Success Story of Shiva Chavan: सरकारी नोकरी मिळावी हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप जण धडपड करीत असतात. त्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत घेतात. प्रत्येकाची अनेक स्वप्ने असतात. परंतु, काही कारणांनी, परिस्थितीमुळे आपल्याला वेगळा मार्ग निवडावा लागतो. अनेकदा आपल्याला स्वप्न सोडून नोकरी करावी लागते; तर काही जण लागलेली चांगली नोकरी सोडून वेगळा उद्योग, व्यवसाय करतात. अनेक जण काहीतरी वेगळा विचार करतात आणि स्वप्न पूर्ण करतात. भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपला स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि त्यात यशाचं शिखर गाठलं. असाच एक व्यावसायिक सर्वसाधारण कुटुंबात नाशिक येथे जन्मलेला तरुण महिन्याला बक्कळ पैसा कमावतोय.
व्यवसायासाठी त्याने सरकारी नोकरी सोडली; मात्र त्याला लोकांनी वेड्यात काढले. पण, त्याचा निर्णय योग्य होता हे त्याने सिद्ध करून दाखवले. हे सर्व त्यांनी आपल्या मेहनतीतून आणि जिद्दीनं मिळवलं आहे. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊ…
ही गोष्ट आहे अभ्यासात नेहमीच हुशार असलेल्या नाशिकच्या शिवा चव्हाण नावाच्या तरुणाची. शिवा नाशिक येथील मखमला गावात राहतात. शिवा चव्हाण सरकारी एसबीआय या बँकेत नोकरीस होते; परंतु शिवा चव्हाण यांनी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एसबीआय बँकेतील नोकरी सोडून पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांचा ‘ओम गुरुदेव पाणीपुरी सेंटर’ हा एक कौटुंबिक व्यवसाय असून, आज त्यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी या व्यवसायात काम करीत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाणीपुरी हा शिवा चव्हाण यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. या व्यवसायात येण्यापूर्वी ते नाशिकमधील सरकारी एसबीआय बँकेत काम करीत होते. त्यांना या व्यवसायात यायचे नव्हते; पण त्यांनी त्यांच्या वडिलां स्वप्न पूर्ण करण्या साठी पाणीपुरीच्या व्यवसायात पाऊल ठेवले आहे.
लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा
शिवा चव्हाण या तरुणाला लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. बोलताना म्हणाले, “शिक्षण घेत असताना मला वाटत होते. आपण काहीतरी नवीन करू. कारण- घरातील सर्व मंडळी पाणीपुरी हा एकच व्यवसाय करीत होते. त्यामुळे मला काहीतरी नवीन करायची इच्छा होती. कुठेतरी चांगली नोकरी मिळेल या हेतूने मी पुढे पुढे जात राहिलो. परंतु, माझ्या वडिलांनी जे सांगितले, ते मी केले. याचा मला अभिमान वाटतो. कारण- आज जो कोणी येतो, तो सरकारी नोकरी शोधत असतो. पण, मी ते नाकारले आणि आज माझे वडीलही आनंदी आहेत की, मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे.
मी बँकेत नोकरी करत असताना मला सुमारे २२ हजार रुपये पगार मिळत असे. पण, आज मी स्वतः काही तास काम करून महिन्याला ६० ते ७० हजार रुपये कमवत आहे. त्यांनी तरुण पिढीला सल्ला दिला की, जर तुम्हीही कोणत्याही परिस्थितीवर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. त्यांनी सर्वांना सांगितले की, नोकरीच्या शोधात तुमचे वय वाढवण्यापेक्षा कोणताही व्यवसाय करा. मग तो व्यवसाय लहान असला तरीही व्यवसायच करा, असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला.