सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण भारतात पाऊस कसा पडतो? मान्सून ही घटना नेमकी काय आहे? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारतातील पावसाळा कसा असतो? त्याचे आगमन कधी होते आणि तो माघारी कधी जातो, याबाबत जाणून घेणार आहोत.

भारतात मान्सूनचे आगमन

भारतातील पावसाळी हंगाम जूनमध्ये नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांच्या आगमनापासून सुरू होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत चालू राहतो. त्याला पावसाळी ऋतू, नैर्ऋत्य मोसमी ऋतू, आर्द्र ऋतू व उष्ण-ओला ऋतू असेही म्हणतात. मान्सूनच्या वाऱ्यांसह देशभरातील हवामान बदलते. उच्च तापमान, उच्च आर्द्रता, विस्तृत ढग आणि जोरदार पृष्ठभागावरील वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस ही या हंगामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

अंदमान व निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख २० मे आहे. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती जास्त वेगाने होते, हे नमूद करण्यासारखे आहे. मान्सून बंगालच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात जवळपास २०° उत्तर अक्षांशापर्यंत पोहोचतो; तर तो केरळच्या दक्षिणेला अरबी समुद्रामध्ये सुमारे ७° उत्तर अक्षांशावर असतो. केरळमध्ये (म्हणजे भारताच्या मुख्य भूमीत प्रथम प्रवेशाचे ठिकाण) नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रारंभाची सामान्य तारीख १ जून आहे. मान्सूनची सुरुवात मोठ्या ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसासह होते. अचानक सुरू झालेल्या या पावसाला ‘मान्सूनचा विस्फोट’, असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतात पाऊस का पडतो? ‘भारतीय मान्सून’ ही घटना नेमकी काय आहे?

भारतात मान्सूनचे वारे अरबी समुद्र व बंगालचा उपसागरावरून येतात; त्यांच्या शाखा खालीलप्रमाणे :

अरबी समुद्रावरून येणाऱ्या शाखा/प्रवाह :

पहिला प्रवाह भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आदळतो आणि पश्चिम किनारपट्टीच्या मैदानात २५० सेंमीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडतो. पण, घाट ओलांडताना या वाऱ्यांचे तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते. त्यामुळे घाटाच्या पूर्वेकडील भागात कमी पाऊस पडतो म्हणून त्या प्रदेशाला ‘लीवार्ड साइड’ (Leeward Side) किंवा पर्जन्यछायेचा प्रदेश, असे म्हणतात. अशा प्रकारे पश्चिम किनार्‍यावरील मुंबईत सुमारे १९० सेंमी, खंडाळ्यात पूर्वेला ५० किमी अंतरावर ६० सेंमी आणि मुंबईपासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या पुण्यात पावसाळ्यात केवळ ५० सेंमी पाऊस पडतो. ही घटना जवळपास संपूर्ण पश्चिम घाटावर दिसून येते.

दुसरा प्रवाह नर्मदा-तापी कुंडांमध्ये प्रवेश करतो आणि मध्य भारतात पोहोचतो. तेथे कोणताही मोठा ऑरोग्राफिक अडथळा नसल्यामुळे किनार्‍याजवळ फारसा पाऊस पडत नाही. या शाखेपासून नागपूरला सुमारे ६० सेंमी पाऊस पडतो.

तिसरा प्रवाह अरवली पर्वतरांगेला समांतर उत्तर-पूर्व दिशेने सरकतो. अरवली पर्वतरांगेची दिशा मान्सून वाऱ्यांच्या दिशेला समांतर असल्याने, ते वाऱ्यांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण करीत नाहीत आणि हे वारे जास्त पाऊस न पाडता, पुढे सरकतात. त्यामुळे राजस्थानचा हा बहुतांश भाग वाळवंटी आहे.

नैर्ऋत्य मान्सूनच्या बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे दोन शाखा / प्रवाहांमध्ये विभागलेले आहेत :

पहिला प्रवाह मेघालयात प्रवेश करतो. येथील मान्सूनच्या वार्‍यांवर ऑरोग्राफिक (पर्वतांमुळे वाऱ्यांना एका प्रदेशात अडकवणे) प्रभाव असून, परिणामी पावसाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. चेरापुंजी (२५° १५’ उत्तर, ९१° ४४’ पूर्व) सरासरी समुद्रसपाटीपासून १,३१३ मीटर उंचीवर वसलेल्या भागात वार्षिक १,१०२ सेंमी पाऊस पडतो. चेरापुंजीच्या पश्चिमेला फक्त १६ किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून १,३२९ मीटर उंचीवर असलेल्या मावसिनराम (२५° १८’ उत्तर, ९१° ३५’ पूर्व) येथे वार्षिक १,२२१ सेंमी एवढा जास्त पाऊस पडतो. दोन्ही ठिकाणे खासी टेकड्यांच्या दक्षिणेकडील उतारावर आहेत. जेव्हा मान्सूनचे वारे दक्षिणेकडून वाहतात तेव्हा ते फनेल आकाराच्या खोऱ्यात अडकतात आणि चेरापुंजी व मावसिनराम यांना ९०° मधे धडकतात. या कारणास्तव तिथे भरपूर पाऊस पाडतो. चेरापुंजी व मावसिनराम येथे देशाच्या अनेक भागांतील वार्षिक सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात पडू शकतो. या दोन ठिकाणी एका दिवसात सर्वाधिक पावसाची नोंद अनुक्रमे १०३.६ सेंमी व ९९ सेंमी झाली आहे; तर ती ईशान्येकडील राज्यांच्या बहुतांश भागांत पाऊस २०० सेंमीपेक्षा जास्त आहे.

