विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालानंतर पुढील करिअर निवडत असताना वाणिज्य शाखेत जायचे की विज्ञान शाखेत याबाबत कायम गोंधळ असतो. निकालानंतर विविध कोर्स आणि त्यांच्या प्रवेश परिक्षा बाबत विविध माध्यमांवर माहिती उपलब्ध होते. त्यातून कोणता मार्ग निवडायचा, कोणती परीक्षा द्यायची असे नानाविध प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उपस्थित होत असतात. हा गोंधळ दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वत:चे मूल्यांकन करा. मूल्यांकन प्रक्रिया करताना तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, तुमचे स्वारस्य कशात आहे याचा विचार करा. हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : नर्सिंग डिप्लोमा करण्याची संधी आपल्यात कोणती कौशल्ये आहेत ते जाणून घ्या. आपल्या आवडीनुसार कामाची कोणती क्षेत्र आहेत म्हणजेच संभाव्य व्यवसाय कोणते आहेत, त्याचे तपास करा. त्याप्रमाणे आपल्याला नेमकी कोणती परीक्षा द्यायची आहे, त्याची यादी करा आणि त्याआधारे विद्यापीठांची निवड करा. परदेशी शिक्षणाच्या संधी बाबत विचार करताना भारतात ज्याप्रमाणे विविध विषयांवर आधारित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे परदेशातही हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावे. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाण्याची स्वप्न पाहत असतात. मात्र, पदवी शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास दहावी, अकरावी आणि बारावीचे शिक्षण महत्त्वाचे भूमिका बजावतात. त्यामुळे त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आधीपासूनच तयारी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे मुख्य विषय ठरवावे. विविध विद्यापीठांबद्दल संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिती मिळवा. त्याकरिता अनुभव महत्त्वाचे असतात. अनुभव मिळवण्यासाठी इंटर्नशिप करणे गरजेचे आहे. तसेच, सॅट आणि अॅक्ट (एसीटी) परीक्षा द्यावी. आपली कौशल्ये कशी विकसित होतील त्या दृष्टीने प्रयत्न करा. दहावीच्या परीक्षेनंतर असलेल्या वेळाचा यावेळी उपयोग करा. उन्हाळी शिबिरात सहभागी व्हा. स्वत:ला विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.