दहावी (७३ टक्के), बारावी (७४ टक्के), बीकॉम (७० टक्के) करुन मी पीजीडीबीएमच्या दुसरा वर्षाला शिकत आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये युके क्लाइंटच्या अकाउंट्सवर काम करत आहे. माझे वय २३ आहे. मी आणखी कोणते शॉर्टटर्म कोर्सेस करू शकते? याबाबत आपण मला योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.— सायली शिंदे

तुझे पीजीडीबीएम व्यवस्थित संपून जाईल. त्याचा कामात वापर करणे हेच शिकणे आहे. तुझ्या कंपनीचे कोणचे काम तू करत आहेस हे कळवले नसल्यामुळे त्याबद्दल मी काही लिहू शकत नाही. पण जर सॅलरी डोमेनमध्ये करत असशील तर एक्सेल वर प्रभुत्व मिळवण्याची गरज जास्त राहील. बहुतेक तुझे पीजीडीबीएम नोकरी सांभाळून चालले असावे. त्याचा लगेच उपयोग होईल असे नाही. अन्य कोर्स करावा असे आत्ता तरी काही सुचवत नाही.

मी यावर्षी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास हे विषय घेऊन बीएची पदवी घेतली आहे. तर रोजगाराभिमुख कोणता अभ्यासक्रम माझ्यासाठी उत्तम राहील सर? मला वाटते लॉ /सोशल वर्क यांपैकी एखादा अभ्यासक्रम पूर्ण करावा. आपण मला मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर कृषी विभाग संबंधित एखादा कोर्स उपलब्ध असल्यास त्याबद्दल देखील मार्गदर्शन करावे.- माधव शिंदे

मास्टर्स इन सोशल वर्क, मास्टर्स इन जर्नालिझम, या दोन्हीची चौकशी करावी. अभ्यासक्रम पाहावा व आवडेल तिथे प्रवेश घ्यावा. पाहिजे असल्यास लॉ चा अभ्यासक्रम सवडीने नंतर करता येईल. त्याचा लगेच नोकरी मिळण्याकरता फार फायदा होणार नाही. कृषीचा संबंध नाही.

मी बीई करून पीएसआय नोकरीत आहे. मला कंबाईन २०२५ ची तयारी करायची आहे.. त्याबाबत मार्गदर्शन हवे आहे. विषय कुठला निवडावा याबद्दल मार्गदर्शन करावे.- नेहा हांडे

आपले काम सांभाळून वेळ किती मिळतो यावर अभ्यासाचा विषय आणि कधी परीक्षा द्यायची याचा निर्णय अवलंबून आहे. २०२४ साल संपत आले असताना कम्बाईन २०२५ ची परीक्षा देणे हा एक पहिला प्रयत्न असू शकेल. करियर वृत्तांतचे वाचन सुरू ठेवा. एखाद्या तरुण अधिकाऱ्याला भेटून माहिती घ्या. काय करायचे यावर निर्णय आपणच घ्यावा.

नमस्कार सर, मला बीए मराठीला ४८ टक्के गुण आहेत, एमए राज्यशास्त्रला ५८ टक्के मिळाले. मी बीएच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच माझं लग्न झाले, आई वडील शेतकरी असल्यामुळे व आम्ही तिघी बहिणी आणि भावांमध्ये मी सर्वात मोठी असल्या कारणाने माझे लग्न माझी इच्छा नसताना झाले, मला अकरावीपासून स्पर्धा परीक्षेची थोडी थोडी माहिती मिळत गेली आत्ता झालेल्या सरळसेवा भरती मध्ये तलाठी दीड मार्काने रिझल्ट गेला. फॉरेस्ट मध्ये कागदपत्र तपासणीसाठी जाऊ शकले नाही. मला पाच वर्षांची मुलगी आहे. मी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये एमए अर्थशास्त्रसाठी प्रवेश घेतला आहे. घरी कंबाईनचा जमेल तेवढा अभ्यास करत आहे. इंग्लिशसाठी पण क्लास करत आहे. पुढल्या वर्षी प्लॅन बी म्हणून बीएडला प्रवेश घेण्याचा विचार करत आहे. माझे वय २७ पूर्ण आहे. कृपया योग्य मार्गदर्शन करावे.- पूजा घुगे ,पुसद

तुम्ही कळवलेला सर्व शैक्षणिक प्रवास नीट वाचला. तलाठी परीक्षेत आलेले अपयश पाहिले. खरे तर एमए करण्याचा नाद सोडून द्यावा. त्याचा उपयोग कुठेच होणार नाही. मात्र संसार सांभाळत नीट अभ्यास केला तर एखादी सरकारी पदाची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. झाल्या गोष्टी विसरून जाऊन येत्या तीन वर्षांकरता त्याची तयारी चिकाटीने सुरू करावी. बीएड नंतर शक्य आहे. त्यातील यशासाठी शुभेच्छा.

सर, सन २०२२ मधे विज्ञान विषय घेऊन बारावी पास झालो आहे. दोन वर्षे नीटची तयारी केली. २०२४ ला नीट मध्ये मला ३८५ गुण मिळाले परंतु मला बीएएमएस करावयाची इच्छा नाही. मी आता बीटेक आयटीला अॅडमिशन घेतलेले आहे. हा माझा निर्णय योग्य आहे का? कृपया सांगा.- यू.बी. तिरुखे.

तुझे १२ वी पीसीएमचे विषयवार मार्क माहीत नसल्यामुळे तुझा निर्णय योग्य का अयोग्य हे मी कसे सांगू? तुझे कॉलेज कोणते आहे, तुझा येत्या चार वर्षांचा सीजीपी नऊच्या पुढे आहे का? तू अभ्यास किती सखोल करतोस यावर तुला नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते. यातील कोणतीही गोष्ट नीट पूर्ण न झाल्यास नोकरीच्या शोधात हिंडणारे अनेकजण आहेत. या साऱ्यावर लक्ष दे, यश मिळेल.