यूपीएससी सारख्या परीक्षांचे जास्तीत जास्त दोन प्रयत्न विद्यार्थ्यानं पूर्ण वेळ अभ्यास करून द्यावेत. नंतरचे सर्व प्रयत्न देताना त्याच्या जवळ अर्थार्जनाचं एखादं भक्कम साधन असावं. विद्यार्थ्याची आर्थिक बाजू भक्कम असेल तरच मानसिक ताणापासून त्याची बऱ्याच प्रमाणात सुटका होऊ शकते, असा सल्ला दिला आहे पुण्यातील सहायक आयुक्त (प्राप्तिकर) श्रीकांत कुलकर्णी यांनी..

सातारा जिल्ह्यातल्याकऱ्हाड तालुक्यातलं गोळेश्वर माझं मूळ गाव. वडिलांच्या नोकरीमुळं माझं दहावी ते बारावी पर्यंतचं शिक्षण कऱ्हाडला झालं. बारावीचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे मला नव्वद टक्क्यांच्यावर गुण मिळाले. त्याकाळात हुशार विद्यार्थ्यांपुढं एकतर डॉक्टर नाहीतर इंजिनीअर होणं असे ठरावीक पर्यायच उपलब्ध असायचे. माझं गणित आणि भौतिकशास्त्र चांगलं असल्यामुळं झ्र ‘‘तू इंजिनीअरिंग कर. तुला चांगला स्कोप मिळेल, असा बारावीच्या निकालानंतर मला घरच्यांनी सल्ला दिला. त्यांचं ऐकून बारावी सी.ई.टी. देऊन पुण्याच्या सी.ओ.इ.पी. महाविद्यालयात ‘यांत्रिकी’ विषयात बी.टेक. साठी प्रवेश घेतला. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असताना, इंजिनीअरिंग व्यतिरिक्त करिअरच्या आणखी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. त्या वर्षी आमच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि तेराव्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष असलेल्या विजय केळकरांना कॉलेजनं एका परिसंवादासाठी बोलावलं. भाषणानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चेमुळं, सार्वजनिक धोरण तयार करण्याच्या ( Public Policy Making) क्षेत्रात मी देखील पुढे जाऊन चांगलं योगदान देऊ शकेन, असा मला विश्वास वाटला. या क्षेत्रात चांगल्या लोकांची गरज असल्याचं देखील त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. सार्वजनिक धोरण तयार करण्याच्या क्षेत्रात आणखी कुठले पर्याय आहेत, याचा मी विचार करायला सुरुवात केली. त्यावेळी यूपीएससी आणि इतर नागरी सेवांमध्ये सहभागी होणं हा एक चांगला पर्याय समोर आला.

यूपीएससी द्यायचा विचार मनात पक्का केल्यानंतरची गोष्ट. बी.टेक. सुरू असतानाच कॅम्पस प्लेसमेंट चालू झाली होती. माझी देखील एका कंपनीमध्ये निवड झाली होती. नोकरी सांभाळून एकीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल का? असा मला प्रश्न पडला. मी माझ्या वरिष्ठांना विचारलं. ‘‘तुझी ज्या कंपनीत निवड झाली आहे, तिथलं ‘वर्क कल्चर’ पाहता हे अवघड दिसतंय’’, त्यांनी मला सांगितलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळं मी पूर्णवेळ नोकरी करावी ही घरच्यांची अपेक्षा होती. त्यांची संमती मिळवायला त्यामुळे थोडा वेळ गेला. मोठा भाऊ त्यावेळी माझ्या बाजूनं खंबीरपणे उभा राहिला. तेव्हा कुठं घरचे कसेबसे मला नोकरी न करता आणखी एक दीड वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी द्यायला तयार झाले.

इतर स्पर्धा परीक्षाही देण्याचा निर्णय

अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासक्रमावर नजर टाकली. त्यावेळी माझ्या अभ्यासातल्या काही उणिवा आणि बलस्थानं लक्षात आली. मला इतिहासाची लहानपणापासूनचं गोडी होती. इतिहासाच्या अभ्यासाला निश्चित मर्यादा घालता येतात. इतिहासात काही वस्तुनिष्ठ गोष्टी असतात. लेखन कौशल्याला तिथं वाव असतो. महत्त्वाचं म्हणजे इतिहास कधीही बदलत नसल्यामुळं दरवर्षी अभ्यासासाठी त्यात नवीन गोष्टींची भर पडत नाही. यामुळं वैकल्पिक विषय म्हणून मी ‘इतिहासा’ची निवड केली. २०१३ हे पूर्ण वर्ष मी यूपीएससीच्या परीक्षेसाठी देणार होतो. जोडीलाच टढरउ, फइक, कइढर सारख्या परीक्षा देखील देण्याचं मी ठरवलं होतं. वरिष्ठांच्या सल्ल्यामुळं यूपीएससीच्या तयारीसाठी एक वर्ष मी दिल्लीला जायचं ठरवलं.