कोलकाता येथे मान्सून शाखेच्या आगमनाची सामान्य तारीख ७ जून आहे. हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर बंगाल उपसागरावरील शाखा हिमालयाच्या अडथळ्याने पश्चिमेकडे वळते आणि ती गंगेच्या मैदानापर्यंत पुढे जाते. दोन्ही शाखा (अरबी समुद्र व बंगाल उपसागरावरील) आग्रा व फिरोजपूरमधे एकत्र येतात आणि एकमेकांमध्ये विलीन होऊन एकच प्रवाह तयार होतो. एकत्रित प्रवाह हळूहळू पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि शेवटी हिमाचल प्रदेश व काश्मीरपर्यंत विस्तारतो.

मान्सून खंड / पावसाळ्यातील ब्रेक (Break of monsoon) :

पावसाळ्यात विशेषत: जुलै व ऑगस्टमध्ये काही विशिष्ट कालावधीसाठी मान्सून कमकुवत होतो. ढगांची निर्मिती कमी होते आणि हिमालयीन बेल्ट व आग्नेय द्वीपकल्पीय भागात पाऊस जवळजवळ थांबतो. त्याला ‘मान्सूनमधील ब्रेक’ असे म्हणतात. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अधिक ब्रेक वारंवार येण्याची शक्यता असते. ब्रेकचा सामान्य कालावधी सुमारे एक आठवडा असतो; परंतु काही प्रसंगी तो जास्त असू शकतो. प्रदीर्घ मान्सून खंड दोन ते तीन आठवडे टिकून राहतो. देशाच्या बहुतेक भागांमध्ये विश्रांतीच्या कालावधीत पाऊस नसतानाही उप-हिमालयीन प्रदेश आणि हिमालयाच्या दक्षिणेकडील उतारांवर मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे हिमालयातील पाणलोट क्षेत्र असलेल्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येतो. पावसाळ्यात सरासरी एक किंवा दोन ब्रेक होतात. मान्सूनच्या सांख्यिकीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की, १०० पैकी ८५ वर्षांमध्ये मान्सूनमध्ये खंड पडतो.

भारतीय मोसमी पावसाची मुख्य वैशिष्ट्ये :

  • पाऊस जून ते सप्टेंबरदरम्यान मोठ्या प्रमाणात पडतो.
  • (२) हिमालय आणि पश्चिम घाट हे मान्सून वाऱ्यांना अडथळे निर्माण करतात. हिमालयामुळे मान्सून वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये व सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा मैदानात पाऊस पडतो. पुन्हा पश्चिम घाटाच्या वाऱ्याच्या बाजूस २५० सेंटिमीटरपेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडतो; तर पश्चिम घाटाच्या पूर्व बाजूच्या बहुतेक भागांत वार्षिक ६० सेंमीपेक्षा कमी पाऊस पडतो.
  • (३) समुद्रापासून वाढत्या अंतराने पावसाचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ- नैर्ऋत्य मान्सून कालावधीत कोलकात्याला ११९ सें.मी., पाटणा येथे १०५ सें.मी., अलाहाबाद ७६ सें.मी., तर दिल्लीत ५६ सें.मी. पाऊस पडतो.
  • (४) नैर्ऋत्य मोसमी पाऊस मुसळधार पावसाच्या स्वरूपात येतो; ज्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीची धूप (माती वाहून जाणे) होते.
  • (५) भारतीय मान्सून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : पृथ्वीवरील तापमान संतुलित कसे राहते? त्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात?

मान्सूनची माघार :

जम्मू-काश्मीर आणि राजस्थान, पंजाब राज्यांतून पावसाची माघार सुमारे १ सप्टेंबरपासून होते. या परतीच्या वाटेवर शक्यतोवर हे वारे पाऊस पाडत नाहीत. परंतु, अपवादात्मक स्थितीत ते बंगालच्या उपसागरावरून वळण घेऊन पुन्हा जमिनीवर शिरून पाऊस पाडतात. उदाहरणार्थ- तमिळनाडू राज्यात ईशान्य मोसमी वारे भरपूर पाऊस पाडतात हा अपवाद आहे. तसेच विदर्भामध्येही परतीच्या प्रवासात हे वारे पाऊस पाडून जातात. साधारणतः १ डिसेंबरच्या सुमारास संपूर्ण भारतातून मोसमी वारे माघार घेतात. त्यालाच परतीचा पाऊस (Retreating of monsoon) असे म्हणतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography arrival progress burst break and retreat of monsoon in india mpup spb
Show comments