सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात आपण महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येची दशवार्षिकवाढ, घनता याविषयी सविस्तर माहिती बघितली. या लेखातून आपण महाराष्ट्राचे लिंग-गुणोत्तर, साक्षरता, बाललिंग – गुणोत्तर यासंदर्भात जाणून घेऊया.

१) महाराष्ट्राचे लिंग-गुणोत्तर (sex -ratio of Maharashtra) :

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तर दर १००० ला ९२९ आहे, तर राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण ९४३ आहे. भारतीय स्तरावर महाराष्ट्राचा लिंग-गुणोत्तरामध्ये २२ वा क्रमांक आहे. राष्ट्रीय स्तरापेक्षा महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर १४ बिंदूंनी कमी आहे. सन २००१ ते २०११ या दशवार्षिक कालखंडात महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तर ९२२ वरून ९२९ पर्यंत वाढलेले आहे. ही वाढ फक्त ७ ने झाली.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची लोकसंख्या भाग १ : घनता, वैशिष्ट्ये टक्केवारी अन् निष्कर्ष

सन २०११ च्या अंतिम जनगणनेनुसार लिंग-गुणोत्तरामधील पहिले पाच जिल्हे :

महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात सर्वांत प्रथम क्रमांक १,१२२ सह रत्नागिरी जिल्हाचा लागतो. २००१ साली हे प्रमाण १,१३६ होते; तेव्हाही रत्नागिरी जिल्हा प्रथम स्थानावर होता. सन २००१ ते २०११ या दशकात ते– १४ बिंदूंनी घटले. महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात दुसरा क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा (१,०३६) लागतो. महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात सर्वांत जास्त घट सिंधुदुर्ग जिल्ह्याची असून ही एक चिंताजनक बाब आहे. महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात तिसरा क्रमांक गोंदिया जिल्ह्याचा (९९९) लागतो. महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात चौथा क्रमांक सातारा जिल्हा (९८८) असून पाचवा क्रमांकावर भंडारा (९८२) जिल्हा आहे. लिंग-गुणोत्तरात सन २००१ व २०११ यामधील फरक पाहता असे आढळते की, भंडारा व गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उरलेल्या पहिल्या चार जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक फरक आहे. पालघर जिल्ह्याचे लिंग-गुणोत्तर ९७७ आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार लिंग-गुणोत्तरामधील शेवटचे पाच जिल्हे :

महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात सर्वांत कमी लिंग-गुणोत्तर मुंबई शहर असून ते ८३२ आहे. २००१ साली हे प्रमाण ७७७ होते. याचा अर्थ, सन २००१ ते २०११ या दशकात मुंबई शहराच्या लिंग-गुणोत्तरात +५५ बिंदूंनी वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात लिंग-गुणोत्तरात दुसरा क्रमांकावर सर्वांत कमी लिंग-गुणोत्तर मुंबई उपनगर जिल्हा आहे. तिसऱ्या क्रमांकावर सर्वांत कमी लिंग-गुणोत्तर ठाणे जिल्हा आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे हे जिल्हे लोकसंख्येत अग्रेसर आहेत. यांच्या लिंग-गुणोत्तरात काही प्रमाणात सुधारणा झालेली आहे, या खालोखाल चौथ्या क्रमांकावर लिंग-गुणोत्तरात ९१५ आकड्यासह पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याच्या लिंग-गुणोत्तरात २० बिंदूंनी घट झालेली आहे, या खालोखाल पाचव्या क्रमांकावर लिंग-गुणोत्तरात बीड जिल्हा आहे.

२) बालिका बालकांचे लिंग-गुणोत्तर :

सन २०११ च्या जनगणनेनुसार, राष्ट्रीय स्तरावर बालिका बालकांचे सरासरी गुणोत्तर ९१९ आहे. महाराष्ट्रातील बालिका बालकांचे सरासरी लिंग-गुणोत्तर फक्त दर १,००० वर ८९४ आहे, तर २००१ साली हेच प्रमाण ९१३ होते, याचा अर्थ, बालकांमध्ये १९ बालिकांची घट झालेली आहे.

