UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, मिथकशास्त्रात पारंगत असलेले प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक प्रागैतिहासिक संस्कृतींबद्दल माहिती देत आहेत.

प्री-हिस्टरी (अश्मयुग) ही संज्ञा सामान्यत: लेखन कला अवगत नसलेल्या, शेती आणि धातूच्या हत्यारांचा वापर करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतींसाठी वापरली जाते. प्रागैतिहासिक संस्कृती ही अशी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीतील लोकांनी दगडांची हत्यारे शिकार आणि अन्न गोळा करण्यासाठी वापरली. जुन्या पाषाणयुगातील किंवा पुरापाषाण काळातील सुरुवातीची दगडी हत्यारे अधिक मोठी होती, तर नंतरची मध्याश्मयुगातील किंवा मेसोलिथिक काळातील दगडी हत्यारे तीक्ष्ण धारेची आणि काठीवर लावता येणारी होती. पाषाणयुगाच्या उत्तरार्धातील किंवा निओलिथिक (नवाश्मयुग) काळातील दगडी हत्यारे शेतीचा जन्म दर्शवतात. खरं तर, जगाच्या या भागातील शेती सुमारे १०,००० वर्षांपूर्वी (इसवी सनपूर्व ८०००) बलुचिस्तानच्या मेहरगढमधील काही ठिकाणी सुरू झाली. असे असले तरी, प्रागैतिहासिक संस्कृती इसवी सनपूर्व १०,००० ते  इसवी सनपूर्व १००० म्हणजे लोहयुगाची सुरुवात होईपर्यंत विकसित होत राहिली.

‘विशेष म्हणजे, हडप्पा संस्कृती (इसवी सनपूर्व २५००- १९००) आणि वैदिक कालखंडाला (इसवी सनपूर्व १५००-५००) काही लोक प्रोटोहिस्ट्री (आद्य इतिहास) म्हणून संबोधतात. कारण हा काळ भौतिक आणि भाषकदृष्ट्या प्रगत असतानाही या काळात लेखन तंत्र पूर्णतः विकसित झालेले नव्हते असे मानले जाते.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे

‘प्रोटोहिस्ट्री (आद्य ऐतिहासिक) हा प्रागैतिहासिक आणि इतिहास यांच्यातील कालखंड आहे. या काळात लेखन कला विकसित झालेली नव्हती. परंतु त्या कालखंडातील इतर जनसमुदायांच्या लिखित नोंदीत त्यांचे संदर्भ सापडतात. मूलतः हडप्पाकालीन लोक साक्षर होते. परंतु त्यांच्या लिपीचा उलगडा इतिहासकारांना झालेला नाही. वैदिक काळासंदर्भातही आपल्याकडे लिखित नोंदी नाहीत तर मौखिक परंपरा आहेत.’

मानवाचे पूर्वज

बहुतेक प्रागैतिहासिक स्थळे १२,००० वर्षांपूर्वी हिमयुगाच्या समाप्तीनंतर दिसतात. पण त्या काळाच्याही आधी आधुनिक मानवी प्रजाती विकसित होण्यापूर्वी मानवाच्या पूर्वजांनी भारतात काही संस्कृती निर्माण केल्या होत्या. चेन्नईजवळील अत्तिरमपक्कम स्थळावर दगडी हत्यारे सापडली आहेत, ती १ दशलक्ष वर्षांपूर्वीची आहेत. यावरून ५०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून प्रथम विकसित माणूस भारतात येण्याआधी अनेकवेळा स्थलांतर झाले असावे जे यशस्वी झाले नाही हे सूचित होते.

प्रागैतिहासिक स्थळे

भारतात अनेक प्रागैतिहासिक स्थळे आहेत. ती सर्व महत्त्वाची आहेत. त्यातील नऊ स्थळांविषयी येथे माहिती देत आहोत.

१. इसवी सनपूर्व १०,००० ते इसवी सनपूर्व १००० या कालखंडामधील भीमबेटका (मध्यप्रदेश) आणि केथवरमच्या (आंध्रप्रदेश) गुहांमधील चित्रे मानवी उत्क्रांतीतील शिकारीपासून ते पशुपालनापर्यंत,अन्न शोधण्यापासून ते शेतीपर्यंत, नृत्य आणि अगदी युद्धापर्यंतचा प्रवास अधोरेखित करतात.