टेस्ट सिरीज’च्या वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन

दिल्लीला आल्यावर मी सामान्य ज्ञानाचा (General Studies) आणि वैकल्पिक विषयाचा पद्धतशीरपणे अभ्यास केला. पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या चाचणी मालिका (Test Series) लावल्या. ‘टेस्ट सिरीज’च्या वेळापत्रकाचं काटेकोरपणे पालन केलं. बरेचदा विद्यार्थी मोठ्या उत्साहात ‘टेस्ट सिरीज’ लावतात. परंतु त्यांच्या वेळापत्रकाचं मात्र ते काटेकोरपणे पालन करत नाहीत. त्यामुळे आपण अभ्यासात नेमके कुठे आहोत हे त्यांना कळत नाही. मी निवडलेल्या ‘इतिहास’ विषयाची व्यापी खूपच जास्त असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं सगळाच अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मी तयारीला लागलो. साहजिकच लेखन-सरावासाठी आणि मॅपिंगच्या तयारीसाठी मला पुरेसा वेळ देता आला नाही. या चुकीचं प्रतिबिंब माझ्या निकालात दिसलं. पूर्व परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होऊनही वैकल्पिक विषयांत खूप कमी मार्कं मिळाल्यामुळं मला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं नाही. यूपीएससी उत्तीर्ण होण्याच्या पहिल्या प्रयत्नावर अशा तऱ्हेनं पाणी पडलं.

लेखनाचा सराव महत्त्वाचा

दुसऱ्या प्रयत्नाच्यावेळी पहिल्या प्रयत्नात केलेल्या काही चुका मी सुधारल्या. उत्तर-लेखनाचा सराव केला. पेपर संपूर्ण सोडवण्यावर भर दिला. २०१५ मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झालो. मला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. मात्र मुलाखतीच्या सुरुवातीच्या प्रश्नालाच मी गडबडलो. त्यामुळे पुढच्या प्रश्नांची उत्तरं तितक्या आत्मविश्वासपूर्ण देऊ शकलो नाही. अशा तऱ्हेनं माझा दुसरा प्रयत्नही फसला. दुसऱ्या प्रयत्नाच्यावेळी ‘न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी’मध्ये मी नोकरीला लागलो होतो. मुलाखतीनंतर तिसऱ्या प्रयत्नाची पूर्व परीक्षा काही दिवसातच येत होती. नोकरी सांभाळून पूर्व परीक्षेच्या तयारीला वेळ देणं मला जमलं नाही. यूपीएससी पास होण्याचा माझा तिसरा प्रयत्नदेखील त्यामुळं निष्फळ ठरला. मात्र, पुढच्या प्रयत्नाकडे लक्ष द्यायला यामुळं मला थोडा अधिक वेळ मिळाला.

आर्थिक स्थैर्यामुळं तणाव कमी

चौथ्या प्रयत्नाच्या वेळी मी स्वत:कडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली. सकाळी उठून धावायला जाणं सुरू केलं. मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेणंही सुरू केलं. हातात नोकरी असल्यामुळं थोडंफार आर्थिक स्थैर्य होतं. आर्थिक स्थैर्यामुळं मनावर परीक्षेचा फारसा ताण आला नाही. यूपीएससी सारख्या परीक्षांचे जास्तीत जास्त दोन प्रयत्न विद्यार्थ्यानं पूर्ण वेळ अभ्यास करून द्यावेत. नंतरचे सर्व प्रयत्न देताना मात्र त्याच्या जवळ अर्थार्जनाचं एखादं भक्कम साधन असावं. विद्यार्थ्याची आर्थिक बाजू भक्कम असेल तरच मानसिक ताणापासून त्याची बऱ्याच प्रमाणात सुटका होऊ शकते. चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नांच्या वेळेला मी पूर्व परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो. मात्र, मुख्य परीक्षेच्या वेळी पुन्हा काही चुका झाल्या. त्यामुळे या दोन्ही प्रयत्नांत मी पुन्हा एकदा अयशस्वी झालो. आतापर्यंतच्या पाचही प्रयत्नांत यूपीएससी परीक्षेच्या लहरी स्वभावाचा चांगलाच अनुभव मला आला होता. मधल्या काळात, कोल्हापूरला ‘कर्मचारी भविष्य निधी’त मी नोकरीला लागलो होतो.

