Success Story: जितेंद्र मान हे पूर्वी आयटी कंपनी ‘टीसीएसम’ध्ये काम करायचे. परंतु, ते काम करताना प्रदूषण आणि रसायनयुक्त अन्नाचा त्यांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात आला आणि त्यांनी आपल्या पत्नीच्या सहमतीने गावी परतण्याचा निर्णय घेतला. अभियंता असलेल्या जितेंद्र यांनी गावी परतण्यासाठी २०१७ मध्ये ‘टीसीएस’मधील नोकरी सोडली आणि आपल्या पत्नीसह ते हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील महमूदपूर या त्यांच्या गावी परतले. गावी येऊन त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात जितेंद्र यांची वडिलोपार्जित दोन एकर जमीन होती. या जमिनीवर जितेंद्र आणि त्यांची पत्नी सरला यांनी शेवग्याची शेती करण्याचा निर्णय घेऊन, त्या दिशेने त्यांनी काम करायला सुरुवात केली. आज ते दोघेही ‘पती पत्नी फार्म’ या ब्रॅण्डखाली शेवग्याची अनेक उत्पादने विकतात. त्याशिवाय या व्यवसायातून ते लाखोंची कमाई करतात.

शेवग्याची शेती करण्याचे कारण काय?

शेवग्याचे हे झाड लवकर वाढते. तसेच ते दुष्काळही सहन करू शकते. त्यामुळे जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीने शेवग्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. शेवगा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शेवग्याच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, पोषक व औषधी गुणधर्म असतात. शेवग्याची पाने आणि त्यांची पावडर आरोग्यदायी फायद्यांमुळे सुपरफूड मानली जाते. तसेच शेवग्याच्या शेंगाही भारतात मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. जितेंद्र मान आणि त्यांची पत्नी सरला यांनी शेवग्याची पाने पावडर आणि कॅप्सूलमध्ये रूपांतर करून, विकण्यास सुरुवात केली. ते दरवर्षी १०,००० किलो शेवग्याच्या पानांची कापणी करतात. ही कापणी वर्षातून सुमारे चार वेळा केली जाते.

खरे तर, जितेंद्र मान यांनी गावी जाऊन शेती करण्यापूर्वी त्यांना त्यांच्या बेंगळुरूच्या मित्राकडून शेवग्याची काही रोपे मिळाली होती. त्यांनी त्यांची दिल्लीतील घराच्या टेरेसवरील बागेत लागवड केली. गावी जाताना जितेंद्र यांनी त्या रोपांच्या बिया हरियाणाला नेल्या आणि शेवग्याच्या लागवडीसाठी जमीन तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जमीन सेंद्रिय शेतीसाठी योग्य केली. आज जितेंद्र महमूदपूरमध्ये १० एकरांवर शेवगा पिकवतात. शेवग्याची पावडर आणि कॅप्सूल बनवतात. हे उत्पादन ‘पती पत्नी फार्म’ या ब्रॅण्डखाली फक्त देशातच नाही, तर विदेशांतही विकले जाते. त्यामध्ये ब्रिटन, कॅनडा व यूएईचा समावेश आहे.

हेही वाचा: Success Story: झोपडीत राहिले, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला; अनेक अडथळ्यांवर मात करून झाले डीएसपी

वर्षाला लाखोंची कमाई

सुरुवातीला जितेंद्र आणि सरला या दाम्पत्याने शेवग्याची ही पावडर गावकऱ्यांना दिली. त्या पावडरीच्या सेवनाने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर या उत्पादनाचे मार्केटिंग सुरू केले. हिवाळ्याच्या दिवसांत जितेंद्र आणि सरला शेवग्याच्या झाडांसह बीटरूटचीही लागवड करतात आणि बीटरूट पावडर बनवतात. त्याचे वार्षिक उत्पादन लाखोंच्या घरात आहे.