सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात आपण महाराष्ट्रातील स्थलांतराची कारणे व त्यांचे स्वरूप यांची सविस्तरपणे माहिती घेतली. या लेखातून बुद्धिवेतांचे स्थलांतर आणि त्याचे बहुआयामी परिणाम जाणून घेऊ. बुद्धिवंतांचे स्थलांतर ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. स्थलांतराचे आगमन व निर्गमन क्षेत्रात चांगले-वाईट परिणाम होतात. स्थलांतर करणाऱ्यांमध्ये तरुण व बुद्धिवंतांचा भरणा जास्त असतो.

बुद्धिवंतांच्या स्थलांतराचे प्रकार (Types of Brain Migration)

१) बुद्धी अतिरिक्तता : देशातील लोकसंख्येत आवश्यकतेपेक्षा जास्त तंत्रज्ञ व उच्च विद्याविभूषित लोक असतात आणि अर्थव्यवस्थेतही बुद्धिवानांची संख्या केव्हाही उपलब्ध होते, त्या स्थितीला ‘बुद्धी अतिरिक्तता’ असे म्हणतात. जपान, संयुक्त संस्थाने, जर्मनी या देशांत बुद्धी अतिरिक्तता मोठ्या प्रमाणात आहे.

२) बुद्धी आदान-प्रदान (Brain Exchange) : दोन राष्ट्रांत बुद्धिवान लोकांची स्थलांतर प्रक्रियेद्वारे अदलाबदल होत असल्यास त्याला ‘बुद्धी आदान-प्रदान’ असे म्हणतात. त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळते. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या देशांना पारस्परिक प्रबोधनाचा फायदा होत असतो आणि वैज्ञानिक संक्रमणाचा लाभ मिळतो.

३) बुद्धी निर्यात (Brain Export) : व्यावसायिक दृष्टिकोनातून एका देशातील बुद्धिवान लोकांना दुसऱ्या देशात नियमित पाठविले जाते. कुशल श्रमिक किंवा तंत्रज्ञानाचा नियमित आर्थिक करारावर पुरवठा करणे म्हणजे ‘बुद्धी निर्यात’ होय. अविकसित व काही प्रमाणात विकसनशील राष्ट्रे अशी बुद्धी निर्यात करून परकीय चलन मिळवितात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील स्थलांतर भाग-२ : स्थलांतराच्या कारणानुसार स्थलांतरीतांचे स्वरूप

बुद्धिवंतांच्या स्थलांतराचे परिणाम (Effects of Brain Migration)

१) निर्गमन क्षेत्रावरील परिणाम : बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात. गरीब व विकसनशील-अविकसित देशांना याचा मोठा फटका बसतो. अविकसित देश उच्च शिक्षणावर मोठा खर्च करतात. तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते, वैद्यकीय व्यावसायिक यांच्या शिक्षणावर मोठा खर्च होतो. परंतु, पदवी प्राप्त केल्यावर हे तंत्रज्ञ व इतर उच्च विद्याविभूषित लोक मोठ्या पगाराच्या व चांगल्या सेवा-सुविधांच्या अभिलाषेने श्रीमंत विकसित देशांकडे धाव घेतात. भारतासारख्या विकसनशील देशांतूनदेखील विकसित देशाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले जाते. या स्थलांतरामुळे बुद्धिवंतांची उणीव निर्माण होते. बुद्धिवहनामुळे विकसनशील व अविकसित देशांचा आर्थिक विकासाचा वेग मंदावतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील, तसेच महाराष्ट्रातील उच्चशिक्षित लोकांनी संयुक्त संस्थाने, कॅनडा, जर्मनी या देशांमध्ये स्थलांतर केले आहे. निर्गमन क्षेत्रात बालके, स्त्रिया व वृद्धांचे प्रमाण वाढते.

२) आगमन क्षेत्रावरील परिणाम : श्रीमंत, विकसित देशांत तरुण, प्रतिभासंपन्न लोकांची भर पडते. त्यामुळे आगमन क्षेत्राला या बुद्धिवंतांचा चांगला लाभ होतो. इंग्लंड व अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रात भारतीय वैद्यकीय व्यावसायिकांचा भरणा जास्त आहे. विकसित देशांना तंत्रज्ञ, बुद्धिवंत सहज उपलब्ध झाल्याने त्यांची आर्थिक विकासाची गती अधिक वेगवान होते. आर्थिक विकासाला आगमन क्षेत्रामधील लोकसंख्या पोषक असते.

जगात बुद्धिवहन समस्या दुसऱ्या महायुद्धानंतर प्रकर्षाने जाणवू लागली आहे. स्थलांतराचे परिणाम निर्गमन क्षेत्रात (Out migration), तसेच आगमन (In migration) क्षेत्रातही दिसून येतात. स्थलांतरामुळे स्थलांतरीत व्यक्ती नवीन पर्यावरणात व संस्कृतीत वावरते. त्यातूनच पुढे सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन सांस्कृतिक विकास होतो. निर्गमन क्षेत्रापेक्षा आगमन क्षेत्रात अधिक चांगले परिणाम दिसून येतात. कारण- आगमन क्षेत्रात कार्यक्षम व बुद्धिवंत लोकांची भर पडते.

