नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि दोन मुलांची आई आहे. मला दहावी मध्ये ६० आणि बारावी शास्त्रामध्ये ५९ तर संगणकीय पदवी मध्ये ७० टक्के मिळाले आहेत. लग्नानंतर दहा वर्षांच्या गॅपनंतर आता मी एमपीएससीसाठी अभ्यास सुरू केला आहे, तरी योग्य यशासाठी मला मार्गदर्शन करावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नलिनी कदम

आपल्या अभ्यासाच्या जिद्दीला सलाम. सध्याच्या गुणांच्या एकंदरीत तुलनेत आपले गुण कमी वाटले तरी ज्या काळात आपण ते मिळवले आहेत त्या काळातील चांगले होते. हे माझे मत मुद्दाम नोंदवत आहे. आपल्या हातात एमपीएससीसाठी तीन ते चार प्रयत्न असावेत, असे एकूण दिलेल्या माहितीवरून मी काढलेला निष्कर्ष. सर्व पदांसाठीची एकत्रित परीक्षा २०२५ साठी घेतली जाणार आहे त्याचा अभ्यासक्रम पुन्हा पुन्हा तीन वेळा वाचून काढा. आपल्या बारावीच्या व पदवीच्या कोणत्याही विषयाचा त्या अभ्यासक्रमाशी फारसा संबंध नसल्यामुळे त्याचा संपूर्ण आढावा व नकाशा डोक्यात बसणे गरजेचे आहे. पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होणे व मुख्य परीक्षेकरता पात्रता मिळवणे हे किमान ध्येय ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. त्या दरम्यान मुख्य परीक्षेसाठी काय काय लागते त्याची फक्त समग्र माहिती गोळा करून नोंदवून ठेवा. सलग अभ्यास होणे शक्य नाही हे गृहीत धरून ४० मिनिटांचे वाचन व त्यावरच्या नोंदी पुढील वीस मिनिटात काढणे अशा पद्धतीत दिवसातून सहा तास अभ्यास करता आला तरीसुद्धा आत्मविश्वास वाढेल. वृत्तपत्राचे वाचन, अग्रलेखाचे वाचन, करिअर वृत्तांतचे वाचन करून त्यावर स्वत:च्या टिप्पणी नोंदवणे व त्याची फाईल तयार करणे याचा खूप उपयोग होईल. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व नागरिक शास्त्र हे विषय आपल्या दृष्टीने दहावीनंतर विसरल्यात जमा आहेत. त्यांच्यासाठी जास्त प्रयत्न करणे गरजेचे राहील. जमल्यास घरातील कोणाशी तरी किंवा एखाद्या मैत्रिणींशी यावर चर्चा करणे हा चांगला रस्ता असू शकतो. आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : ‘पुष्पक’ लाँच व्हेईकलची यशस्वी चाचणी अणि श्रीनगरला मिळालेला ‘वर्ल्ड क्राफ्ट सिटी’चा दर्जा , वाचा सविस्तर…

मी नुकताच बी.टेक ९.०६ ने पास झालो ,परंतु लास्ट सेमीस्टर चालू असतानाच २ महिने एमपीएस्सी अभ्यास सुरु केला. परीक्षेमुळे दोन महिने गॅप पडला. आत्ता असं झालंय की पुण्याला जाऊ की घरीच अभ्यास करू. मनाची खूप वरखाली परिस्थिती झाली आहे. पुन्हापुन्हा असं वाटत कि सर्व सोडून द्यावं आणि कुठे तरी जॉब करावा आणि परत मग अभ्यास करत बसतो. नक्की काय करू.

अजय दत्त, पुणे.

डोके शांत ठेवून मिळेल त्या नोकरीला सुरुवात कर. तीन वर्षे सलग नोकरी करणे हा तुझ्यासाठीचा खरा राजरस्ता आहे. शेवटच्या सेमिस्टरच्या मार्कावर नोकरी मिळेल यावर विश्वास ठेव.मात्र पडेल ते काम करत शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. तीन वर्षे नोकरी करताना रोज एक तास प्रमाणे एमपीएस्सीचा अभ्यास नीट करून कदाचित पहिल्या प्रयत्नात यश मिळवशील व २६-२७ व्या वर्षी सरकारी नोकरी हाती येईल. इंजिनीअरिंग करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी एमपीएससीचा अभ्यास करण्याच्या अजिबात फंदात पडू नये असे माझे मत तुझ्या निमित्ताने येथेच नोंदवत आहे. मात्र पूर्व परीक्षा काय असते यावर लक्ष ठेवून रविवारचे दोन तासांचे किरकोळ वाचन करणे फायद्याचे राहते. करिअर वृत्तांतच्या या विषयावरील लिखाणाची फाईल तयार करून ठेवली तर ती सुद्धा सवडीने वाचणे शक्य असते. मूळ पदवीचे मार्क, मूळ पदवीचा अभ्यास, हा आयुष्यभराकरता उपयोगी पडणारा असतो. त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असते. काहीतरी प्रचंड बिघडले आहे हे विसरून जाणे तितकेच गरजेचे आहे.

मी २०१८ ला दहावी, नंतर माझा डिप्लोमा २०२१ मधे झाला ८२.४५ गुण होते. २०२४ मध्ये सिव्हिल मधे डिग्री झाली आहे. सीजीपी ७.३ आहे. माझा एमबीए करण्याचा विचार आहे. रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एन्व्हीरॉनमेंटल सस्टेनेबिलिटीमधे. ते करू का मी जॉब करावा? कृपया मार्गदर्शन करावे.

सुमीत चव्हाण

तू निवडलेले रियल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एन्व्हीरॉनमेंटल सस्टेनिबिलिटी या दोन्ही विषयात कामाचा अनुभव नसताना एमबीए केले तर नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही करता उपयुक्त ठरणार नाहीत. बी.टेक सिव्हिल नंतर चांगल्या प्रकाराच्या नोकऱ्या लगेच मिळत नाहीत. हे वास्तव जरी असले तरी वेगळे विषय म्हणून या दोनात जाण्यात अर्थ नाही. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यातील कोर्सेस तुला उपयुक्त ठरतात. केवळ माझे म्हणणे न ऐकता तू निवडलेल्या विषयातून पास झालेले विद्यार्थी शोधावेस. त्यांना भेटून योग्य तो निर्णय घेऊ शकशील.

आवाहन यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल.

आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70
Show comments