सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील झोपडपट्ट्या, त्याची कारणे, संबंधित समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांबाबत सविस्तर जाणून घेऊ या. यामध्ये आदिवासी समाज म्हणजे काय? यामध्ये कोणाचा समावेश होतो? त्यांची वैशिष्ट्ये इत्यादींचा अभ्यास करू.

आदिवासी समाज म्हणजे काय?

आदिवासी हा शब्द एक आधुनिक संस्कृत शब्द आहे. हा शब्द पहिल्यांदा १९३० च्या दशकात राजकीय कार्यकर्त्यांकडून वापरण्यात आला. तसेच हा शब्द वांशिक अल्पसंख्याकांसाठीदेखील वापरला जातो. आदिवासी हा इंग्रजीतील ‘अ‍ॅबॉरिजिनीझ्’ या शब्दाचा रूढ मराठी पर्याय आहे. आदिवासी म्हणजे अरण्यात राहणारे, त्या विशिष्ट प्रदेशातील मुळचे रहिवासी होय. त्यांना वनवासी म्हणावे आदिवासी नव्हे, अशी संकल्पना अनेकांनी मांडल्या आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

आदिवासींची ठळक वैशिष्ट्ये :

  • आदिवासी जमात एका विशिष्ट भूप्रदेशात राहते.
  • एकेका आदिवासी जमातीची बहुधा स्वतंत्र भाषा वा बोली असते.
  • आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो; त्यांची तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात. त्यांची संस्कृती, प्रथा, रूढी-परंपरा एकमेकांपासून भिन्न असतात. आदिवासींच्या दागिन्यांत कवड्यांचा सर्वांत जास्त उपयोग करण्यात येतो.
  • आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते.
  • अर्थव्यवस्थेत पैशाचे चलन नसते; वस्तूंची देवाणघेवाण होते.
  • शिकार, मासेमारी व इतर पद्धतीने अन्न गोळा करणे व अन्नाचे उत्पादन करणे. तसेच पशुपालन हे त्यांचे प्रमुख व्यवसाय असतात. या जमाती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत.
  • लोकसंख्येची घनता कमी असून हे समाज लहान व काही अपवाद सोडल्यास भटके असतात.
  • उपयुक्त वस्तूंना कलात्मक रूप देण्याची प्रवृत्ती आदिवासींत आढळते. संगीत, लोकनृत्य अंगाईगीते, प्रीतिगीते, युद्धगीते, भजने हे प्रकार आदिवासींत आढळतात. यामध्ये ते निपुण असतात. सर्वसामान्य गीते, प्रासंगिक गीते, कुळी-गीते, धार्मिक गीते, स्त्रीगीते, बोधगीते याशिवाय म्हणी, उखाणे इत्यादीही आदिवासी जमातींत आढळून येतात.
  • आदिवासींत झूम प्रकारची म्हणजेच स्थलांतरित शेती केली जाते, ज्याला महाराष्ट्राच्या कोकण विभागात कुमरी संबोधले जाते.

महाराष्ट्रातील आदिवासी जमाती लोकसंख्या व प्रमाण :

भारतात ३००च्या वर आदिवासी जमाती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार आदिवासी समाज हा एकूण लोकसंख्येच्या ८.९ टक्के आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ५,०४,१२,२३५ लोकांपैकी २९,५४,२४९ म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ५•८६ टक्के आदिवासी होते. महाराष्ट्रात धुळे- ६,१५,८०१; ठाणे- ५,७९,५३८; नाशिक-५,६१,२०२; चंद्रपूर-२,३१,४०२; यवतमाळ- १,९७,९७७; अहमदनगर- १,४५,७१३; जळगाव-१,२५,०२६; पुणे – १,०८,४०५ अशी आदिवासी जमातीची जिल्हावार विभागणी आहे. याशिवाय इतरत्रही त्यांची तुरळक वस्ती आहे. ठाणे जिल्ह्यातील तलासरी व मोखाडा, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा व धुळे जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यांत आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील ४० आदिवासी जमातींना अनुसूचित जमाती म्हणून सरकारने मान्यता दिली आहे. त्यापैकी भिल्ल- ५,७५,००० (२४ टक्के); महादेव कोळी-२,७४,००० (११ टक्के); गोंड- २,७२,००० (११ टक्के); वारली २,४३,००० (१० टक्के); कोकणा – २,१२,००० (९ टक्के); ठाकूर-१,५९,००० (७ टक्के) व काथोडी किंवा कातकरी १,४०,००० (६ टक्के) या २०११ च्या जनगणनेनुसार बहुसंख्य आहेत.

