सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखांतून आपण पृथ्वीवरील हवामान व हवामान घटकांचा आढावा घेतला. या लेखामधून आपण भारतीय मान्सून ही घटना काय आहे हे या संदर्भात जाणून घेऊ. मान्सून हा शब्द ज्या भागातील वारे दरवर्षी त्यांची दिशा बदलतात, त्या वाऱ्यांना दर्शवण्यासाठी वापरला जातो. खरे तर, ‘मान्सून’ हा अरबी शब्द आहे. मान्सून हा एका विस्तृत भौगोलिक क्षेत्रावरील सामान्य वातावरणाच्या अभिसरणाचा एक प्रवाह आहे; ज्यामध्ये संबंधित प्रदेशाच्या प्रत्येक भागात एका दिशेने प्रबळ वारा वाहत असतो. हिवाळ्यापासून उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत वारा एकमेकांच्या उलट (किंवा जवळजवळ उलट) असतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : पृथ्वीवरील तापमान संतुलित कसे राहते? त्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात?

वाऱ्यांमध्ये दिशाबदल हा मान्सूनचा एकमेव निकष नाही हे उघड आहे. खरे तर मान्सून ही पृष्ठभागाची संवहन प्रणाली आहे; ज्याची उत्पत्ती जमीन आणि पाणी (महासागर) यांच्या भिन्नपणे गरम आणि थंड होण्यामुळे होते. मान्सून वाऱ्यांचे वर्चस्व असलेल्या प्रदेशांना ‘मान्सून हवामान क्षेत्र’ असे म्हणतात; जे भारतीय उपखंड, दक्षिण-पूर्व आशिया, चीन व जपानच्या काही भागांमध्ये अधिक विकसित आहेत. जरी भारताचा उत्तर भाग समशीतोष्ण पट्ट्यात वसलेला आहे तरी भारत हा मुळात उष्ण कटिबंधीय देश आहे. दक्षिणेकडे भारतीय किनारी हवामान अरबी समुद्र आणि बंगाल उपसागर या हिंदी महासागराच्या शाखांनी प्रभावीत केले जाते; ज्यामुळे त्याला विशिष्ट उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान प्राप्त होते.

भारतीय मान्सूनचा उगम :

१९५० नंतर भारतीय मान्सूनच्या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, त्याची मूळ यंत्रणा खालील तथ्यांशी संबंधित आहे :

१) यांत्रिक अडथळा किंवा उच्चस्तरीय उष्णता स्रोत म्हणून हिमालय आणि तिबेट पठाराच्या स्थितीची भूमिका.
२) तपांबरामधील उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील वावटळी.
३) तपांबरामध्ये हवेच्या जेट प्रवाहांचे अस्तित्व.
४) आशिया आणि हिंदी महासागराच्या प्रचंड भूभागाचे वेगवेगळेपणे गरम आणि शीतकरण होणे.

मान्सूनची यंत्रणा :

मान्सूनचा उगम अजूनही गूढ आहे. परंतु, वेगवेगळ्या संकल्पना देऊन मान्सूनची यंत्रणा सांगण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व संकल्पनांचा एकत्रितपणे विचार करून, आपण एकंदरीत मान्सूनची यंत्रणा काय आहे याचा आढावा घेऊ. उन्हाळ्यात सूर्यकिरणे कर्क वृत्ताच्या उष्ण कटिबंधावर ९०° ने पृथ्वीवर येतात; ज्यामुळे मध्य आशियामध्ये उच्च तापमान आणि कमी दाब निर्माण होतो. तर, याउलट अरबी समुद्रावर आणि बंगालच्या उपसागरावर कमी दाब असतो. त्यामुळे हवेचा प्रवाह समुद्रातून जमिनीकडे जातो आणि भारत व तिच्या शेजारील देशांत मुसळधार पाऊस पडतो. याला नैर्ऋत्य मोसमी पाऊस म्हणतात.

हिवाळ्यात सूर्याची किरणे ९०° मध्ये मकर वृत्ताच्या उष्ण कटिबंधावर पडतात. भारताचा उत्तर-पश्चिम भाग अरबी व बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त थंड राहतो आणि या भागावर उच्च दाबाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे मान्सूनचा प्रवाह उलट होतो. म्हणजेच मान्सूनचे निर्गमन (Retreating of monsoon) होते, असे म्हणतात. यालाच ईशान्य मोसमी वारे म्हणून संबोधले जाते.

