सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखात आपण जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील स्थलांतर, तसेच इतर राज्यांतून महाराष्ट्रात होणारे स्थलांतर बघितले. या लेखातून आपण स्थलांतराच्या कारणानुसार स्थलांतरीतांचे स्वरूप जाणून घेऊ.

महाराष्ट्रातील स्थलांतराची कारणे पुढीलप्रमाणे :

  • रोजगार
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • विवाह
  • जन्मानंतर कुटुंबासह होणारे स्थलांतर

महाराष्ट्रात वरील कारणांमुळे २००१ सालच्या जनगणनेनुसार एकूण स्थलांतरीतांची संख्या ४१७.१५ लाख आहे. शहरी भागातून १९२.६५ लाख लोकांनी स्थलांतर केलेले आहे. त्यांपैकी ग्रामीण भागातून झालेले स्थलांतर २२४.५ लाख इतके आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची स्थापना कधी झाली? त्याची वैशिष्ट्ये व तत्त्वे कोणती?

स्थलांतराच्या कारणाच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने कारणे पुढीलप्रमाणे :

  • विवाहामुळे स्थलांतर सर्वांत जास्त आहे.
  • कुटुंबासह स्थलांतर १७.२३%
  • रोजगार १६.५५%
  • इतर कारणांमुळे स्थलांतर १६.४२%
  • जन्मानंतर स्थलांतर १२.२५%
  • शिक्षणामुळे स्थलांतर १.४५%
  • व्यवसायामुळे होणारे स्थलांतर नगण्य आहे.

१) रोजगारामुळे स्थलांतर

२००१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात रोजगारामुळे ६९.०५ लाख लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यापैकी पुरुष संख्या ६२.३१ लाख (१६.५५%) आणि स्त्रियांची संख्या बरीच कमी म्हणजे फक्त ६.७५ लाख आहे. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ५५ लाखांनी जास्त आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे रोजगारासाठी एकटे पुरुष मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. ग्रामीण भागातून १७.९० लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यापैकी रोजगारासाठी स्थलांतर केलेल्यांमध्ये स्त्रियांची संख्या जेमतेम ३.७७ लाख; तर पुरुषांची संख्या १४.१३ लाख आहे. ग्रामीण भागामधून झालेल्या स्थलांतरीतांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे १० लाखांनी जास्त आहे. नागरी भागामधून रोजगारासाठी एकूण ५१.१५ लाख लोकांनी महाराष्ट्रात स्थलांतर केलेले आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ४८.२० लाख; तर स्त्रियांची संख्या फक्त २.९६ लाख आहे. रोजगारासाठी स्त्रियांपेक्षा पुरुष स्थलांतरीतांची संख्या सुमारे ४५ लाख एवढी प्रचंड आहे. नागरी भागामधील रोजगारासाठी पुरुष स्थलांतरीतांची संख्या सुमारे तीन लाख एवढी जास्त आहे.

२) व्यवसायामुळे स्थलांतर

महाराष्ट्रात व्यवसायामुळे १.९३ लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यापैकी पुरुषांची संख्या १.६७ लाख; तर स्त्रियांची संख्या फक्त २५ हजार आहे. त्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या १.४२ लाखांनी जास्त आहे. व्यवसायासाठी प्रामुख्याने पुरुष आपले पूर्वीचे राहण्याचे ठिकाण सोडून नवीन प्रदेशात स्थलांतर करतात. व्यवसायामुळे ग्रामीण भागातून महाराष्ट्रात ३८ हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. नागरी भागातून व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात स्थलांतर केलेल्यांची एकूण संख्या २.९३ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या १.४१ लाख; तर स्त्रियांची संख्या फक्त १३ हजार आहे.

