डॉ. श्रीराम गीत

नमस्कार सर, माझे वय २६ आहे. २०१३ ला दहावी ६२ टक्क्यांनी बारावी विज्ञान शाखा मधून ५२ टक्क्यांनी पास झालो. नंतर काही वर्षे जॉब केला. लॅब टेक.मध्ये काही विषय राहिले आहेत. बीएस्सी २०२२ ला ६.०७ ने पास झालो. फार्मा कंपनीमध्ये नोकरी मिळाली नाही म्हणून खासगी शाळेमध्ये प्रयोगशाळा सहायक म्हणून काम करत आहे. माझे काही प्रश्न आहेत.  १) पुढे काय शिकता येईल एमएससी किंवा बी.एड?

२)सरळसेवा (पोलीस भरती) परीक्षाची तयारी करत आहे. – अश्वघोष शिंदे

सध्याची नोकरी चालू ठेवा. ते काम व्यवस्थित शिकून घ्या. सवडीने बी.एड करा. संस्थाचालकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटेल अशी वर्तणूक गरजेची आहे. तर शिक्षकाची बढती मिळेल. पोलीस भरती हा रस्ता तुमच्यासाठी नक्की नाही. असे माझे वैयक्तिक मत येथे नमूद करत आहे. शास्त्र शाखेतील पदवीधराने तो रस्ता धरण्यात फारसा अर्थ नसतो. एम.एस्सी. करण्याचा विचार अजिबात नको. कारण आता त्या दृष्टीने आपले वय उलटून गेले आहे व शैक्षणिक वाटचाल फारशी दमदार नाही. चुकून माकून एखाद्या फार्मा कंपनीने तुम्हाला नोकरी दिली तर विचार करा. अन्यथा आहे ते चालू ठेवणे उपयुक्त व गरजेचे आहे. तुमची सगळी वाटचाल व वय बघून हे लिहीत आहे. कृपया वास्तव लक्षात घ्यावे.

माझे एम.एस्सी. अ‍ॅग्री शिक्षण झाले आहे. एम एस्सी २०२० मध्ये पूर्ण केले आहे. पदवी करत असताना कृषी विभागात नोकरी मिळवण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले. परंतु पदवी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना कृषी शास्त्रात पीएच.डी. करून करियर करण्याचा विचार आला. एम.एस्सी. करून दोन वर्षांनी माझं लग्न झाले. सध्या मी एका खासगी कृषी महाविद्यालयात लेक्चररशिप करत असून माझा चरितार्थ भागतो आहे. मी समाधानी पण आहे. परंतु सध्या स्पर्धा परीक्षांचा वातावरणामुळे मागील वर्षी परत कृषी सहाय्यक सोबतच तत्सम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला असून आवेदनही केले आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती बघता पीएच.डी. करावी असं मनात येत आहे पण त्यासाठी आर्थिक बाजू पाहिजे तशी भक्कम नाही.  – विजय.

पीएच. डी करता आता द्यायला आपल्याकडे वेळ आणि पैसे दोन्ही नाहीत. दहा वर्षे शिकवण्याचा अनुभव घेतल्यानंतर आपण वयाच्या ३५ मध्ये पीएचडी पूर्ण केले तरी काहीही बिघडणार नाही. आत्ता पीएच.डी. पूर्ण करून त्याचा आर्थिक लाभ मिळेल असे नाही. मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे केल्यास प्राध्यापक, एचओडी किवा प्राचार्य पदासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. शक्य असल्यास स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न चालू ठेवायला कोणतीच अडचण नाही. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन हे लिहीत आहे.

नमस्कार, मी बी.ए. प्रथम वर्षांत शिकत आहे. मी चौथी आणि आठवी शिष्यवृत्तीधारक आहे. मला दहावीला ८९.८० टक्के आहेत आणि बारावीला मला (कला शाखेत) ६२ टक्के पडले. मला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे. या परीक्षेत स्पर्धा तीव्र असल्यामुळे, मी सध्या  उवएळ परीक्षेची तयारी करायची ठरवत आहे. या परीक्षेत मी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांची पदवी घेत मला राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करता येईल का? जर राज्यसेवा परीक्षेत मी उत्तीर्ण झालो नाही तर ही पदवी घेतल्यानंतर मला खासगी कंपनीत कोणती नोकरी मला नोकरी मिळू शकते? – शंकर ढवळे.

तुला खासगी नोकरी कधी व कशी मिळेल हे तुझ्याकडे असलेल्या कौशल्यावर आधारित असेल. बी. ए. चे विषय पण कळवले नसल्यामुळे त्यावर अधिक मला कोणतेही मार्गदर्शन करणे शक्य नाही. फार पुढचा विचार न करता बारावी ६२ चे ७२ टक्के कसे होतील या दृष्टीने अभ्यासाची आखणी कर व सामान्य ज्ञान वाढव. करिअर वृत्तांत व लोकसत्ताचे वाचन तीन वर्षे चालू ठेव. यथावकाश यश मिळेल.

मागील वर्षी माझ बी.एस्सी. पूर्ण होऊन ६५ टक्के मिळाले आहेत. सध्या मी कंम्बाइनची तयारी करत असून एकच एक अटेम्प्ट द्यायचा आहे. माझी अंतराळवीर होण्याची इच्छा आहे, म्हणजे व्हायच आहे. त्याबद्दल सखोल मार्गदर्शन करावे. एम.एस्सी.फिजिक्समध्ये करावी की एरोस्पेसमध्ये. कोणत्या इन्स्टिटय़ूट मधून करावे? फी किती असेल? – रामेश्वर मिरकड.

राकेश शर्मा या एकुलत्या एकानंतर भारतीय अंतराळवीर अजून झाला नाही. तुझी इच्छा असणे व ती प्रत्यक्षात येणे यातील वास्तव समजून घे. कम्बाईन सर्विसमधून एअर फोर्स मिळाले तर ठीक. एम. एस्सी. पूर्ण करणे महत्त्वाचे कारण त्याशिवाय चांगली नोकरी मिळण्याची शक्यता नाही. माझे माहितीप्रमाणे एरोस्पेसचे सर्व अभ्यासक्रम हे इंजिनीअरिंगनंतर आहेत. इस्रोच्या वेबसाईटवर त्याची माहिती मिळू शकेल.

Story img Loader