वृषाली धोंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही लेखांतून आपण ‘इकॉलॉजी’ म्हणजे काय, या संदर्भात माहिती घेतली. या लेखातून आपण ‘अर्बन इकॉलॉजी’ या संकल्पनेविषयी जाणून घेऊ. ‘अर्बन इकॉलॉजी’ म्हणजेच नागरी पर्यावरणशास्त्र, या नागरी पर्यावरणशास्त्राने मानवी पर्यावरणाच्या अनेक संकल्पना शहरी क्षेत्रात लागू केल्या आहेत. त्यात शहराला एक इको सिस्टीम म्हणून समजले गेले. त्यामध्ये शहराच्या आतील भागांत जास्त घनता असणारे ठिकाण, मोठ्या इमारती, सिमेंटचे रस्ते, रस्त्याच्या सर्व बाजूंनी गर्दी या बाबींचा समावेश होतो.

हेही वाचा –UPSC-MPSC : १९९२ साली भारतात ‘प्रोजेक्ट एलिफंट’ का सुरू करण्यात आला? त्याची वैशिष्ट्ये कोणती?

परराज्यांतून होणाऱ्या कायमच्या स्थलांतरामुळे (Immigration) नागरी भागात आक्रमण (Invasion) व उत्तराधिकार (Succession) यांसारख्या प्रक्रियांचा अनुभव होतो. आक्रमण आणि उत्तराधिकार ही मानवी भूगोलाची संकल्पना आहे; ज्यामध्ये स्थलांतरीत लोक नवीन ठिकाणावर विशिष्ट भागात जाऊन तेथे अधिकार गाजवतात.

१९७० च्या दशकात अनेक पर्यावरण शास्त्रज्ञांचे लक्ष नैसर्गिक पर्यावरणावरून शहरी पर्यावरणावर पडले. त्याचे कारण म्हणजे शहरी भागात वाढती लोकसंख्या आणि त्यांच्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडणारा ताण. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण केले नाही, तर ते मानवी सर्वनाशाचे कारण बनेल, असे या पर्यावरण तज्ज्ञांचे मत बनले. १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या हॅबिटॅट कॉन्फरन्सनंतर शहरी पर्यावरणाच्या अभ्यासाचे महत्त्व वाढले. शहरात राहणाऱ्या एकूण लोकसंख्येचे प्रमाण ५०% पेक्षा अधिक आहे आणि ते येत्या काळात वाढणारच आहे. त्यामुळे शहरे ही पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी समतोल राखणारे बनविणे हे ‘अर्बन इकॉलॉजी’ या संज्ञेचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु, आपल्याकडे शहराबाहेरच्या पर्यावरणाची माहिती उपलब्ध आहे आणि त्याचा योग्य आकृतिबंध तयार करण्यात आला आहे; परंतु तशी माहिती शहरी भागाच्या पर्यावरणाची नाही. म्हणून पर्यावरण तज्ज्ञांनी शहरी समस्यांना तोंड देण्यासाठी काही पद्धती आत्मसात केल्या आहेत.

शहरी भागातील पर्यावरणीय समस्या

१) प्रदूषण (वायू, जल, ध्वनी, मृदा) : शहरी भागात अतिलोकसंख्या घनतेमुळे ध्वनिप्रदूषण होते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे विविध वाहने, औद्योगिक विकास यांच्यामुळे वायू आणि जलप्रदूषण घडून येते. प्रमाणापेक्षा अधिक वायुप्रदूषण हे हवामान बदलास कारणीभूत ठरते.

२) जमिनीचा अतिरिक्त वापर आणि जैवविविधतेचा ऱ्हास : वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल कटाई केली जाते आणि तेथे लोक स्थायिक होतात. जंगलांच्या ऱ्हासामुळे तेथील वन्य जीवदेखील धोक्यात येतात. याच कारणामुळे शहरी भागात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाचे प्रमाण वाढत आहे.

४) घनकचरा : प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, खराब भाजीपाला आणि इतर घनकचऱ्याचे ढिगारे शहरात आणि शहराबाहेरच्या बाजूस आपल्याला पडलेले दिसतात. या कचऱ्यामुळे शहरी परिसरात दुर्गंध पसरून रोगराई पसरते.

हेही वाचा – UPSC-MPSC : जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिन का साजरा करण्यात येतो? भारतात अशी किती क्षेत्रे आहेत?

अर्बन इकॉलॉजी टिकवण्यासाठी उपाय

१) शहर नियोजन : शहराचे नियोजन करताना सुदूर संवेदनांचा वापर करणे फार महत्त्वाचे ठरते. गेल्या दशकातील प्रदेशातील तापमान बदल आणि हिट मॅपिंग यांमुळे त्या प्रदेशात भविष्यात होणऱ्या बदलांना योग्य रीतीने सामोरे जाता येते. शहर नियोजन करताना घनकचरा व्यवस्थापनावर विशेष भर असायला हवा. जिथून कचरा उचलला जातो, तिथेच ओला आणि सुका कचरा वेगळा केला पाहिजे; ज्यामुळे विल्हेवाट लावणे सोपे जाते. कचरा व्यवस्थापनासाठी रासायनिक व जैवरासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. किनारी भागात असणाऱ्या शहरांमध्ये पावसाळ्यात अडचणी निर्माण होतात. त्यासाठी ड्रेनेज यंत्रणा सुव्यवस्थित असणे गरजेचे आहे आणि प्रत्येक पावसाळ्याअगोदर ड्रेनेजमधील कचरा साफ करणे गरजेचे आहे.

२) मानव व वन्यजीव सामायिक राहण्यासाठी प्रयत्न : खरे तर मानव असलेल्या प्रत्येक ठिकाणाचा जैवविविधतेवर विपरीत परिणाम पडतो. परंतु, जगात अशा काही शहरांची उदाहरणे आहेत, की जिथे मानव आणि वन्यजीव सहअस्तित्वाने राहतात. उदा. मुंबई, न्यूयॉर्क, लंडन, ॲडीलेड. अशा शहरांमध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये बांधली जातात. त्यांच्या मुक्त संचारसाठी वन्यजीव कॉरिडोर बांधले जातात. तसेच नवीन प्रजाती पुन्हा त्या प्रदेशात सोडल्यामुळे जैवविविधता वाढण्यास मदत होते.

३) मियावाकी पद्धत : ही वृक्षारोपणाची जापनीज पद्धत आहे. या पद्धतीमध्ये शहरातील छोट्या जागेमध्ये विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाते. या पद्धतीसाठी असे रोप निवडले जातात, की ज्यांना विशेष काळजीची आवश्यकता नसते.

४) शाश्वतता : शहरी भागात लोकांना पर्यावरणासंबंधी लोकशिक्षण देणे गरजेचे आहे. लोकांना हरित पायाभूत सुविधा वापरण्यावर, कमी हरितगृह वायू सोडणारे घरगुती सामान, स्वतःच्या गाडीपेक्षा सार्वजनिक गाड्यांचा वापर, गरज असेल तेवढ्याच साधनसंपत्तीचा वापर यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc environment urban ecology india and its objective mpup spb
Show comments