अलीकडेच नेटफ्लिक्सवर ‘द हंट फॉर वीरप्पन’ हा लघुपट प्रसिद्ध झाला. वन सेवेतील अनेक आव्हाने यानिमित्ताने समोर आली. वीरप्पन सारख्या अनेक तस्करांशी वन अधिकाऱ्यांना सामना करावा लागतो. अशाच वीरप्पनच्या गोळ्या कर्नाटक राज्यातील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक ब्रिज किशोर सिंह यांनी झेलल्या आहेत. केवळ युपीएससीची परीक्षा देणे, त्यात उत्तीर्ण होणे, याच्या पलीकडेही अधिकारी म्हणून अनेक कर्तव्ये असतात. त्या कार्यकाळात असे अनेक वीरप्पन आयुष्यात भेटतात आणि त्यांच्याशी सामना करावा लागतो. इंडियन एक्सप्रेसच्या मानस श्रीवास्तव यांनी बी. के. सिंह यांच्याशी संवाद साधला. बी. के. सिंह यांच्यानिमित्ताने वन अधिकारी होतानाची आव्हाने, जंगलातील रोमांचक गोष्टी, भारतीय वन सेवा यांबाबत जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिज किशोर सिंह हे कर्नाटकचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत. त्यांना ‘कर्नाटक वन विभागाचे हिरो’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्यांच्या वन अधिकारी सेवा कारकिर्दीतील मोठी मोहीम म्हणजे, चंदनाची तस्करी करणाऱ्या लोकांविरुद्ध त्यांनी केलेली कारवाई होय. या कारवाईत दोन पोलीस जखमी झाले होते. बी. के. सिंह यांच्या ‘डिस्ट्रॉय फॉरेस्ट्स डिस्ट्रॉय लाइफ’ या पुस्तकात या ऑपरेशनविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.

भारतीय वन सेवांबद्दल…

भारतीय वन सेवा ही केंद्र सरकारच्या तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) हे इतर दोन आहेत. युपीएससी या परीक्षा आयोजित करते. भारतीय वन सेवा परीक्षांमध्ये बसण्यासाठी उमेदवाराला विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी आवश्यक आहे. परीक्षांच्या बदललेल्या पॅटर्नमुळे विज्ञान आणि अभियांत्रिकी पार्श्वभूमीतील अनेक विद्यार्थी भारतीय वन सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा या दोन्हींसाठी पात्र ठरतात. त्यामुळे विज्ञान शाखा निवडलेल्या परंतु, भारतीय सेवांमध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे.


वीरप्पन आणि बी. के. सिंह…

बी. के. सिंह यांनी त्यांच्या वन अधिकारी असतानाच्या कार्यकाळात चंदनाची तस्करी करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई केली. या थरारक कारवाईविषयी ते म्हणतात, ”६ जानेवारी, १९९० चा एक प्रसंग सांगतो. मी उपवनसंरक्षक (डीसीएफ) असतानाची ही गोष्ट आहे. मी म्हैसूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) (बिपिन गोपाल कृष्णा), दोन्ही विभागांचे कार्यक्षेत्र अधिकारी आणि राखीव पोलीस कर्मचारी असे एकूण सुमारे ५० जण गौधल्ली रेंजच्या सिल्वेकल नावाच्या ठिकाणी एका माहितीदारासह मोठ्या प्रमाणात साठवलेल्या चंदनाच्या लाकडाचा शोध घेण्यासाठी गेलो. पालार नदीच्या डाव्या तीरावर कर्नाटकात हा साठा लपवून ठेवल्याचे माहितीदाराकडून समजले होते. मी आणि माझ्या कर्मचार्‍यांनी माहिती देणाऱ्याच्या मदतीने साठा शोधला, पण आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले. साठा जप्त करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, वन आणि पोलीस कर्मचारी नदीच्या पात्राजवळ जमले आणि चंदन शोधण्यासाठी आणि जप्त करण्यासाठी पुढील धोरण आखत होते. त्याच क्षणी, वीरप्पनच्या टोळीच्या सदस्यांनी तामिळनाडूच्या बाजूने नदीच्या कडेला असलेल्या डोंगरावरून आमच्यावर गोळीबार केला. पालार नदी ही कर्नाटक आणि तामिळनाडूची सीमा आहे. ही घटना लक्षणीय आहे. कारण, कर्नाटक पोलिसांवर पहिल्यांदाच गोळीबार झाला होता आणि गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले होते. आम्ही आमच्या जीपकडे धावलो आणि आम्ही घेतलेल्या सात जीपच्या टायरच्या मागे तोंड झाकून बसलो. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी शत्रूला न पाहता गोळीबार केला. आमच्याकडे दोन जखमी पोलीस असल्याने आम्ही जीपमध्ये चढलो आणि तिथून निघालो.