पाच वेळा परीक्षा देऊनही अपयश आल्यामुळं सहावा प्रयत्न करावा की नाही, वैकल्पिक विषय बदलावा की काय, असे विचार मनात यायला लागले होते. मी काहीकाळ परीक्षा देण्यापासून ‘गॅप’ घ्यायचं ठरवलं. २०२० मध्ये पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला. आता फक्त शेवटचा ‘सहावा’ प्रयत्न उरलाय तो संपवून टाकू अशी त्यामागे भूमिका होती. त्याकाळात ‘लॉकडाऊन’ लागला. ‘लॉकडाऊन’मुळं पूर्व-परीक्षा पुढं ढकलण्यात आली. या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ होतं.

ग्रुप स्टडी’चा फायदा

सहाव्या प्रयत्नाच्या वेळी मी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या आणखी दोघांबरोबर ग्रुप बनवला होता. आम्ही एकत्र ‘ऑनलाइन’ अभ्यास सुरू केला. सुरुवात आम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीनं केली. मुख्य परीक्षेमध्ये ‘उत्तर-लेखन’ हीच मुख्य गोष्ट असल्याचं आत्तापर्यंतच्या अनुभवातून लक्षात आलं होतं. म्हणून आम्ही उत्तर-लेखनावर भर दिला. आम्ही व्हिडिओ कॉल चालू करायचो. चालू व्हिडिओ कॉलमध्ये वेळ लावून उत्तरं लिहायचो. वेळ संपली की सर्वजण आपापली उत्तरं स्कॅन करून व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकायचो. एकमेकांच्या उत्तराचं मूल्यमापन करायचो. त्या उत्तराची तुलना ‘आदर्श उत्तरा’शी (Model Answer) करायचो. इंटरनेटवर अधिक माहिती मिळाली तर स्वत:च्या टिपणांमध्ये तिची भर घालायचो. अशा पद्धतीनं रोज दोन महिने आमचा हा उपक्रम सुरू होता. पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही पूर्व-परीक्षेच्या तयारीला लागलो. तरी रोजचा अर्धा तास उत्तर-लेखनाच्या सरावासाठी देत होतो. आम्ही पूर्व-परीक्षा पास झालो. त्यावेळी ‘लॉकडाऊन’ संपला.

मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलो. मुख्य परीक्षेसाठी कोल्हापूरच्या ‘प्री-आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटर’मधल्या सोयी-सुविधांचा फारच उपयोग झाला. रोज संध्याकाळी तिथे बसून आम्ही कमीत-कमी एक पेपर तरी सोडवायचोच. आम्ही ‘सामान्य ज्ञान’ आणि ‘वैकल्पिक विषयां’च्या ‘टेस्ट-सिरीज’ विकत घेतल्या. सोडवलेले पेपर त्यांना आम्ही तपासायला पाठवायचो. काही पेपरचे मूल्यांकन वरिष्ठांकडून करून घ्यायचो. अशा तऱ्हेनं अभ्यास करून मुख्य परीक्षा मी उत्तीर्ण झालो. मुलाखतीसाठी बोलावणं आलं.

आतापर्यंत नोकरीत मी चांगलाच रुळलो होतो. नोकरीमुळं एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्वातच एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. मुलाखतीच्या वेळी निश्चितच या गोष्टीचा सकारात्मक परिणाम झाला असावा, असं मला वाटतं. मुलाखतीसाठी डॅफ (DAF) पॅनलकडे असतो त्या प्रत्येक मुख्य सूचक शब्दावर (की वर्ड) वर मी नोंदी तयार केल्या. मुलाखतीत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यांना कशी उत्तरं द्यायची, या गोष्टींचं मनन केलं. ऑनलाइन ‘अभिरूप मुलाखती’ (mock Interviews) दिल्या. त्यांचे व्हिडिओज पाहून बोलण्यातल्या चुका सुधारल्या. मुलाखतीमध्ये चांगले मार्क्स मिळाले. माझी कफर साठी निवड होऊन ‘आयकर सेवे’साठी माझी नियुक्ती करण्यात आली.

मी IRS झालो नसतो तर विमा क्षेत्रातली नोकरी सुरू ठेवून त्यामध्ये प्रगतीच्या अधिक संधी शोधत राहिलो असतो. एकंदरीतच सामाजिक धोरणांमध्ये स्वत:चा सकारात्मक सहभाग देण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे निश्चितपणे वळावं, असं मला अगदी मनापासून सांगावसं वाटतं.

शब्दांकन : दुलारी देशपांडे