रोहिणी शहा मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये भूगोल या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू. ● प्रश्न १. योग्य जोड्या जुळवा : शिखर, ठिकाण उंची (मीटर) अ. मांगी-तुंगी I) १५६७ ब. त्र्यंबकेश्वर II) १४१६ क. सप्तश्रृंगी III) १३०४ ड. साल्हेर IV) ११०० पर्यायी उत्तरे : (१) अ – IV; ब – III; क – II; ड – क (२) अ – III; ब – II; क – I; ड - IV (३) अ – II; ब – I; क – III; ड – IV (४) अ – I; ब – II; क – III; ड - IV ● प्रश्न २. पुढील विधाने योग्य की अयोग्य? ( a) शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. ( b) शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे हिश्श्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. पर्यायी उत्तरे : (१) ( a) आणि ( b) योग्य विधाने आहेत. (२) ( a) आणि ( b) योग्य विधाने नाहीत. (३) ( a) विधान चुकीचे आणि ( b) विधान योग्य (बरोबर) आहे. (४) ( a) विधान योग्य (बरोबर) आणि ( b) विधान चुकीचे आहे. ● प्रश्न ३. रायलसीमा पठाराचे स्थान ————————- येथे आहे. (१) कर्नाटक पठाराच्या उत्तरेला (२) कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला (३) कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला (४) कर्नाटक पठाराच्या पूर्वेला ● प्रश्न ४. जनगणना २००१ आणि २०११ प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे? (१) ०९ (२) ९० (३) १९ (४) २९ ● प्रश्न ५. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? (१) महाराष्ट्रातील दख्खनचे पठार (२) सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग (३) किनार पट्टीचे मैदान (४) मुडखेड टेकड्या ● प्रश्न ६. औद्याोगिक विभाग आणि औद्याोगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा : अ. नाशिक I. बुटीबोरी ब. कोल्हापूर II. शेंद्रा क. नागपूर III. विंचूर ड. औरंगाबाद IV. हुपरी पर्यायी उत्तरे : (१) अ – IV; ब – III; क – II; ड – I (२) अ – III; ब – I; क – II; ड - IV (३) अ – III; ब – I; क – IV; ड – II (४) अ – II; ब – IV; क – I; ड – II ● प्रश्न ७. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. कारण: ( a) ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. ( b) ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. ( c) ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. ( d) ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो. वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत? (१) ( b) आणि ( c) (२) फक्त ( b) (३) ( a) आणि ( d) (४) फक्त ( d) ● प्रश्न ८. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो ? (१) प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा (२) मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता (३) प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा (४) मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात. ● अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही गट ब आणि क साठी एकत्रित पूर्व परीक्षा असल्याने बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी झालेले दिसून येते. पण काठिण्य पातळी गट ब सेवांप्रमाणे पदवी परीक्षेची असल्याने सरळ सोट प्रश्नांची काठिण्य पातळीसुद्धा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता भासेल अशीच आहे. ● जोड्या लावा, कारणे - परिणाम या प्रकारांवर बहुविधानी प्रश्नांमध्ये भर दिलेला दिसून येतो. ● एका वाक्याचा/ शब्दाचा पर्याय असलेले छोटे प्रश्न सोडविण्यासाठीसुद्धा नेमकेपणाने मुद्दा माहीत असणे आवश्यक आहे हे लक्षात येते. ● प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक भूगोल, हवामान, कृषी भूगोल आणि भौगोलिक प्रक्रिया/घटना या घटकांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत. ● प्राकृतिक भूगोलामध्ये महाराष्ट्र आणि देश किंवा जागतिक भूगोल अशा दोन बाबींवर प्रश्न विचारलेले आहेत. ● लोकसंख्या शास्त्राचे मूलभूत मुद्दे आणि लोकंख्येची आकडेवारी अशा दोन्ही मुद्द्यांवर स्वतंत्र प्रश्न विचारण्यात येतात. ● आर्थिक भूगोलामध्येही मूलभूत/ पारंपरिक मुद्दे आणि तथ्यात्मक मुद्दे यांवर स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्यात येतात. सर्व उपघटकांना महत्त्व देऊन प्रश्नांची रचना करण्यात येते. त्यामुळे सर्व उपघटक कव्हर करणे आवश्यक आहे. या घटकाची तयारी कशी करावी हे पुढील लेखामध्ये पाहू.