लोकसंख्याशास्त्रीय परिणाम : या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रातील, तसेच निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्येच्या आकार व रचनेवर परिणाम होतो. लोकसंख्या व प्रदेशातील साधनसंपत्तीचे पुनर्स्थानांकन किंवा संतुलन होण्यास मदत होते. स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रातील लोकसंख्या घटते; तर आगमन क्षेत्रातील लोकसंख्या वाढते. लोकसंख्येच्या आकारावर म्हणजे एकूण लोकसंख्या व तिची घनता, तिची वाढ बदलते. तसेच जनन, मर्त्यता, वयोरचना, लिंगरचना व साक्षरता यांत संख्यात्मक बदल जाणवतात. निर्गमन क्षेत्रात बुद्धिवहन (Brain Drain) समस्या निर्माण होते. याउलट आगमन क्षेत्रात बुद्धिवंतांची व कार्यक्षम लोकसंख्येची भर पडते.

आर्थिक परिणाम

१) आगमन क्षेत्रातील आर्थिक परिणाम : आगमन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्यास, त्या प्रदेशातील मानव साधनसंपत्तीचे गुणोत्तर बदलते. साधनसंपत्तीवरील ताण वाढतो. आर्थिक विकास व नियोजन यांवर प्रतिकूल परिणाम घडून येतो. मुळातच न्यून लोकसंख्या असलेल्या प्रदेशात स्थलांतर घडून आल्यास, ते आर्थिक विकासाला पोषक ठरते. साधनसंपत्तीचा विकास होतो. मात्र, अनियोजित व अनिर्बंधपणे स्थलांतर घडून आल्यास प्राथमिक गरजांची पूर्तता नीट होत नाही. नागरी जीवनाच्या अनेक समस्या उदभवतात. आगमन क्षेत्रात लोकसंख्या वाढल्याने नियोजनाचा आराखडा बदलावा लागतो. आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, वाहतूक व संदेशवहन, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यांचा नियोजन आराखडा व उचित अवलंब झाला नाही, तर विशेषतः नागरी केंद्रात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आणि शहराची निकोप वाढ होत नाही. गलिच्छ वस्त्या, प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य यांसारखे ज्वलंत प्रश्न निर्माण होतात.

२) निर्गमन क्षेत्रातील आर्थिक परिणाम : निर्गमन क्षेत्रात कार्यक्षम लोकसंख्या घटते. परावलंबितांचे प्रमाण वाढते. आर्थिक उत्पन्नात घट होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची लोकसंख्या भाग २ : लिंग-गुणोत्तर, साक्षरता अन् बाललिंग गुणोत्तर

सामाजिक परिणाम

स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील सामाजिक भिन्नतेवर परिणाम होतो. जातिरचना, समाजपद्धती, विवाहप्रणाली, शिक्षण, चालीरीती या सामाजिक अंगांमध्ये विविधता निर्माण होते. सामाजिक अभिसरण व्हायला वेळ लागतो.

१) आगमन क्षेत्रातील सामाजिक परिणाम : आगमन क्षेत्रात अल्पसंख्याकांचे प्रमाण वाढून प्रसंगी सामाजिक ताणतणाव निर्माण होतात. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. आगमन क्षेत्रात काही अनुकूल बदलही दिसून येतात. आगमन क्षेत्रात आचार-विचारांचे आदानप्रदान होते. नवीन जीवनपद्धती संस्कृती निर्माण होते. स्थलांतरित लोक नवीन पर्यावरणाशी व संस्कृतीशी मिळतेजुळते घेतात. ते अधिक सहनशील बनतात. आगमन क्षेत्रात बुद्धिवंतांची भर पडल्याने त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळतो. आर्थिक विकासाला चालना मिळते. आंतरजातीय विवाह, विचारमंधन, समायोजन, उच्च शिक्षण यांमुळे सामाजिक संक्रमणाला वाव मिळतो.

२) निर्गमन क्षेत्रातील सामाजिक परिणाम : निर्गमन क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण वाढल्याने त्या परिस्थितीजन्य आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनू लागतात. अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने त्या स्वावलंबी होऊ लागतात. व्यवसाय पतपेढ्या, संघटना, विक्री संस्था, लघुउद्योग, शिक्षण यांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढू लागतो. मात्र, निर्गमन क्षेत्रातील साधनसंपत्तीचा पुरेपूर विकास होत नाही..

सांस्कृतिक परिणाम

अंतर्गत स्थलांतरामुळे सांस्कृतिक देवाण-घेवाण होते. विभिन्न चालीरीती, रूढी-परंपरा, नीतिमूल्ये, धार्मिक विचारप्रणाली, सण, उत्सव यांची पारस्परिक ओळख होते. संस्कृती संवर्धनास वाव मिळतो. काही वेळेस संस्कृती संक्रमण नीट न झाल्याने अल्पसंख्याक, बहुसंख्याक, गटबाजी, भाषावाद, प्रांतवाद, जातीय संप्रदाय निर्माण होऊन, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते. सांस्कृतिक अवमूल्यन वाढू लागते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography brain migration in maharashtra its causes and consequence mpup spb
Show comments