हेही वाचा : सांडपाणी ठरू शकते पाणी टंचाईवरील उपाय? काय सांगते संशोधन…


२२ फेब्रुवारी, १९९० रोजीच दोन राज्यांचे वन आणि पोलीस कर्मचारी पुन्हा एकत्र आले. या वेळी तामिळनाडू पोलिसांना अधिक माहिती देणारे होते आणि सिल्वेकल येथून ६५ मेट्रिक टन चंदन जप्त करण्यात आले. ३२ मेट्रिक टन कर्नाटकात आणि ३३ मेट्रिक टन तामिळनाडूत आले. घटनास्थळावरून चंदनाची वाहतूक दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. या कारवाईचा बदला वीरप्पन यांनी तामिळनाडूच्या दोन बस जाळून घेतला. ९ एप्रिल, १९९० रोजी कर्नाटक वन आणि पोलीस कर्मचारी एका जीपमध्ये आराम करण्यासाठी होगेनक्कल येथे गेले होते. तिथे त्यांचा पाठलाग करत वीरप्पन आणि टोळीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला. चंदनाची तस्करी करणाऱ्या लोकांबाबतची ही मोठी कारवाई होती.”
बी के सिंह यांनी पुढे सांगितले की, ” चंदनाची तस्करी करणारे वीरप्पन कावेरी नदीच्या दोन्ही बाजूला कर्नाटक आणि तामिळनाडूच्या विस्तीर्ण आणि विस्तृत जंगलात कार्यरत होते. ही जंगले डोंगराळ रांगेत आहेत, तिथे जाण्यास रस्ते नाहीत. लपण्यास अनेक जागा आहेत. या वीरप्पनना चंदन लपवून ठेवण्यासही बऱ्यापैकी जागा इथे आहेत. १९९० च्या काळात गावे-नागरी वस्तीही बऱ्यापैकी कमी होती. फेब्रुवारी १९९० मध्ये चंदनाचा मोठा साठा आणि जप्ती आणि परिणामी वीरप्पन आणि टोळीने केलेल्या अनेक हल्ल्यांनंतर दोन्ही राज्यांनी पोलिसांची संख्या वाढवली. सुमारे १५ वर्षांच्या लढाईत, वीरप्पनने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना, पोलिसांना मारले. अनेक वेळा त्यांच्यावर हल्लेही केले. जंगलामध्ये गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागलेला.
वीरप्पनच्या या एकूण कृतींवरून आम्हाला काही गोष्टी समजल्या. वीरप्पनशी लढा देताना त्यांच्या मोक्याच्या जागा ओळखायला हव्यात, आपली शारीरिक क्षमता सुधारायला हवी, अधिक शस्त्रे हवीत आणि शस्त्रे वापरण्याबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जंगलातील सर्व कोपऱ्यांवर, ठिकाणांवर गस्त घालणे आवश्यक आहे. तसेच जंगलातील दुर्गम भाग ओळखून तेथे चालणारे तस्करीसारखे प्रकार ओळखणे आवश्यक आहे.”
या सर्व कारवायांमध्ये त्यांना पोलीस अधिकाऱ्यांची मदत झाली. त्यामुळे वन खाते आणि पोलीस त्यांचे परस्पर सामंजस्य अधिक महत्त्वाचे असते. त्याबाबत बी के सिंह म्हणतात, ” वीरप्पनविरुद्धच्या कारवाईत पोलिसांनी उशिरा का होईना पण सहभाग घेतला. तरीही वीरप्पनला संपण्यास तामिळनाडू पोलिसांना १५ वर्षे म्हणजे जुलै २००४ हे साल बघावे लागले. जंगलात गस्त घालण्यासाठी पोलीस कर्मचारी तेवढे सक्षम नव्हते. नागरी वस्तीत गस्त घालणे आणि वनामध्ये गस्त घालणे यामध्ये फरक आहे. वीरप्पनला जंगलातील सर्व खाणाखुणा, पायवाटा माहीत होत्या. त्यांना डोंगराळ भागात चालणे, राहणे सहजसोपे होते, तेवढे पोलिसांना नव्हते. परंतु, पोलिसांशिवाय वीरप्पनला संपवणे शक्य नव्हते. वन अधिकाऱ्यांची गस्त, पोलिसांची गस्त, पोलिसांचा पहारा, वनअधिकाऱ्यांची माहिती अशा सर्व गोष्टींमुळे वीरप्पन गजाआड झाले. त्यामुळे तस्कर, शिकारी अशा लोकांना पकडण्यासाठी पोलीस आणि वन खाते यांचे संबंध चांगले असणे आवश्यक आहे.


