Success Story: आज आम्ही एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या आयएएस अधिकाऱ्याचा खडतर प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत. या अधिकाऱ्याचे नाव जयगणेश असे असून, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक कठोर परिश्रम करून UPSC उत्तीर्ण केली. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

एकेकाळी जयगणेश महिन्याला २५०० रुपयांवर काम करून कुटुंबाला हातभार लावायचे. ते तमिळनाडूतील वेल्लोर भागातील विन्नमंगलम येथील रहिवासी आहेत. जयगणेश यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच अडचणींनी भरलेले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील एका कारखान्यात कमी पगारावर काम करायचे. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे लवकर शिक्षण पूर्ण करून, कोणती तरी नोकरी करावी, असे जयगणेश यांना वाटायचे. गावातील शाळेतून आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती.

चित्रपटगृहाच्या हॉलमध्ये २,५०० पगाराची नोकरी

त्यानंतर जयगणेश यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेऊन थंथी पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, त्यांनी शहरातील सत्यम चित्रपटगृहात हॉलमध्ये दरमहा २,५०० रुपये पगारावर नोकरी करायला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी जयगणेश यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून, आयएएस अधिकारी व्हायचे ठरवले. त्यावेळी त्यांनी चित्रपटगृहाची नोकरी सोडली आणि परीक्षेची तयारी सुरू केली.

मात्र, यूपीएससीची तयारी सुरू असतानाही त्यांना घरची आर्थिक परिस्थिती स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना चेन्नईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करावे लागले. या नोकरीतही त्यांचा पगार कमी होता; पण हे काम करताना त्यांना अभ्यासासाठीही वेळ मिळाला. काही काळानंतर जयगणेश यांनी वेटरची नोकरी सोडली आणि त्यांनी स्वत:ला संपूर्ण वेळ यूपीएससीच्या तयारीसाठी वाहून घेतले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते.

हेही वाचा: Success Story: दिवस सारखे नसतात! ट्रक ड्रायव्हर झाला यूट्यूबर; मेहनतीच्या जोरावर महिन्याला कमावतो लाखो रुपये

सहा वर्षे अपयशाचा सामना

जयगणेश यूपीएससीच्या तयारासाठी खूप मेहनत घेत होते. पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी सलग सहा वर्षे जयगणेश यांना यूपीएससी परीक्षेत नामुष्कीच सहन करावी लागली. मात्र, एवढी वर्षे अपयशाचा सामना करूनही त्यांनी हार मानली नाही. या काळातही विविध नोकऱ्या करीत त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. अखेर २००८ मध्ये जयगणेश यांनी UPSC परीक्षेतील सर्व आव्हानांवर मात केली आणि १५६ वा क्रमांक मिळवून, जिद्दीच्या जोरावर माणूस यशश्री आपल्याकडे खेचून आणू शकतो हे दाखवून दिले.