लोकेश थोरात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागरी सेवा मुख्य परीक्षेत महत्त्वाच्या असलेल्या सामन्य अध्ययन पेपर १ मधील भूगोल विषयासंबंधी लेखमालिकेची सुरुवात आपण करत आहोत. या लेख मालिकेत आपण भूगोल या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणार आहोत. नागरी सेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत यांमध्ये भूगोल विषयाचे महत्त्व आत्यंतिक आहे. मागील लेख मालिकेमध्ये आपण पाहिले की, पूर्व परीक्षेत भूगोल व पर्यावरण या विषयांवर सुमारे २०-२५ प्रश्न विचारले जातात जे सामान्य अध्ययन पेपरमधील एकूण प्रश्नसंख्येच्या एक चतुर्थांश आहेत. मुख्य परीक्षेमध्येही भूगोल व पर्यावरण या विषयांचे महत्त्व जास्त असलेले दिसते. मुळातच भूगोल हा असा विषय आहे की तो परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासोबतच तुमची निवड झाल्यानंतरही कामी येतो. तुमच्या मुलाखतीवेळी तुम्ही ज्या राज्यातून येता, ज्या प्रादेशिक विभागातून येता, तुमचा जिल्हा, तुमच्या प्रदेशातील कृषी प्रारूप, उद्याोग, भौगोलिक वैशिष्ट्ये या व अशा कित्येक गोष्टी तुम्हास माहिती असणे महत्त्वाचे आहे. तुमची नागरी सेवेमध्ये निवड झाल्यानंतरही तुमच्या नियुक्तीचे राज्य, जिल्हा किंवा प्रदेश याचीही सर्वसामान्य भौगोलिक माहिती तुम्हास माहिती असणे गरजेचे आहे. नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेमध्ये चाळणी केलेले उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतात. मुख्य परीक्षेतून पुढे चाळणी करून विद्यार्थी मुलाखतीस पात्र होतात व त्यातील काही विद्यार्थी शेवटी निवडले जातात. परीक्षांच्या तीनही टप्प्यांमध्ये मुख्य परीक्षेचा टप्पा हा सर्वांत महत्त्वाचा असतो. कारण, १७५० गुणांसाठी होणाऱ्या या परीक्षेतील गुण व मुलाखतीचे २७५ गुण या दोन्हीच्या एकत्रीकरणातून शेवटी तुमचा निकाल लागतो व निवड होते. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या तयारीस वेळ देणे, त्याची रणनिती आखणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे त्यांनी पूर्व परीक्षा झाल्यानंतर लगेचच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करणे गरजेचे आहे. बरेचसे विद्यार्थी पूर्व परीक्षा झाल्यावर मी पूर्व परीक्षा पास होईल की नापास या साशंकतेपोटी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करत नाहीत किंवा पूर्व परीक्षेचा निकाल येईपर्यंत त्यांच्याकडून अभ्यास होत नाही. माझ्या मते ही खूप मोठी चूक असते. कारण, पूर्व परीक्षेचा दिनांक व तिच्या निकालाचा दिनांक यांमध्ये साधारणत: ४५ ते ६० दिवसांचा अवधी असतो. २०२३ मध्ये हा कालावधी फक्त १५ दिवसांचा होता. बहुतांशी विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या निकालाबाबत साशंक असतात. ती या कालावधीत अभ्यास करत नाहीत किंवा तो होत नाही. मग जेव्हा पूर्व परीक्षेचा निकाल येतो व विद्यार्थी पास होतात तेव्हा मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी फार कमी वेळ राहतो व त्याचा विपरीत परिणाम मुख्य परीक्षेच्या तयारीवर होतो. म्हणून माझे असे मत आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली आहे त्यांनी १-२ दिवसांच्या सुट्टीनंतर लगेच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागावे. जरी दुर्दैवाने तो उमेदवार पूर्व परीक्षेत नापास झाला तरीही हा कालावधी अभ्यासासाठीच सत्कारणी लागलेला असतो. त्यातून वेळेचा अपव्यय टाळला जातो. आता आपण भूगोल विषयाच्या मुख्य परीक्षेच्या तयारीकडे वळूया. सर्वप्रथम भूगोल विषयाचे स्वरूप, व्याप्ती व महत्त्व याविषयी चर्चा करू. मुळातच भूगोल हा एक शास्त्रीय किंवा निमशास्त्रीय विषय असून यामध्ये कला शाखा व विज्ञान शाखा यांचे एकत्रीकरण दिसते. प्राकृतिक भूगोलाचा भाग विज्ञान शाखेकडे झुकलेला दिसतो तर, मानवी भूगोल कला शाखेकडे झुकलेला दिसतो. मुख्य परीक्षेचा बहुतांश अभ्यासक्रम पाहिल्यास त्यामध्ये वरील दोन्हीही विभागांचे संतुलन आढळून येते. अभ्यासाच्या दृष्टिने प्राकृतिक भूगोल हा विद्यार्थ्यांना तुलनेने कठीण वाटणारा विभाग असून येथे खूप साऱ्या संकल्पनांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. खरे म्हणजे भूगोल विषयाच्या तयारीमध्ये बहुतांशवेळ हा प्राकृतिक भूगोलाच्याच तयारीस लागतो. आपणास माहिती आहे की, भूगोल हा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एकमधील एक उपघटक आहे. परंतु इतर विषयांसोबतही भूगोलाची परस्परव्याप्ती दिसून येते. सामान्य अध्ययन पेपर दोनमधील आंतरराष्ट्रीय संबंध समजण्यासाठी भूगोलाची आवश्यकता असते. उदा. सध्या चर्चेत असणाऱ्या इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचा अभ्यास करताना पश्चिम आशियाची भौगोलिक परिस्थिती, देशांचे स्थान, त्यांच्या सीमा या अॅटलासमध्ये पाहणे व अभ्यासणे गरजेचे आहे. हिंदी महासागराचे भूराजकारण अभ्यासताना हिंदी महासागरालगत असणारे देश, महत्त्वाच्या सामुद्रधुण्या, बेटे, सागरीमार्ग यांची माहिती अॅटलासमध्ये पहावी लागते. सामान्य अध्ययन पेपर तीनमध्येही भूगोलातील काही उपघटक येतात जसे, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी इत्यादी. यातील कृषी घटकावर ५० गुण व पर्यावरण-आपत्ती व्यवस्थापन यावर अनुक्रमे ३० व ५० गुण हे या पेपरमध्ये येतात. म्हणजेच सामान्य अध्ययन पेपर तीन मधील २५० गुणांपैकी ८० ते १०० गुण हे भूगोलाशी संबंधित उपघटकांतून येतात. आता आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एककडे वळू या. यामध्ये इतिहास, कला व संस्कृती व समाज या विषयांसोबत भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो. या पेपरमध्ये ३० गुणांचे व ३५ गुणांचे एकूण २० प्रश्न असलेले सर्वसाधारणपणे दिसतात. हे सर्व २० प्रश्न २५० गुणांसाठी असून खालील तक्त्यावरून भूगोल या विषयासाठी आलेल्या गुणांचा अंदाज घेता येतो. सर्वसाधारणपणे, भूगोल विषयातून २५० पैकी १००-११० गुण आलेले दिसतात. म्हणजेच या पेपरचा सुमारे ४० टक्के भाग हा केवळ भूगोल विषयाने व्यापलेला आहे. जर सामान्य अध्ययन पेपर तीनमधील कृषी, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापनाच्या उपघटकांचे गुणही आपण विचारात घेतले तर सामान्य अध्ययनाच्या सर्व चार पेपरच्या १००० गुणांमध्ये भूगोल व संलग्न उपघटकांचा वाटा १८० ते २०० गुणांचा म्हणजेच १८ ते २० टक्के इतका किंवा एक पंचमांश इतका आहे. यावरूनच भूगोल विषयाचे महत्त्व अधोरेखित होते.