बालिका – बालकांच्या लिंग-गुणोत्तरामधील पहिले पाच जिल्हे :

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात बालिका-बालकांचे लिंग-गुणोत्तरात सर्वांत प्रथम क्रमांक ९६७ सह पालघर जिल्हा आहे. या खालोखाल गडचिरोली (९६१), गोंदिया (९५६), चंद्रपूर (९५३), भंडारा (९५०) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

बालिका – बालकांच्या लिंग-गुणोत्तरामधील शेवटचे पाच जिल्हे :

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात बालिका-बालकांचे लिंग-गुणोत्तरात सर्वांत शेवटचा जिल्हा बीड (८०७) आहे. या खालोखाल जळगाव (८४२), अहमदनगर (८५२), औरंगाबाद (८५८), कोल्हापूर (८६३) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

३) साक्षरता (Literacy rate of Maharashtra) :

जी व्यक्ती कोणतीही भाषा समजून घेऊन वाचू व लिहू शकते, तिला ‘साक्षर’ असे म्हटले जाते. जनगणनेच्या दृष्टीने सात वर्षांखालील मुला-मुलींना निरक्षर मानले जाते; जरी ते शाळेत जात असले आणि काही प्रमाणात वाचू-लिहू शकत अस तरी. लोकसंख्येच्या सामाजिक व आर्थिक विकासाचा साक्षरता हा एक महत्त्वाचा निर्देशक आहे, जो मानव विकासासंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध करू देतो. समाजामधील साक्षरतेची उच्च पातळी म्हणजे विकासाची उच्च पातळी होय. सन १९९१ च्या जनगणनेच्या आधी पाच वर्षांखालील मुला-मुलींना निरक्षर मानले जात असे. अर्थात, सन १९९१ च्या जनगणनेपासून साक्षरता दराचा विचार करण्याचा ५ वर्षावरून ७ वर्षाखालील व्यक्तींना सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची स्थापना कधी झाली? त्याची वैशिष्ट्ये व तत्त्वे कोणती?

महाराष्ट्राची साक्षरतेची स्थिती :

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात ८,१५,५४,२०० म्हणजे सुमारे ८.१६ कोटी लोक साक्षर आहेत. यांपैकी पुरुष ४.५३ कोटी आणि स्त्रियासुमारे ३.६९ कोटी साक्षर आहेत.

एकूण साक्षरतेचे संख्येनुसार पहिले पाच जिल्हे :

२०११ जनगणनेनुसार, महाराष्ट्रात एकूण साक्षरतेत सर्वांत प्रथम क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा लागतो. त्यानंतर ठाणे, नाशिक, नागपूर व या खालोखाल पुणे जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

२०११ च्या जनगणनेनुसार एकूण साक्षरतेचे संख्येनुसार शेवटचे पाच जिल्हे :

महाराष्ट्रात एकूण साक्षरतेत सर्वांत शेवटचा क्रमांक गडचिरोली जिल्हा आहे. नंतर सिंधुदुर्ग, हिंगोली, वाशीम, नंदुरबार या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रातील साक्षरतेच्या टक्केवारीची वैशिष्ट्ये :

१) महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी ८२.३०% असून या सरासरीपेक्षा जास्त साक्षरतेची टक्केवारी १३ जिल्ह्यांची आहे. साक्षरतेच्या सरासरी टक्केवारी व ८० टक्के या दरम्यान दहा जिल्हे आहेत.

२) महाराष्ट्रात पुरुष साक्षरता टक्केवारी ८८.४% आहे. नंदुरबार जिल्ह्याची पुरुष साक्षरता टक्केवारी ७१.९% आहे.

३) स्त्री साक्षरता दर : सन २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात स्त्री साक्षरता दर ७५.९% आहे,. २००१ साली स्त्री साक्षरता दर ६७% होता. सन २००१ ते २०११ या दशवार्षिक काळात स्त्री साक्षर दरात ८.९% टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच २००१ ते २०११ या दशवार्षिक काळात स्त्री साक्षरतेची संख्या ९५ दशलक्षांनी वाढली.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography demography of maharashtra sex ratio of girl boys and literacy mpup spb
Show comments