महाराष्ट्रातील आदिवासींची अर्थव्यवस्था, समाजसंघटना, धर्मविधी, कला इ. भारतातील इतर आदिवासींप्रमाणेच आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती. याशिवाय अन्नसंकलन, मासेमारी व शिकार यांसारखे इतर व्यवसायही ते करतात. शेतमजूर व जंगल कामगार म्हणूनही बरेच आदिवासी उपजीविकेचा भाग म्हणून काम करतात. चंद्रपूर जिल्ह्यात घनदाट जंगलात राहणाऱ्या माडिया गोंड जमातीत अजूनही वस्तुविनिमय पद्धत आढळते. झोपड्या बांबूच्या किंवा कुडाच्या, असतात. महाराष्ट्रातील आदिवासींचे कुटुंब सर्वसाधारणपणे एकविवाही असते. गावपाटील, भगत इ. प्रमुख व्यक्तींत बहुपत्‍नीकत्व आढळते. वधूमूल्याच्या रिवाजामुळे चांगल्या परिस्थितीतील आदिवासी व्यक्ती अधिक विवाह करू शकते. सेवा, सहपलायन, विनिमय, घरघुशी इ. विवाहप्रकारही आढळतात. अलीकडे शिक्षण प्रसारामुळे मुलींच्या शिक्षणावरही वधूशुल्क अवलंबून असते. स्त्रीचा दर्जा चांगला आहे व तिला पुरुषाच्या बरोबरीने वागणूक मिळते. स्त्रीस घटस्फोटाचे स्वातंत्र्य असते.

महाराष्ट्रातील आदिवासींच्या धर्मावर हिंदू धर्माचा बराच पगडा आहे. जादूटोणा यावर माडिया गोंड जमातीची जास्त श्रद्धा आहे. भिल्ल लोक अर्जुनास राजा व कृष्णास ठाकूर म्हणतात. ते दिवाळी व होळी हे सण करतात, परंतु त्यांची पद्धत वेगळी असते. निरनिराळ्या गावांची दिवाळी निरनिराळ्या दिवशी करतात. जमातीत गावप्रमुखही असतो. ही सर्व पदे वंशपरंपरागत असतात. महाराष्ट्रातील भिल्ल, महादेव कोळी, ठाकूर, कातकरी, गोंड व वारली जमातींत नृत्यगीते, विवाहगीते, शिकारीची गाणी, शोकगीते, शेतकऱ्यांची गाणी, अंगाई गीते इ. लोकगीतांचे प्रकार आहेत. त्याशिवाय पौराणिक दंतकथा, उखाणे, म्हणी यांचे अलिखित लोकसाहित्य बरेच आहे. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेली जमाती भिल्ल आहे, जी २४ टक्के आहे. त्यानंतर गोंड व महादेव कोळी या आदिवासी जमातींची लोकसंख्या आहे. तसेच इतर जमाती हलबा, माडिया गोंड, वारली, ठाकर, आंध, कोरकु, मावची गावित या जमाती आढळतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील झोपडपट्ट्या; कारणे, संबंधित समस्या अन् उपाययोजना

महाराष्ट्रात एकूण भारतातील ७५ विशेषतः धोक्यात असलेल्या जमाती गटात तीन जमातींचा समावेश होतो.

१) कातकरी/ कथोडी : या जमातीचे महाराष्ट्राच्या जमातीतील एकूण लोकसंख्येत प्रमाण २.७१ टक्के आहे. ही जमात नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. यांचे पारत नृत्य व ढोल नृत्य ही लोकनृत्य आहेत.

२) गोंड : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील प्रदेशात आढळतात.

३) कोलम : यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी आहेत.

जिल्ह्यानुसार महाराष्ट्रातील आदिवासी जमातीचे वर्गीकरण :

२०११ सालच्या जनगणनेनुसार, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या जिल्हावार टक्केवारीनुसार सर्वांत प्रथम क्रमांक नंदूरबार जिल्हा आहे. या खालोखाल गडचिरोली, धुळे, नाशिक, यवतमाळ या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. सर्वात शेवटचा जिल्हा सांगली आहे. या खालोखाल कोल्हापूर, मुंबई शहर, सिंधुदुर्ग यांचा क्रमांक लागतो.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc geography scheduled tribes in maharashtra features population and classification mpup spb
Show comments