सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधु नदीचा उगम तिबेटमधील मानस सरोवरापासून येथून झाला असून ही नदी आपला प्रवास वायव्य दिशेने करते. या नदीची एकूण लांबी २,८८० कि.मी. असून यापैकी भारतात सुमारे ७०० कि.मी. चा प्रवाह लाभलेला आहे. सिंधू नदी ही लडाख व झास्कर पर्वत रांगातून वाहते. ती जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासित प्रदेशातून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करून अरबी समुद्रास मिळते. भारतातील सिंधू नदीचे पाणलोट क्षेत्र १,१७,८४४ चौ.कि.मी. आहे. तिची उपनदी चिनाबवर सलाल हा जलविद्युत प्रकल्प असून बोखर चू या हिमनदीपासून सिंधू नदीचा उगम झाला आहे. तिबेटमध्ये या नदीला सिंगी खंबन म्हणजे सिंहमुख असे म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : द्वीपकल्पीय पठारावरील नद्या व त्यांचा विस्तार

सिंधू नदी आणि झेलम नदी दरम्यानच्या भागाला ‘सिंघ सागर दोआब’, झेलम आणि चिनाब नदी दरम्यानच्या भागाला ‘चाझ दोआब’, चिनाब आणि रावी नदी दरम्यानच्या भागाला ‘रेचना दोआब’, रावी आणि बिआस नदी दरम्यानच्या भागाला ‘बारी दोआब’ आणि बियास आणि सतलज नदी दरम्यानच्या भागाला ‘बिस्त दोआब’ असे म्हणतात.

सिंधू नदीचा राजकीय विस्तार

सिंधू नदी चीन, भारत, अफगाणिस्तान, आणि पाकिस्तान चार देशांतून वाहत असून भारतातील जम्मू-काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि हरयाणा या राज्यातून वाहते.
सिंधू नदीला उजवीकडून म्हणजे उत्तर दिशेने श्योक गिलगिट व शिंगार, तर डावीकडून म्हणजे दक्षिण दिशेने उपनद्या झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज या उपनद्या मिळतात. यातील महत्त्वाच्या नद्यांची माहिती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.

झेलम

ही नदी कश्मीर खोऱ्यात पीरपंजाल पर्वतश्रेणीत येरिनाग येथे उगम पावून वायव्येस वुलर सरोवरास येऊन मिळते. तेथून ती खोल घळईतून पश्चिमेला भारताच्या सीमेपर्यंत वाहते. नंतर ती दक्षिणेला झेलम शहराजवळ भारतीय सीमेतून पाकिस्तानात प्रवेश करते. झेलम नदीची भारतातील लांबी ४५० कि.मी. असून तिची एकूण लांबी १०० कि.मी. आहे. जलप्रणालीचे क्षेत्र १८४९० चौ.कि.मी. आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झेलमवर नीलम–झेलम नावाचा जलसिंचन व जलविद्युत प्रकल्प आहे. झेलमच्या उपनद्या– नीलम, आस्कर, लिंडार (सर्वात मोठी उपनदी) या असून झेलम पाकिस्तानमधील मैदानी प्रदेशात उजव्या बाजूने चिनाब नदीला मिळते.

चिनाब

चंद्र आणि भागा या दोन उपनद्यांच्या संगमानंतरचा प्रवाह चिनाब नदी म्हणून ओळखला जातो. या दोन नद्या हिमाचल प्रदेश ठंडी येथे एकमेकांना मिळतात. संगमानंतर ती पीरपांजाल व बृहद हिमालयातून वाहते. चिनाब नदीची एकूण लांबी ११८० कि.मी. असून यापैकी भारतातील लांबी सुमारे ५०० कि.मी. आहे व जलप्रणालीचे क्षेत्र २६,१५५ चौ.कि.मी. आहे. ती पाकिस्तानमध्ये उजव्या बाजूने सिंधू नदीला मिळते. चिनाबवर बागलिहार, सलाल आणि दतहस्ती हे जलविद्युत प्रकल्प असून झेलम, रावी, तावी, बिछलेरी या चिनाब नदीच्या उपनद्या आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : द्वीपकल्पीय पठारावरील पर्वतरांगा आणि विस्तार

