वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण आपत्ती म्हणजे काय? आणि त्याच्या प्रकारांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भूस्खलन व हिमस्खलन आपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. भूस्खलन म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली खडक, माती आणि झाडांची उतारावरची जलद हालचाल होय. भूस्खलनाच्या घटना साधारणपणे अचानक आणि तुरळकपणे होत असतात. पण, भूकंप आणि अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊ शकते. जिथे जिथे डोंगरउतार आहेत, तिथे तिथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याची शक्यता असते. उत्खननामुळेही ते होऊ शकते. रस्ते, रेल्वे, इमारती, बोगदे इत्यादी बांधण्यासाठी माणूस खडक फोडतो. अशा वेळी खडक सैल होतात आणि दरडी कोसळतात. भूस्खलनास मानवी खाणकामदेखील जबाबदार आहे. हिमालयाच्या उंच उतारावर, पश्चिम घाटावर आणि नदीच्या खोऱ्यांच्या बाजूने होणारे भूस्खलन ही खूप सामान्य बाब आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : ध्वनिप्रदूषण म्हणजे काय? त्याचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो?

भूस्खलनाची व्याप्ती ही उताराची तीव्रता, खडकांचे बेडिंग प्लेन, वनस्पती आच्छादनाचे प्रमाणावर अवलंबून असते. हे खडक सोबत माती घेऊन जातात. भूस्खलनाला कारणीभूत ठरणारे एक प्रमुख कारण म्हणजे ओव्हरलिंग मटेरियलचे वजन (Weight of overlying material) आणि पाण्यासारख्या स्नेहन सामग्रीची (Lubricating material) उपस्थिती. त्याला सॉलिफ्लक्शन (solifluction), असेही म्हणतात. समुद्राच्या लाटांमुळे किनार्‍याजवळ खडकांची झीज होते आणि वरचे खडक तुटून पडतात. अशा प्रकारे किनारी भागात भूस्खलन बघावयास मिळते. पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडतात. लाकडासाठी झाडे तोडणे आणि विकासकार्यांसाठी वनस्पती आच्छादन काढून टाकणे यांचा परिणाम म्हणून होणारी जंगलतोडदेखील मातीची धूप आणि उतारांच्या अस्थिरतेसाठी जबाबदार आहे.

भारतातील भूस्खलन असुरक्षितता झोन (Landsalide Vulnerability Zones in India) :

१) अतिशय उच्च असुरक्षितता क्षेत्र (Very High Vulnerability zone) : या झोनमध्ये हिमालयातील पर्वत, अंदमान व निकोबार, पश्चिम घाट, निलगिरीचे तीव्र व पावसाळी उतार, ईशान्येकडील प्रदेश आणि तीव्र मानवी क्रियाकलापांचे क्षेत्र विशेषतः रस्ते, धरणे इत्यादींच्या बांधकामाशी संबंधित क्षेत्रे समाविष्ट आहेत.

२) उच्च असुरक्षितता क्षेत्र (High Vulnerability Zone) : या भागांची भौगोलिक परिस्थिती अगदी उच्च असुरक्षितता असलेल्या भागांसारखीच आहे. फरक एवढाच आहे की, भूस्खलनाची तीव्रता आणि वारंवारता अत्यंत उच्च असुरक्षिततेच्या भागांच्या तुलनेत कमी आहे. आसामचे मैदान वगळता सर्व हिमालयीन राज्ये आणि उत्तर-पूर्व भागातील राज्ये उच्च असुरक्षिततेच्या झोनमध्ये समाविष्ट आहेत.

३) मध्यम ते कमी असुरक्षितता क्षेत्र (Moderate to Low Vulnerability Zone) : यामध्ये कमी पर्जन्यमान असलेल्या भागांचा समावेश होतो, जसे की लद्दाख आणि स्पितीमधील ट्रान्स-हिमालयीन भाग, अरवली टेकड्या, पश्चिम व पूर्व घाटातील पावसाळी प्रदेश आणि दख्खनचे पठार. खाणकामामुळे होणारे भूस्खलन झारखंड, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांमध्ये सर्वांत सामान्य आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा व केरळ राज्यांचा समावेश या क्षेत्रात होतो.

४) इतर क्षेत्रे (Other Areas) : देशाचे उर्वरित भाग विशेषत: राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल (जिल्हा दार्जिलिंग वगळता), आसाम (जिल्हा कार्बी आंग्लॉंग वगळता) आणि दक्षिणेकडील राज्यांचे किनारी प्रदेश भूस्खलनापासून सुरक्षित आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : आपत्ती म्हणजे नेमके काय? त्याचे किती प्रकार पडतात?

हिमस्खलन (Avalanches) :

हिमस्खलन हा शब्द साधारणपणे डोंगरउतारावरून खाली उतरणे हे दर्शवतो; परंतु विशेषत: याचा अर्थ बर्फ व खडकाने मिश्रित बर्फाचे डोंगरउतारावरून खाली कोसळणे, असा होतो. हिवाळ्यात जेव्हा ताजा बर्फ पडतो आणि जुन्या बर्फाच्या पृष्ठभागावरून घसरतो तेव्हा हिमस्खलन होते. वसंत ऋतूमध्ये जेव्हा अंशतः विरघळलेला बर्फ पर्वतउतारांवरून खाली येतो, तेव्हा हिमस्खलन होते. वाटेत बर्फ आकारात वाढतो आणि धोकादायक गती प्राप्त करून नुकसानकारक रूप धारण करतो. उंच पर्वतांमधील हिमनद्यांच्या कडा (Edges of Glaciesrs) तुटतात तेव्हादेखील हिमस्खलन होते.

हिमस्खलनामुळे होणारे नुकसान :

  • हिमस्खलनाच्या बर्फामुळे रस्ते खराब होतात.
  • हिमस्खलन झाल्यावर वाहतूक ठप्प होते.
  • रस्त्यांची रचना जसे की, प्रतिबंधात्मक भिंती (Retaining Walls) उखडल्या जातात.
  • हिमस्खलनाच्या मार्गात येणाऱ्या संरचनेचे (Infrastructure) नुकसान होते.

प्रतिबंधात्मक उपाय :

  • हिमस्खलनप्रवण क्षेत्रात वनीकरण करणे.
  • नियंत्रण उपायांद्वारे हिमस्खलन सापळा उभारणे.
  • हिमस्खलनाच्या घटनेचा अंदाज लावणे आणि येऊ घातलेल्या हिमस्खलनाबद्दल चेतावणी देणे.
  • रहिवाशांना आपत्कालीन निर्वासन निवाराविषयी मार्गदर्शन करणे.

भारतातील हिमस्खलनप्रवण क्षेत्रे :

हिमालयीन प्रदेशाच्या उंच भागात हिमस्खलनाचा धोका असतो. पश्चिम हिमालयातील बर्फाळ प्रदेशात विशेषत: हिमस्खलनाचा धोका आहे. त्यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील उंच भागांचा समावेश आहे.

  • जम्मू व काश्मीर : काश्मीर आणि गुरेझ खोरे (Gurez Valleys), कारगिल आणि लडाख.
  • हिमाचल प्रदेश : चंबा, कुल्लू-स्पिती व किन्नौर हे संवेदनशील क्षेत्र आहे.
  • उत्तराखंड : टिहरी गढवाल आणि चमोली जिल्ह्यांचे काही भाग असुरक्षित क्षेत्र आहेत.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc disaster management what is landslides and avalanches reasons mpup spb
Show comments