मी सातारा येथे राहते. २०२४ ला माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. मी बीएससी फॉरेन्सिक सायन्स केले आहे. आत्ता मी एमपीएससी कंबाइनची तयारी सुरू केली आहे. पण मला अजूनही नीट समजत नाहीये की मी नक्की काय करू म्हणजे, माझे ग्रॅज्युएशन ज्या विषयात केले आहे त्या क्षेत्रात जाऊ की स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करू? माझ्या पालकांना सुद्धा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा असेच वाटते.- मानसी भोसले

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा तू शिकलेल्या विषयाशी संबंध दुरान्वयानेही नाही. त्या अभ्यासात दोन-तीन वर्षे घालवल्यानंतर पुन्हा त्या मूळ विषयात तुला नोकरी मिळणे अशक्य होईल. मुळात फॉरेन्सिक सायन्स हा विषय तू का निवडला या प्रश्नाचे उत्तर तुला स्वत:लाच विचारायचे आहे. तो आवडीने निवडला असेल तर त्यातून पुढे जाणे हे रास्त ठरेल. मात्र या क्षेत्रातील संधी, पगार व प्रगती ही सावकाश असते हे लक्षात ठेवावे लागेल. स्पर्धा परीक्षात यश मिळण्याचे शक्यता तुझ्या आजवरची वाटचालीतील कोणतेच गुण न कळवल्यामुळे त्याविषयी मी काही सांगू शकत नाही. यावर घरच्यांशी सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा.

मला दहावीत ६५ टक्के आणि बारावी विज्ञान शाखेत ८३ टक्के होते. पण त्यावेळी कोविड होता. मी उत्तीर्ण झालो. आता बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. पण कुठून आणि कशी सुरुवात करावी ते कळत नाही.- वैभव वल्लमवाड

प्रथम बीए पूर्ण कर. त्यात ७५ टक्के मार्क मिळतील इतका अभ्यास कर. यूपीएस्सी द्यावी वाटणे आणि यूपीएससीचा अभ्यासाचा स्तर समजावून घेणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सहसा ती परीक्षा पदव्युत्तर पातळीची असते. यामुळे तू सुरुवात राज्य स्पर्धा परीक्षातून करावी असे सुचवतो. त्यातून एखादे पद हाती लागले तर दोन वर्षे त्यात नोकरी करताना यूपीएससीची तयारी करून प्रयत्न करणे ठीक राहील.

Story img Loader