नमस्कार, मी चांदवडला राहते. एफ.वाय.बीएस्सीला आहे. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास मी सुरू केला आहे. सध्या मी एनसीईआरटीच्या नोट्स बनवीत आहे. पण कोणता विषय महत्त्वाचा ते मला कळत नाहीए. तसंच ही यूपीएससी अभ्यासाची योग्य वेळ आहे का याबाबतही कृपया मार्गदर्शन करावे. मी ब्रेक घेऊ का? मी गोंधळलेली आहे. यूपीएससीचा अभ्यास आणि माझा नियमित अभ्यास असे दोन्ही मी करीत आहे. याशिवाय आणखी एक प्रश्न म्हणजे माझे मराठी इंग्रजीपेक्षा चांगले आहे. मराठीतून परीक्षा द्यावी की नको?

विशाखा भडांगे

शास्त्र शाखेत पदवी घेत असतानाच ७५ टक्के मार्क मिळवणे हे एकमेव व कठीण असलेले ध्येय असावे. त्या दरम्यान यूपीएससी, एमपीएससी चा अभ्यास करणे फारच क्वचित शक्य होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नववी, दहावी, बारावीचे तुझे मार्क कळवलेले नाहीस. त्यामुळे तुला कोणतेही नेमके मार्गदर्शन करणे कठीण आहे. तू हा अभ्यास करण्यापेक्षा दर रविवारी तासभर यूपीएस्सी प्राथमिक परीक्षेसंदर्भातील वाचन तीन वर्षे करावे. पदवी दरम्यान तो किमान दीडशे तासाचा अभ्यास तुझा झालेला असेल. पदवीला सातत्याने ७५ टक्के मार्क मिळाले तर त्या रस्त्याचा नंतर विचार करावा. लवकर सुरुवात म्हणजे नक्की यश असे कधीच नसते. तर परिपूर्ण सुरुवात व योग्य वेळी सुरुवात याची गरज असते. म्हणून उत्तम मार्क मिळवत इंजीनियरिंग व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी पदवीनंतर याचा विचार करावा असे सुचवत आहे. परीक्षा कोणत्या भाषेतून द्यायची हे तुलाच ठरवायचे आहे.

हेही वाचा >>> BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ६९० पदांसाठी भरती; पगार एक लाखांपर्यंत, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

माझी मुलगी आता १०वीत आहे. तिला पुरातन शास्त्रामध्ये पुढील शिक्षण घ्यायचे आहे. पण मला काही त्यातील कळत नाही. त्यात पुढे काही भवितव्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. १० वीत तीला ९० गुण मिळतील अशी तिला खात्री आहे.

हितेंद्र केतकर अनेक मुलेमुली ऐकीव एकेक शब्द वापरतात व त्यात करिअर करायचे असे एकदम सांगून टाकतात. वाचनातून, गुगल करून किंवा घरच्यांच्या ओळखीतून अशा स्वरूपाच्या विविध करिअर शब्दांची पखरण सध्या अनेक घरात होत असते. सर्वात पॉप्युलर म्हणजे एआय, मशीन लर्निंग, रोबोटिक्स. त्या खालोखाल एस्ट्रॉनॉमी, एस्ट्रो फिजिक्स, स्पेस सायन्स,एरो नॉटिकल इंजिनिअरिंग यांचा नंबर लागतो. अॅन्थ्रोपॉलॉजी, आर्किऑलॉजिस्ट म्युझिऑलॉजी, सायकॉलॉजी याचाही उल्लेख मुले करतात. शालेय गुणांची वाटचाल व अभ्यास उत्तम असल्यामुळे पालक गडबडून जातात. आता या वरचा उपाय कसा शोधावा? त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. जे जे मुलांना करावे वाटते अशांची यादी बनवा, असे त्यांना सांगावे. कोणत्याही मुलाची अशी यादी आजवर पाचाच्या पलीकडे गेल्याचे माझ्या आठवणीत नाही. दहावीची परीक्षा झाल्यानंतर प्रत्यक्ष अकरावीचा प्रवेश घेईपर्यंत तुमचे हाती दहा आठवडे असतात. मुलांना जे जे करावे वाटते त्यातील माणूस शोधून त्याच्याशी गाठ घालून देणे, गप्पा मारणे, माहिती घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. दहा आठवड्यात पाच माणसे शोधणे कधीच कठीण नसते आणि जर असा माणूस सापडू शकला नाही तर त्याचा अर्थ ती करिअर ही पूर्णपणे अनवट व अवघड आहे हे पण मुलांना आणि पालकांना उलगडत जाते.आता तुमच्या प्रश्नाचेही थेट दोन वाक्यात उत्तर देतो. कोणत्याही विषयात पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर आर्किऑलॉजी, इंडॉलॉजीमध्ये प्रवेश घेता येतो. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे विद्यापीठात रूपांतर झाले आहे. तिथे डॉक्टरेट केल्यानंतर वयाच्या ३२ व्या वर्षी करिअर सुरू होते. इतिहास हा विषय पदवीसाठी घेतला तर हा रस्ता त्यातूनही जातो.