डॉ. श्रीराम गीत
माझ्या मुलाने ८० टक्के मार्क मिळवून मुंबई विद्यापीठांमध्ये वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला आहे. मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज इन फायनान्स असे जर त्याला करायचे असेल तर पहिल्या वर्षांला त्याने कोणते विषय घ्यावेत? एचआर शिवाय कोणकोणते पर्याय असतात तेही सुचवावेत. – सुदेश मुरकर
आपल्या मुलाने आता फक्त प्रथम वर्षांला प्रवेश घेतलेला आहे. कॉमर्ससाठी अकाउंटस, इकॉनॉमिक्स, इंग्लिश हे तीन विषय प्रमुख्याने अभ्यासायचे असतात. या विषयांचा सलग पाच वर्षे अभ्यास केल्यानंतर एम. एम. एस.साठी प्रवेश परीक्षा त्याला द्यायची आहे. ती प्रवेश परीक्षा सगळय़ात महत्त्वाची असेल. कारण कोणत्या संस्थेत प्रवेश मिळतो त्यावर त्याचे पुढचे भवितव्य अवलंबून असेल. मुंबई पुरते बोलायचे झाले तर जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ही सर्वोत्तम आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या सीईटीतून त्याला पहिल्या २०० मध्ये यावे लागेल. आता आपल्या प्रश्नातील फायनान्स बद्दल थोडक्यात लिहितो. कोणीही विद्यार्थी ज्या वेळेला एमएमएस करतो त्यावेळेला त्याची फक्त प्राथमिक कामे सुरू होतात. काम करत असलेल्या कंपनीचे अर्थकारण समजता समजता तीन ते पाच वर्षे जावी लागतात. त्यानंतरच फायनान्समध्ये काम करतो अशी सुरुवात होते. याला अपवाद हजारात एक असा थेट उत्तमोत्तम मॅनेजमेंट संस्थेतून पास झालेला पदवीधर. आपल्या मुलाने अन्य कोणतेही विषय निवडावेत मात्र रोजचे वृत्तपत्राचे वाचन व त्यातून अर्थकारण समजून घेणे ही त्याची प्राथमिक गरज राहील. याच्या जोडीला इयत्ता दहावीचे मार्क सातत्याने पुढील पाच वर्षे टिकवून ठेवणे हेही गरजेचे राहील. एमबीएचे दुसरे वर्ष करतानाच विषय निवड करता येते.
माझ्या मुलाने दहावीत ९५ टक्के मार्क मिळवून तो शास्त्र शाखेत बारावीत आहे. फिजिक्स व गणित त्याला खूप आवडते. बीएस्सी स्टॅटिस्टिक्स पूर्ण केले तर त्याला पुढे काय काय करता येईल? याबद्दल माहिती द्यावी.
नम्रता, नवी मुंबई</p>
स्टॅटिस्टिक्स विषय घेऊन पदवी घ्यायची असेल तर चांगल्या स्वायत्त महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा त्याला बारावीनंतर द्यावी लागेल. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या तीनही विषयांत शक्यतो ऐंशी मार्क बारावीला टिकवावेत. बारावीच्या गणितामध्ये स्टॅटिस्टिक्सवर २५ मार्काचा एक भाग असतो. तो खऱ्या अर्थाने आवडला तर नंतर पदवीसाठी हा विषय तो निवडू शकतो. संख्याशास्त्र हा विषय पूरक म्हणून सर्वत्र लागतो. कोणत्याही मोठय़ा आकडेवारीतून संख्याशास्त्र निष्कर्ष काढत असते त्यामुळे अशा स्वरूपाची माणसे सर्व क्षेत्रात लागतात. मुख्यत: संशोधनाशी संबंधित, लोकसंख्या व अर्थशास्त्राशी संबंधित अशा कामांमध्ये या व्यक्तींची गरज लागते. बीएस्सीला पहिल्या तीनात आला तर मास्टर्सचा रस्ता धरावा अन्यथा एमबीए मार्केटिंग जास्त सोयीचे राहील. शेवटची महत्त्वाची सूचना. संख्याशास्त्रातच पदवी घेऊन त्यात काम करणारी व्यक्ती शोधण्याचे काम मुलाने येत्या दोन वर्षांत करावे. मला हे आवडते म्हणण्यापेक्षा अशा व्यक्तीकडून कामाचे स्वरूप नेमके समजू शकते. ती जबाबदारी आपण आपल्या मुलावरच टाकावी. गरजेनुसार मदत मात्र करायला हरकत नाही.
आवाहन
यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल.