स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या संधी आहेत. या अनुभवातून तुम्ही एखादा व्यवसाय किंवा अन्य संधीवर काम करू शकतात. तेही परीक्षा अनुत्तीर्ण होता आले नाही याचा न्यूनगंड न बाळगता. अशावेळी अनेक संधी तुमची वाट पाहत असतात. त्या हेरून त्यावर जीव तोडून काम करायला हवे. नाशिकच्या आदिवासी विकास विभाग आयुक्त नयना गुंडे यांनी दिलेला अनुभवी सल्ला. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या या आयुष्य बदलणाऱ्या असल्या तरी या परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. आजकाल मुलीही मोठ्या प्रमाणावर या परीक्षा देत आहेत. या परीक्षांसाठी लागणारा वेळ पाहता पालकांनी मुलींना वेळ द्यायला हवा. एका विशिष्ट वयात लग्न व्हायला हवे, हा अट्टाहास पालकांनी सोडून देत मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा देणे गरजेचे आहे. वास्तविक प्रशासकीय सेवेत विविध विभागातून योजना आकारास येत असतात. एखादी महिला त्या योजनांवर जास्त सक्षमपणे काम करू शकते, असा विश्वास आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे व्यक्त करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ’प्लॅन ए‘ बरोबर आपला ’प्लॅन बी‘ देखील तयार असायला हवा, असे त्या आवर्जून सांगतात. स्पर्धा परीक्षेच्या यशाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना देताना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी गुंडे यांनी स्पर्धा परीक्षांच्या वेगवेगळ्या आयामांकडे लक्ष वेधले. शाळेत असताना वडिलांनी सांगितले की, तुला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. त्यावेळी त्या काय असतात हे फारसे माहिती नव्हते. १९८०-९० चा काळ. तेव्हा स्पर्धा परीक्षांविषयी तशी फारशी माहिती नव्हती. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींचे प्रमाणही तसे कमीच होते. अशा स्थितीत केवळ वडील स्पर्धा परीक्षेबाबत सतत सांगत राहिल्यामुळे दहावीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. कला शाखेचा नियमित अभ्यास सुरू असला तरी सोबतीला अवांतर वाचन, सामान्य ज्ञानाविषयीची पुस्तके वाचत होती. बारावी परीक्षेत मंडळात प्रथम, कला शाखेच्या पदवी (बी. ए.) आणि पदव्युत्तर (एम. ए) अभ्यासक्रमात विद्यापीठात प्रथम आले. हा अभ्यास सुरू असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती. १९९० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यासाठी एमएचा राज्यशास्त्र तसेच इतिहास हे विषय घेतले होते. अभ्यासात सातत्य ठेवले. दिवसाला साधारणत: चार ते पाच तास अभ्यास सुरू असायचा. याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठी असणारी मासिके, महाराष्ट्र वार्षिक पुस्तिका, भारत वार्षिक पुस्तिका (इंडिया इयर बुक) पुस्तकांसह ‘कॉम्पिटिशन सक्सेस यु नो’ यांचेही वाचन केले. अथक प्रयत्नांची फलश्रृती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. या परीक्षेनंतर केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी तयारी केली. त्यासाठी ‘इन्स्टिट्युट ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन करिअर’ या शैक्षणिक संस्थेतही प्रवेश घेतला. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाने हुलकावणी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यात काम करायला मिळेल याचे समाधान असल्याने हेच काम पुढे कायम ठेवले. अनेकदा अशा परीक्षांमध्ये यश मिळतेच असे नाही. यासाठी ‘प्लॅन बी’ तयार असावा लागतो. मी एमएनंतर एम.फिल करणार होते. शिकवण्याची आवड असल्याने ‘लेक्चरशीप’ साठी प्रयत्न होते. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत ‘प्लॅन ए’ यशस्वी होतो असे नाही. त्यामुळे प्लॅन बीसह आपण कुठे थांबायला हवे, हे प्रत्येकाला कळायला हवे. दोन ते तीन प्रयत्नातही आपण उत्तीर्ण होत नसू तर कुठे तरी चुकते हे लक्षात यायला हवे. स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या संधी आहेत. या अनुभवातून तुम्ही मुलांसाठी ‘कोचिंग क्लास’, एखादा व्यवसाय किंवा अन्य संधीवर काम करू शकतात. तेही परीक्षा अनुत्तीर्ण होता आले नाही याचा न्यूनगंड न बाळगता. अशावेळी अनेक संधी तुमची वाट पाहत असतात. त्या हेरुन त्यावर जीव तोडून काम करायला हवे. स्पर्धा परीक्षा असो वा, अन्य कुठलीही संधी. ती साधण्यासाठी जिद्द आणि चिकाटीची जोड लागतेच, असा सल्ला गुंडे यांनी दिला आहे. १० ते १२ तासांचा अथक अभ्यास स्पर्धा परीक्षा म्हणजे, १० ते १२ तासांचा अथक अभ्यास. त्याला पर्याय नाही. अशा स्थितीत बऱ्याचदा ताण येतो. मात्र याबाबतीत मी सुखी होते. विद्यापीठाच्या परीक्षा देत असताना एमपीएससी झाले. यामुळे प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पिरियड) कमी झाला. या सर्व काळात वडील भक्कमपणे बरोबर होते. त्यांचे मार्गदर्शन असल्याने हा प्रवास सोपा झाला. सध्या स्पर्धा परीक्षांविषयी जास्त चर्चा होते. मुलांकडूनही बऱ्याचदा सांगितले जाते. सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला, जास्तीजास्त वेळ अभ्यासाला दिल्यास परीक्षेत यश हमखास मिळणार. या काळात शारीरिक तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची आहे. मी योगा, बॅडमिंटन, चालणे या माध्यमातून तंदुरुस्तीवर (फिटनेस) भर दिला. या परीक्षा दीर्घकाळाच्या असतात. त्यासाठी अभ्यास करताना बैठक लागते. या सगळ्यात तब्येत महत्त्वाची. व्यायाम केल्याने ऊर्जा मिळते, आकलन होण्यास मदत होते. एकाग्रता वाढते. यामुळे व्यायामावर भर द्यावा. पुढे ही सवय जीवनाचा भाग बनते, असे नयना गुंडे यांनी सांगितले. शब्दांकन - चारुशीला कुलकर्णी