२.  सर्वात जुनी वाद्ये लिथोफोन किंवा दगडापासून तयार केलेल्या वाद्यांचा काळ इसवी सनपूर्व ४००० आहे. जी गुडहांडी (कालाहंडी जिल्हा, ओडिशा) येथे सापडली होती.

३. देवीचे सर्वात जुने पवित्र प्रतीक, पिवळा रंग असलेला त्रिकोणी दगड मध्य प्रदेशातील सोन नदीच्या काठावर असलेल्या बागोर येथे सापडला.

४. रत्नागिरी (महाराष्ट्र) तसेच गोवा येथे सपाट दगडांवर कोरलेली सर्वात जुनी चित्र (कातळचित्रं) सापडली आहेत. या चित्रांचा काळ इसवी सनपूर्व १०,००० आहे. या कोरलेल्या चित्रांमध्ये मुख्यतः मानव आणि प्राण्यांच्या प्रतिमा आढळतात. या चित्रांमध्ये पशूंच्या, देवाच्या प्रतिमेचा समावेश आहे. या प्रतिमेमध्ये मनुष्याने दोन्ही हातात दोन वाघ धरलेले आहेत. ही प्रतिमा नंतर हडप्पा संस्कृतीत आणि अगदी सुमेरियन संस्कृतीतही सापडली.

५. काश्मीरच्या बुर्झाहोम येथे सूर्यासारख्या दिसणाऱ्या दोन तेजस्वी प्रतिमा आढळतात. या अंकनात पृथ्वीवरून दिसणारी सुपरनोव्हा सारखी खगोलीय घटना दाखवली गेली असावी. या अंकनाचा काळ इसवी सनपूर्व ४६०० वर्ष जुना आहे  

६. काश्मीरमधील बुर्झाहोम येथे इसवी सनपूर्व ४००० वर्षांपूर्वीचे गर्तावास (निवारा देण्यासाठी फांद्यांनी झाकलेले छिद्र) आढळून आले आहेत.  

७. इसवी सनपूर्व ३०००-१००० दरम्यान कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या दख्खन प्रदेशात राहणाऱ्या पशुपालकांनी वेळोवेळी जाळलेले शेणाचे ढीग किंवा राखेचे डोंगर हे धार्मिक विधीचे प्रतीक असू शकतात, यांचा कालखंड साधारणपणे सिंधू संस्कृतीच्या शहरांशी समकालीन आहे.

८. मेन्हीर (उभारलेले उंच दगड), डॉल्मेन्स (दोन किंवा अधिक सरळ दगडांवर ठेवलेला सपाट दगड), आणि सिस्ट (दगडाची शवपेटी) या रचना भारताच्या महाअश्मयुगीन संस्कृतींनी दफन करण्याची ठिकाणे चिन्हांकित करण्यासाठी तयार केली आहेत. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी अशा रचना आढळल्या आहेत.

९. मणिपूरच्या विलोंग खुल्लेन येथे मेगालिथिक स्थळावर सापडलेले भारतीय स्टोनहेंज इसवी सनपूर्व २००० वर्षांपूर्वीचे आहे.  शेकडो स्टोनहेंज उंच, मुक्त-उभे असलेले दगड ७ मीटर उंच, १ मीटर रुंद आहेत.

या स्थळांवरून असे दिसून येते की, भारतीय उपखंडात अनेक संस्कृती स्वतंत्रपणे उदयास आल्या. हे लोक नवीन स्थलांतरित लोकांशी व्यापार करत होते आणि किंबहुना त्यांचे ज्ञान घेऊन त्यांच्याबरोबर नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले होते. अशा प्रकारे, प्रत्येक संस्कृती विकसित झाली आणि परदेशी संस्कृतींशी संलग्न झाली. यातून भारतीय संस्कृतीचा जन्म झाला. ही प्रक्रिया १0 हजार वर्षांपूर्वी किंवा कदाचित त्यापूर्वीही सुरू झाली.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  

विषयाशी संबंधित प्रश्न

प्री-हिस्टरी (अश्मयुग) आणि प्रोटो-हिस्ट्रीत (आद्य-ऐतिहासिक काळ) नक्की कोणता फरक आहे? हडप्पा संस्कृती आणि वैदिक कालखंडाला प्रोटोहिस्टॉरीक का म्हणतात?

अश्मयुग म्हणजे काय? त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चर्चा करा.

महाश्मयुगातील रचना त्या काळातील सांस्कृतिक गतिशीलता समजून घेण्यासाठी प्रमुख ऐतिहासिक प्रतीक म्हणून कसे काम करतात? यावर चर्चा करा.