डॉ.श्रीराम गीत विविध शाखांत विविध पदव्या असतात किंवा आंतरशाखीय एकत्रित करून तयार झालेल्या पदव्या घेतल्या जातात. एक दोन उदाहरणातून हे स्पष्ट होईल. बीबीए या नावाने जे सात-आठ अभ्यासक्रम सध्या अस्तित्वात आहेत त्यातील अनेक अभ्यासक्रमांमध्ये सेल्स, मार्केटिंग, परचेस, थोडाफार फायनान्स, अकाउंटसचे किमान ज्ञान असे सारे खिचडी करून शिकवले जाते. मात्र, ही मुले जेव्हा प्रत्यक्ष कामाला जातात त्यावेळेला ‘विविध वस्तू भांडार’, अशी जुन्या नावाने ओळख असलेल्या एखाद्या मोठय़ा मॉलमध्ये त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते. पदवी घेत असताना पाच वर्ष फिरणे, भटकणे, मनसोक्त विंडो शॉपिंग करणे, थोडेफार खाणे तेही आई-बाबांचे कडून मागून घेतलेले पैशातून एवढाच उद्योग केलेल्या ठिकाणी म्हणजेच मोठय़ा मॉलमध्ये कामाला जावे लागते. भटकणाऱ्यांचा मोकळेपणा, मोकाटपणा, त्यांचे कपडे आणि क्वचित त्यांनी केलेला कल्ला या साऱ्याचा काम करताना पूर्णपणे अभाव असतो. मॉलच्या दरवानापासून मॅनेजर पर्यंत प्रत्येकाची शिस्त अत्यंत कठोर अशा स्वरूपाची असते. वेळा अत्यंत काटेकोरपणे पाडल्या जातात. फॉर्मल पण पाच वर्षांत फारसा कधी न घातलेला ड्रेस कोडचा स्वच्छ कपडा अंगावर घालून वापरावा लागतो. तोही आठवडय़ाचे सहा दिवस. जीन्स आणि टी शर्टला थारा नसतो. रविवार म्हणजे सुट्टीचा, भटकण्याचा, मजा करण्याचा वार.. हे गणित आयुष्यातून गायब झालेले असते. या उलट सारा मजा करणारा माहोल आणि पूर्णपणे त्यांच्या दिमतीला दिलेली ही नवीन पदवीधर व्यक्ती असा सकाळी नऊ ते रात्री नऊ बारा तासाचा स्वप्नात, कल्पनेत, नसणारा नाटकाचा पहिला अंक सुरू होतो. हेही वाचा >>> UPSC-MPSC : भूमी उपयोजन म्हणजे काय? महाराष्ट्रातील भूमी उपयोजनेचे स्वरूप कोणते? क्रिएटिव्हीटीतली पदवी दुसरे उदाहरण आपण मास कम्युनिकेशन या पदवीचे घेऊयात. कोणत्याही शाखेतील बारावीनंतरची ही तीन वर्षांची पदवी गेली दहाबारा वर्षे उपलब्ध आहे. यात एखादा विषय मुख्य असे न शिकवता माध्यमांशी संबंधित अनेक गोष्टींची तोंड ओळख करून देतात. त्यातील काम शिकवले जाते. एखाद्या चॅनेलवर किंवा एखाद्या सिने निर्मात्याकडे वा जाहिरात क्षेत्रात असा पदवीधर नोकरीसाठी जेव्हा निवडला जातो तेव्हा त्याच्याकडे खरे तर ‘हरकाम्या’ या नजरेनेच पाहिले जाते. कामाच्या दिवशी जो हजर नसेल त्याच्याकडचे वा तत्सम संदर्भातील छोटे-मोठे काम याच्याकडून करवून घेतले जाते. मात्र यांच्या मनातील, स्वप्नातील, कल्पनेतील आपण करायच्या कामाला अशा पद्धतीतील हरकाम्या म्हणून राबवले जाणे हे कायमच धक्कादायक ठरते. एवढेच नाही तर काहींना ते अपमानास्पद वाटायला सुरुवात होते. पण आज नामवंत म्हणून असलेले सर्वच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, सिनेमॅटोग्राफर, संवाद लेखक याच प्रक्रियेतून साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध सहन करत टक्के टोणपे खात पुढे गेले आहेत, त्यातूनच शिकत गेले आहेत हे कायमच विसरले जाते. असे सध्याचे विद्यार्थी आहेत. या दोन उदाहरणांमध्ये शिकण्याची चिकाटी दाखवली, काम करण्याच्या जागेतले सर्व बारकावे टिपून त्यातून व्यवसायाची किंवा कला निर्मितीची सारी प्रक्रिया समजून घेतली तर जी प्रगती होते, त्यातून जो आनंद मिळायला सुरुवात होतो ती असते त्या क्षेत्रातील स्पर्धेत धावण्यापूर्वीची तयारी. हेही वाचा >>> पूर्ण वेळ नोकरी करूनही पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा केली उत्तीर्ण अन् आयएएसचे स्वप्न केले साकार … प्रॅक्टिसचा अर्थ डॉक्टर काय करतात याचे उत्तर कायमच प्रॅक्टिस करतात असे दिले जाते. कारण प्रत्येक पेशंटकडून त्यांना नवीन अनुभव मिळतो. म्हणून त्यांची आयुष्यभर प्रॅक्टिसच चालू असते. तसेच कोणत्याही अन्य पदवीधराला पदवी मिळाली म्हणजे, ‘मला सगळे कळायला लागले’ या ऐवजी माझी या विषयातील मूळाक्षरे लिहून झाली आहेत, एखाद दुसरे वाक्य मला समजू लागले आहे. मात्र आता त्या वाक्यातून एखादा छोटासा, छानसा निबंध मला लिहिता येतो का? म्हणजेच काम जमते का? आणि त्या कामाला इतर जाणकारांची पावती मिळते का? यासाठी किमान दोन वर्षे लागतात. एखाद्याने पदव्युत्तर पदवी याच विषयात घेतली तरी या प्रक्रियेला कोणताही पर्याय नसतो. म्हणजेचं बीबीए नंतर एमबीए केले किंवा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली किंवा एमबीबीएसनंतर एमडीची पदवी मिळवली तरी कामातून शिकणे याला पर्याय नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे शिकून तयार झाल्यानंतर जो मिळतो तो ‘खरा पगार’ असतो. या अशा खऱ्या पगाराचे आकडेच कायम फक्त चर्चेत असतात. मग पदवीधर झालो म्हणून सारा गोंधळ सुरू होतो.