सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील तापमान कक्षांचा आढावा घेतला. या लेखातून आपण महाराष्ट्रातील पावसाबाबत जाणून घेऊ. महाराष्ट्रात सरासरी पाऊस सुमारे १४२ सें.मी. इतका पडतो. त्यापैकी नैर्ऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात ८७% पाऊस; तर उरलेला १३% पाऊस वर्षातील आठ महिने पडतो. जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत पाऊस जवळजवळ पडत नाही.
प्रादेशिक विभागणीनुसार महाराष्ट्रातील पावसाचे वितरण पाहिले असता, कोकणामध्ये सर्वांत जास्त पावसाची नोंद २८७ सें.मी. होते; तर पूर्वेस असलेल्या विदर्भात ११० सें.मी. पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्रात ९२ सें.मी. व मराठवाड्यात सर्वांत कमी म्हणजे ७७ सें.मी. पाऊस पडतो.

पावसाळ्याचे पर्जन्याच्या आगमन व परतीनुसार एकूण चार भाग केले जातात.

  • मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल
  • पर्जन्यक्षम प्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण
  • मान्सूनचा खंड
  • मान्सूनचे निर्गमन

महाराष्ट्रातील पर्जन्य यंत्रणा

हिवाळ्यात वायव्य भारतात तयार झालेला जास्त दाबाचा पट्टा हा सूर्य कर्कवृत्ताकडे येत असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो आणि त्याचा बराचसा भाग सागरावरही असतो. यावेळी वायव्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होतो; परंतु तो अजूनही कमजोरच असतो. या कमी दाबाच्या प्रदेशाकडे दक्षिणेकडील जास्त दाबाच्या भागाकडून वारे वाहू लागतात. हे वारे काही प्रमाणात समुद्रावरून वाहत येतात. महाराष्ट्रात एप्रिल व मे महिन्यात जो पाऊस पडतो, त्याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याच अंशी कारणीभूत असते.

‘आंबेसरी’चा पाऊस

उन्हाळा ऋतू जरी पावसाचा नसला तरी एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडतो आणि काही वेळेस ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहतात; ते पाऊस देतात. या वेळेस आंब्याचा बहर असतो म्हणून या पावसास ‘आंबेसरी’, असे म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्यात या काळात ८ ते १३ सें.मी. पाऊस पडतो. इतर ठिकाणी अशा पावसाचे प्रमाण २ ते ५ सें.मी. असते.

मार्च ते मे (उन्हाळा) काळातील पाऊस

महाराष्ट्रातील दक्षिण मराठवाडा, पश्चिम विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकचा दक्षिण भाग, अहमदनगर, पुणे, साताऱ्यातील खंडाळा, फलटण, दहिवडी व सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण २.५ ते ५ सें.मी. असते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सावंतवाडी वगळता संपूर्ण जिल्हा; रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग; सातारा जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग; सांगली जिल्ह्याचा उत्तर व कवठेमहांकाळ, जत याचप्रमाणे गडचिरोलीच्या दक्षिण भागात उन्हाळ्यातील पावसाचे प्रमाण ५ ते ७.५ सें.मी. असते. उत्तर महाराष्ट्र व कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याचा उत्तर भाग, पूर्व विदर्भ तसेच औरंगाबादचा बराचसा भाग, जालना, परभणी व हिंगोलीच्या उत्तर भागात उन्हाळ्यात १ ते १.५ सें.मी. पावसाची नोंद होते. महाराष्ट्र राज्यात उन्हाळ्यात सर्वांत जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व चंदगड तालुक्याच्या काही भागांत १० सें.मी. ते १२ सें.मी.पर्यंत पडतो.

महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण

१) ३०० सें.मी.पेक्षा जास्त पाऊस असणारे प्रदेश (अतिशय जास्त पाऊस) : महाराष्ट्रात कोकण व पश्चिम घाटात पावसाचे वार्षिक प्रमाण ३०० सें.मी.पेक्षा जास्त आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण ३०० सें.मी.पेक्षा जास्त आढळते. कारण- किनारपट्टीच्या जसजसे अधिकाधिक पूर्वेकडे जावे, तसतसा सह्याद्री पर्वताचा पायथ्यालगतचा भाग येतो आणि एकदम सरळ भिंतीसारखा सह्याद्री पर्वत पुढे वाऱ्याच्या दिशेला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वतावर येऊन धडकतात. मान्सूनची धडक आल्याने घाटमाथ्यावर तर पावसाचे प्रमाण ४०० सें.मी. पेक्षा जास्त असते. घाटमाथ्यावर आंबोली ७४५ सें.मी., महाबळेश्वर ५८९ सें.मी., माथेरान ५२८ सें.मी. एवढे पर्जन्यमान नोंदवले गेले आहे.

२) २०० ते ३०० सें.मी.दरम्यान पाऊस (जास्त पाऊस) असणारे प्रदेश : अरबी समुद्रालगतचा कोकण किनारपट्टीलगतचा उत्तर-दक्षिण चिंचोळा भाग आणि घाटमाथ्याच्या लगेच पूर्वेस असलेल्या मावळ भागात २०० ते ३०० सें.मी.दरम्यान पाऊस होतो. या पट्ट्यात कोकणात देवगड २६५ सें.मी., अलिबाग २२४ सें.मी. पावसाचे प्रमाण असते. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेल्याचे बघायला मिळते. २७ जुलै २००५ रोजी महाराष्ट्रात मुंबई (सांताक्रूझ) येथे २४ तासांमध्ये ९४.२४ सें.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे.

३) १०० ते २०० सें.मी.दरम्यान पाऊस (मध्यम पाऊस) असणारे प्रदेश : महाराष्ट्राच्या पूर्व भागात विदर्भामध्ये या पावसाचा सर्वांत मोठा भाग आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे पूर्ण जिल्हे समाविष्ट होतात. नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांतील पूर्व भागात पावसाचे हेच प्रमाण आढळते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा ईशान्य कोपरा व पूर्व भागात मध्यम पावसाची नोंद होते. तसेच कोकण किनारपट्टीलगत एक चिंचोळा पट्टा मावळच्या पूर्वेस उत्तर-दक्षिण दिशेने आढळतो.

४) वार्षिक पर्जन्य ७५ ते १०० सें.मी.दरम्यान पाऊस असणारे प्रदेश : पश्चिम विदर्भात बहुतेक ठिकाणी पावसाचे प्रमाण ७५ सें.मी. पेक्षा जास्त आहे. नाशिक, अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात हे प्रमाण आढळते. तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण ९० ते १०० सें.मी.दरम्यान असते.

५) ५० ते ६० सें.मी.दरम्यान पाऊस असणारे प्रदेश : मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर व नाशिक हे जिल्हे; खानदेशात धुळे जिल्हा आणि मराठवाड्यात औरंगाबाद व बीड या जिल्ह्य़ांचा समावेश वार्षिक पर्जन्य ५० ते ६० सें.मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात होतो.

६) वार्षिक पर्जन्य ५० सें.मी.पेक्षा कमी पाऊस असणारे प्रदेश : मध्य महाराष्ट्रात सातारा, पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागात वार्षिक पर्जन्य ५० सें.मी.पेक्षा कमी असते. महाराष्ट्रात सर्वांत कमी वार्षिक पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात पुसेसावळी येथे (३८.७५ सें.मी.) होते. याव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यात फलटण येथे ४८.८८ सें.मी.; तर म्हसवड येथे ४९.८८ सें.मी. इतक्या वार्षिक पावसाची नोंद होते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography maharashtra rainfall and its type mpup spb
First published on: 17-10-2023 at 16:46 IST