मान्सूनला प्रभावित करणारे दोन महत्त्वाचे घटक :

पश्चिम जेट स्ट्रीम/झोत वारा : जेट स्ट्रीम म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमणाने प्रभावीत होऊन नागमोडी वळणे घेत दोन्ही ध्रुवांभोवती वाहणारा हा वारा आहे. तपांबरामध्ये जवळपास ७.५ ते १४ किलोमीटर उंचीपर्यंत सरासरी, लांबी हजारो किलोमीटर, रुंदी काही १०० किलोमीटर आणि २-४ किलोमीटर या वाऱ्याची खोली असते. जेट प्रवाहाचा किमान वेग ३० मी./सेकंद (१०८ किमी/तास) आहे. हा नागमोडी वळणे घेत असल्यामुळे तो उत्तर भारतातसुद्धा बघायला मिळतो. झोतवारा उन्हाळ्यामध्ये हिमालयाच्या उत्तरेकडे सरकतो म्हणजेच उत्तर भारतावरून निघून जातो. अशा प्रकारे तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते; ज्यामुळे दक्षिण पश्चिम व्यापारी वाऱ्यांना भारतीय उपखंडावर येण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

पूर्व जेट स्ट्रीम : भारतीय मान्सूनमध्ये मदत करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पूर्व जेट स्ट्रीम; जो फक्त आणि फक्त भारतीय उपखंडावर निर्माण होतो आणि भारतीय मान्सूनला प्रभावीत करतो. याचा प्रथम शोध पी. कोटेश्वरम व पी. आर. कृष्णा यांनी १९५२ मध्ये लावला होता. तिबेटचे पठार उन्हाळ्यात तापल्यामुळे तेथील हवा उंच जाऊन हिंदी महासागराकडे परिगमन करू लागते. हिंदी महासागरावर येऊन ती खाली येण्यास सुरुवात करते आणि मान्सून वाऱ्यांना भारताकडे येण्यास प्रबळ बनवतो. अशा प्रकारे पूर्वीय जेट स्ट्रीम जेवढा मजबूत असेल, तेवढा जास्त पाऊस भारतीय उपखंडामध्ये होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : पृथ्वीवरील दाबाचे पट्टे कोणते? ते वातावरणावर कशा प्रकारे परिणाम करतात?

भारतात मान्सूनचे आगमन व निर्गमन :

भारतात मान्सून दोन शाखांद्वारे आगमन करतो. एक म्हणजे अरबी समुद्रावरून येणारी; जी पश्चिम किनारपट्टीला पाऊस देते, तर दुसरी बंगालच्या उपसागरावरून येणारी; जी भारताच्या पूर्व किनारपट्टीला पाऊस देते. सामान्यतः १ जूनला केरळ किनारपट्टीवर म्हणजेच कोरोमंडल किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन होते. यापूर्वीच २५ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून वारे पोहोचलेले असतात. अशा प्रकारे भारतामध्ये नैर्ऋत्य मान्सून वारे पुढे पुढे सरकत मुंबईच्या किनारपट्टीला १० जूनला पोहोचून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात करतात. उत्तर भारतामध्ये दोन्ही शाखा एकत्रितपणे पाऊस देतात. जवळपास ५ जुलैपर्यंत मान्सून वारे संपूर्ण भारताला व्यापून टाकतात.

१ सप्टेंबरनंतर हे वारे निर्गमनासाठी वाटचाल करण्यास राजस्थानच्या थार वाळवंटामधून सुरुवात करून १ डिसेंबरपर्यंत संपूर्ण भारतातून पावसाचे म्हणजेच ईशान्य मोसमी वाऱ्याचे निर्गमन होते. भारताच्या हवामानात वारा, तापमान, पर्जन्यमान, ऋतूंची लयता, आर्द्रता किंवा कोरडेपणा यांच्यासंदर्भात व्यक्त केलेल्या अनेक प्रादेशिक भिन्नता आहेत. हे हवामानातील फरक स्थान, उंची, समुद्रापासूनचे अंतर यामुळे आहेत. देशाचा विशाल आकार हा त्याच्या स्थलाकृतिक भिन्नतेसह भारतातील विविध प्रकारच्या हवामान परिस्थितीसाठी जबाबदार आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography how monsoon start in india mechanism of indian monsoon mpup spb
Show comments