३) शिक्षणामुळे स्थलांतर

महाराष्ट्रात शिक्षणामुळे झालेल्या स्थलांतरीतांची संख्या ६.०४ लाख म्हणजेच एकूण स्थलांतराच्या १.४५% आहे. त्यांपैकी मुलांची संख्या ४.४१ लाख; तर मुलींची संख्या फक्त १.६३ लाख आहे. शिक्षणामुळे स्थलांतर होणाऱ्या मुलींपेक्षा मुलांची संख्या सुमारे २.९ लाखांनी जास्त आहे. शिक्षणासाठी अनेक कारणांमुळे मुलींचे स्थलांतर करण्यास पालकांची इच्छा होत नाही. त्याचप्रमाणे मुलींचाही बऱ्याच वेळा स्थलांतराचा कल असतोच, असे नाही. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून शिक्षणामुळे स्थलांतर केलेल्यांची एकूण संख्या २.१२ लाख असून, मुलांची संख्या १.४८ लाख; तर मुलींची संख्या फक्त ६४ हजार आहे.

मुलींपेक्षा मुलांची संख्या साधारण २.३ पट आहे. महाराष्ट्रात नागरी भागातून शिक्षणामुळे झालेल्या स्थलांतरीतांची एकूण संख्या ३.९२ लाख आहे. त्यापैकी मुलांची संख्या २.९३ लाख; तर मुलींची संख्या ९९ हजार आहे. मुलींपेक्षा मुलांची ही संख्या साधारण तीन पट आहे. ग्रामीण भागापेक्षा नागरी भागातून शिक्षणासाठी होणाऱ्या स्थलांतरामध्ये मुलींची संख्या व प्रमाण जास्त आहे.

४) विवाहामुळे स्थलांतर

महाराष्ट्रात विवाहामुळे होणारे स्थलांतर सर्वांत जास्त आहे. विवाहामुळे झालेल्या एकूण स्थलांतरीतांची संख्या १४८ लाख आहे. त्याची टक्केवारी एकूण स्थलांतराच्या ३५.६४% आहे. त्यामध्ये स्त्रियांची संख्या १४७ लाख; तर पुरुष संख्या फक्त एक लाख असून, ती नगण्य आहे. स्त्रियांचे स्थलांतर प्रामुख्याने महाराष्ट्रात जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा स्थलांतर पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय स्तरावर विवाहामुळे स्थलांतर होऊन महाराष्ट्रात स्थलांतर होणाऱ्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा १४६ लाखांनी जास्त आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील आदिवासी समाज; वैशिष्ट्ये, लोकसंख्या अन् जमातीचे वर्गीकरण

५) जन्मानंतर होणारे स्थलांतर

२००१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात जन्मानंतर होणाऱ्या एकूण स्थलांतरीतांची संख्या ५१.०९ लाख १२.२५% आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ३१ लाख; तर स्त्रियांची संख्या २० लाख आहे.

स्थलांतराच्या कारणानुसार स्थलांतरीतांची संख्या

महाराष्ट्रात ग्रामीण भागातून जन्मानंतर स्थलांतर होणाऱ्या लोकांची एकूण संख्या ३१.५० लाख आहे. त्यांपैकी पुरुषांची संख्या १९.३५ लाख; तर स्त्रियांची संख्या ११.७० लाख आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ७.५ लाखांनी जास्त आहे. महाराष्ट्रात नागरी भागातून जन्मानंतर होणाऱ्या स्थलांतरीतांची एकूण संख्या २०.०४ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ११.७४ लाख; तर स्त्रियांची संख्या ८.३० लाख आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ३.५० लाखांनी जास्त आहे. कुटुंबासह स्थलांतर करणाऱ्यांची संख्या सुमारे ७२ लाख म्हणजेच एकूण स्थलांतराच्या १७.२३% आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून कुटुंबासह स्थलांतरीतांची एकूण संख्या २६ लाख आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ११ लाख; तर स्त्रियांची संख्या १४.८८ लाख आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांची ही संख्या ३.८८ लाखांनी जास्त आहे.

इतर कारणांमुळे स्थलांतर

२००१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात इतर कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतरीतांची संख्या ६८.४८ लाख म्हणजेच १६.४२% आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ३७ लाख; तर स्त्रियांची संख्या ३१ लाख आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांची ही संख्या सहा लाखांनी जास्त आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातून इतर कारणांमुळे स्थलांतरीतांची एकूण संख्या ४० लाख आहे. महाराष्ट्रात नागरी भागातून इतर कारणांमुळे स्थलांतरीतांची एकूण संख्या २८.३७ लाख आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography nature of migration in maharashtra mpup spb
Show comments