत वाटते. सर्वच प्रकारच्या सर्जनशील क्षेत्रात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेेने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. आपण सगळ्यांनी जागे होण्याची गरज आहे. चॅट जीपीटीमुळे कला क्षेत्रातील बऱ्यापैकी नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. हे तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपल्या मनामध्ये काय सुरू आहे, हे समजते. त्यामुळे करिअर निवडताना किंवा त्यात विकसित होताना सुद्धा आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळू शकत नाही.
कॉल सेंटर हा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. भारत आणि आणखी काही देश या व्यवसायात माहीर आहेत. यातून आपल्याला खूप परकीय चलन सुद्धा मिळते. कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामुळे या सर्व नोकऱ्या नष्ट होतील, असे टीसीएस कंपनीने दावा केला आहे. या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर अनेकजण कॉलसेंटर मध्ये जॉब मिळण्याची स्वप्न पाहून बीए, बीकॉम, एमए, एमसीए करत असतात. त्या लोकांना ही विधाने माहिती असली पाहिजे.
इंडस्ट्री ४.० हे २०१२ पासून आलेले आहे आणि स्थिरावलेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक झाले आहे. आपल्या फक्त हे माहिती नाहीये. भिंतीला कान असतात असं म्हणतात. यातील सत्यता कृत्रिम बुद्धिमत्तेने दाखवून दिली आहे. या तंत्राज्ञानाच्या खोलात गेले पाहिजे, त्याची माहिती करून घेतली पाहिजे. हे तंत्रज्ञान इतर देशांमध्ये आहे, आपल्याकडे नाही, या भ्रमात राहिलात तर, मराठीतील जी म्हण आहे, स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेणे ही आपल्याला लागू होईल. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम सांगते की या पुढच्या काळामध्ये विश्लेषणात्मक विचार, सक्रिय शिक्षण, जटिल समस्या सोडविणे, रचनात्मकता आणि गंभीर विचार करणे या गोष्टींवर भर दिला पाहिजे. हे वाणिज्य, कला, विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात लागू होते. यावर जर तुम्ही काम करत नसाल तर, तुमची पदवी चांगली असून सुद्धा पुढच्या पाच ते दहा वर्षात तुम्हाला नोकरी मिळणार नाही. या गोष्टी जर अमलात आणत असाल तर, तुमची पदवी ही कोणत्याही क्षेत्रातील का असेना तुम्हाला नोकरी नक्की मिळेल.