पी. श्रीनिवास यांनी वीरप्पनच्या विरुद्ध केलेली अद्भुत कारवाई…

नेटफ्लिक्सवरील ‘द हंट फॉर वीरप्पन’ या लघुपटात एक माजी आयएफएस अधिकारी पी श्रीनिवास यांचा नेहमी उल्लेख करण्यात येतो. कर्नाटकमधील तस्करांवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. यासंदर्भात बी के सिंह सांगतात, ”पी. श्रीनिवास हे १९७९ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी होते, जे अतिशय प्रामाणिक, वचनबद्ध आणि वन आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी कार्य करायचे. वीरप्पनला पकडण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. ते शांतताप्रिय होते. त्यांना कारवाई करताना मारामारी, रक्तपात आवडत नसे. भावनिक आवाहन करणे, नातेवाईकांची मदत घेणे असे उपाय ते करत. गावाचा विकास आणि वनांचे संवर्धन या दोन्ही गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे हाताळल्या. श्रीनिवास यांनी गोपीनाथन ग्रामस्थांसाठी अनेक विकासकामे केली. गोपीनाथन हे वीरप्पनचे मूळ गाव होते आणि श्रीनिवास यांनी या गावातील ग्रामस्थांची मने जिंकली. वीरप्पनला आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहित करण्याचा त्यांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला. त्याने त्याचा भाऊ अर्जुन याच्याशी संपर्क केला. त्यांना वाटले की, वीरप्पनचा भाऊ अर्जुन आपल्याला मदत करेल. परंतु, त्यांचा हा समज चुकीचा ठरला. वीरप्पन आणि अर्जुन यांनीच श्रीनिवास यांना पकडण्यासाठी जाळे रचले. श्रीनिवास यांनी अर्जुनवरती पूर्ण विश्वास ठेवलेला त्यामुळे ते पोलिसांच्या सहकार्याशिवाय त्यांना भेटायला गेले. तिथे वीरप्पनने १० नोव्हेंबर, १९९१ रोजी त्यांना गोळ्या घालून ठार मारले. वन खात्यातील एक महत्त्वाचा अधिकारी यामुळे आम्ही गमावला. नंतर त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले.

वन खात्यातील सेवांबाबत…

अशा रोमांचकारी किंवा जीवावर बेतणाऱ्या गोष्टी बघितल्या की वन खात्यातील नोकरी तणावपूर्ण किंवा धोक्याची आहे, असे वाटते. बी. के. सिंह यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देतात. ते म्हणतात, ” भारतीय वन सेवा प्रसिद्ध सेवांपैकी एक नाही. आयएएस/आयपीएस किंवा इतर कोणत्याही नागरी सेवेप्रमाणे आरामदायी जीवन, ग्लॅमरस सेवांमध्ये येत नाही. जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हे खूप कठीण काम आहे. अनेकदा नैसर्गिक जंगले कमी होत चालली आहेत, असा अनुभव असतो. त्यामुळे वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जंगलातील मौल्यवान झाडांना, वस्तूंना मिळणारी किंमत, तसेच त्यांची वाढलेली तस्करी, वन्य प्राण्याची तस्करी, वन्य प्राण्यांची शिकार अशी आव्हाने असतात. त्याच प्रमाणे वस्ती, वन प्रशासकीय जमीन, गावातील अन्य समस्या या अधिकाऱ्यांना सोडवाव्या लागतात. त्यामुळे ही नक्कीच आव्हानात्मक नोकरी आहे. ”
भारतीय वन सेवेत रुजू होण्यासाठी कोणती तयारी करावी लागते, याबाबत बी. के. सिंह सांगतात की, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे हे तुमच्या प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघा. तुम्हाला अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास करताना सोप्या विषयांकडे दुर्लक्ष करू नका. एका पेपरमध्ये अधिकाधिक गुण मिळवा. नोकरीतील धोक्यांचा आधी विचार करू नका. कारण, वन खात्यात समान आव्हाने नसतात. त्यामुळे आधी परीक्षा, मुलाखतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
आयएएस किंवा आयपीएस या व्यक्तींची कृती काही मोजक्या लोकांपुरती किंवा वस्तीपुरती मर्यादित असते. परंतु, आयएफएस म्हणजे वन अधिकाऱ्याची कृती अनेक गावांवर, वस्त्यांवर आणि वन्य जीवांवर परिणाम करते, नैसर्गिक चक्र आणि निसर्ग संवर्धनामध्ये या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. आरामदायी जीवनापेक्षा सामाजिक कल्याणाचा विचार या नोकरीमध्ये करणे आवश्यक असते.”

सामान्य जीवनापेक्षा नवीन काही रोमांचकारी जीवन वन खात्यात मिळते. निसर्ग आणि मानवी वस्ती यांचा संबंध तुम्ही जवळून बघू शकता. वीरप्पनसारखे तस्कर भेटतात, जे आयुष्य बदलवून टाकतात. बी. के. सिंह हे त्याचे महत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of the officer who caught the notorious smuggler veerappan the story of conservator of forests brij kishore singh vvk
Show comments