मी या वर्षी इयत्ता अकरावी वाणिज्य क्षेत्रात शिकत आहे.या पुढे सीईटी देऊन बीबीए किंवा बीएमएस करून Masters in HR or Post graduation diploma in project management यातच पुढे करिअर करण्याचा विचार आहे. परंतु यात मला काही शंका आहेत. मी ज्या करिअरचा विचार करीत आहे त्यात पुढील ६-७ वर्षांनी मला प्रगती मिळेल? बीबीए किंवा बीएमएस यातील कोणता कोर्स मला जास्त योग्य ठरेल? याशिवाय मॅनेजमेंट क्षेत्रात विविध पर्यायांची माहिती द्यावी ही विनंती. – मनस्वी परब

मनस्वी तुझे दहावीचे मार्क कळवलेले नाहीस. तसेच अकरावी, बारावीला गणित विषय ठेवला आहेस की नाही हेही कळवलेले नाहीस. एका ठोकताळ्यानुसार सांगायचे झाले तर दहावीला ८५ व गणितात ८५ मार्क असतील आणि इंग्रजी उत्तम असेल तर तुझ्या मनातील कोणतीही गोष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने तुझी क्षमता आहे असे म्हणता येईल. बीबीए किंवा बीएमएस या कोर्समध्ये फरक फार नाही. कॉलेज कोणते म्हणण्यापेक्षा प्रवेश परीक्षेतील मार्क किती यावर प्रवेश अवलंबून असतो उत्तम कॉलेजमध्ये प्रवेशाकरता पहिल्या हजारात तुला यावे लागेल. यंदाचे वर्षीपासून या सर्व अभ्यासक्रमांची एकत्रित प्रवेश परीक्षा घेतली जाते. तीन वर्षे सीजीपीए किमान ९.० चे पुढे राखला तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. एमबीएसाठी पुन्हा कठीण प्रवेश परीक्षा असते. त्यातील गुणांकनानुसार प्रवेश मिळतो. येत्या दोन वर्षात दहावीचे मार्क टिकवणे व वाढवणे यावर लक्ष केंद्रित कर. बारावीची परीक्षा झाल्यानंतर सीईटी देऊन तुझा पुढचा प्रवास सुरू होईल. त्याची तयारी करण्याकरता त्या वेळेला शंभर दिवस मिळतात. नोकरीतील अनुभवातून जे प्रगल्भ होतात ते प्रगती करतातच.

हेही वाचा >>> Success Story Of Satyam Kumar : सर्वात कमी वयात IIT मध्ये प्रवेश ते ॲपलमध्ये इंटर्नशिप; वाचा शेतकऱ्याच्या मुलाची यशोगाथा

मी सध्या FYBSc मध्ये शिकत आहे. मी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यास कुठे कुठे करियर करू शकते कृपया मार्गदर्शन करावे. – देवयानी अमर सावंत

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझे दहावी, बारावीचे मार्क व एफवाय बीएस्सीला घेतलेले विषय यातील काहीच माहिती दिलेली नाही. यानंतर तू कोणत्या विषयात पदवी घेणार आहेस याचाही उल्लेख नाही. तुझ्यासारखी सायन्स पदवीला प्रवेश घेणारी असंख्य मुले-मुली आहेत. त्यांच्यासाठी उद्देशून मी आता या पुढचे उत्तर देत आहे. गेली सुमारे दहा-पंधरा वर्षे स्थिती अशी आहे की इंजीनियरिंगसाठी पुरेसे मार्क मिळाले नाहीत किंवा तो अभ्यास झेपेल याची खात्री नाही, असेच विद्यार्थी बीएस्सीला जातात. शिवाय बारावीला गणित सोडून मेडिकलची प्रवेश परीक्षा देऊन हाती काही न लागणारे नाईलाजाने या रस्त्याला येतात. त्यामुळे पुढे काय करायचे याचा कोणताही विचार यापैकी ९९ टक्के विद्यार्थ्यांनी केलेला नसतो. महत्त्वाची बाब म्हणजे फिजिक्स व केमिस्ट्री हे दोन विषय किमान पातळीवर या सर्वांचे शिकून झालेले असतात. त्या दोन विषयांपैकी फिजिक्स हा कठीण विषय आहे. तो पदवीला घेणारे खूपच कमी. गणित नसेल तर तो विषय आणखी अवघड जातो. केमिस्ट्रीचे तसे नाही. केमिस्ट्रीतून पदवी घेतल्यानंतर विविध स्वरूपाच्या रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांमध्ये संधी उपलब्ध होतात. ज्यांनी गणित घेतले आहे त्यांनी संख्याशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांची जोड दिल्यास मागे पुढे त्यांना कॉम्प्युटर क्षेत्रात जाण्याची संधी उपलब्ध होते. बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पर्यावरण अशा चार-पाच विषयातून बायोमधील संधी सुरू होतात. मात्र त्यातील बहुतेक रस्ते संशोधनाकडे जात असल्यामुळे त्यातील पदव्युत्तर पदवी आवश्यक ठरते. या साऱ्याची माहिती घेण्यासाठी तुझ्या हाती अजून अडीच वर्षे आहेत. सध्या सर्व सेमिस्टरमध्ये किमान ७० टक्के गुण मिळवणे हे एकमेव ध्येय ठेवावेस. हे फक्त शास्त्र शाखेतून पुढे पदवी घेणाऱ्यांसाठीच्या करिअरबद्दल लिहिले आहे.