रावी

या नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील कुलू डोंगरात झाला असून या नदीची भारतातील लांबी ७२५ कि.मी. व जलप्रणालीचे क्षेत्र ५९७५ चौ.कि.मी. आहे. ही नदी उगमापासून पीरपंजाल आणि धौलाधार रांगेतून वाहते व माधोपूरजवळ पंजाब मैदानात प्रवेश करते. पाकिस्तानात झेलम, चिनाब आणि रावी या नद्यांचा संयुक्त प्रवाह चिनाब या नावानेच ओळखला जातो. या नदीप्रवाहाला सैनिकी महत्त्व असून सीमेवरील गुरुदासपूर व अमृतसर जिल्हे या नदीकाठी आहेत. नदीच्या एका तीरावर भारत व दुसऱ्या तीरावर पाकिस्तान असे दृश्य पाहावयास मिळते. साहो, बुधील, घोना या रावी नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत.

बियास

पीरपंजाल श्रेणीत कुलू डोंगरात रोहतांग खिंडीजवळ ४००० मी. उंचीच्या प्रदेशात बियास नदीचा उगम होतो. नदीची लांबी ४७० कि.मी. व बियासचे पाणलोट क्षेत्र २५,९०० चौ. कि. मी. आहे. भारतातच वाहणारी सिंधू नदीची ही उपनदी असून ती पुढे सतलज नदीला हरिकेजवळ मिळते आणि खोल घळईतून वाहत जाऊन पोंगजवळ मैदानी प्रदेशात प्रवेश करते. बियास नदीने धौलाधार पर्वतरांगेत निर्माण केलेल्या काती व लागीं या खोल दऱ्या प्रेक्षणीय आहेत. बियास नदीवर हिमाचल प्रदेशात जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत. बाणगंगा, बानेर, चक्की, उही या बियास नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत.

सतलज

ही उत्तर भारतातील मैदानाच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी नदी असून या नदीचा उगम मानस सरोवराजवळ धर्मा खिंडीजवळच्या राकस सरोवरातून झालेला आहे. भारतात ही नदी शिष्कीला खिंडीतून प्रवेश करते. सतलज नदीची एकूण लांबी १४५० कि.मी. असून भारतातील लांबी १०५० कि.मी. व पाणलोट क्षेत्र २४,०८७ चौ.कि.मी. आहे. हिमाचल प्रदेश व पंजाबमधून ही नदी पुढे वाहत जाऊन मिठाणकोट येथे पाकिस्तानात सिंधू नदीला मिळते. सतलज नदीवरील भाक्रा-नागल, हरिके व सरहिंद प्रकल्पाद्वारे जलसिंचन व जलविद्युतनिर्मिती केली जाते. झास्कर व बृहद हिमालयादरम्यान वाहत असताना ती घळई निर्माण करते. पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला मिळण्याअगोदर सतलज नदीला उजव्या बाजूने बियास नदी येऊन मिळते. पुढे फिरोजपूर ते फाजिल्कापर्यंत ही नदी भारत व पाकिस्तानची सीमारेषा निश्चित करते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : भारतीय ऋतू आणि त्यांचे वर्गीकरण

सिंधू पाणीवाटप करार

हा करार भारत-पाकिस्तान या दोन देशादरम्यान जागतिक बँकेच्या म्हणजे तत्कालीन IBRD च्या पुढाकाराने झाला. या करारावर १९ सप्टेंबर १९६० मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांनी कराची येथे स्वाक्षऱ्या केल्या. हा करार अस्तित्वात आल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये दोन युद्धे झाली. परंतु हा करार एकदाही स्थगित झालेला नाही. या करारानुसार तीन पश्चिम वाहिनी नद्यांचे म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब यांचे नियंत्रण पाकिस्तानकडे देण्यात आले आहे, तर तीन पूर्व वाहिनी नद्यांचे रावी, बियास आणि सतलज यांचे नियंत्रण भारताकडे सोपविण्यात आले आहे. पाकिस्तानकडे नियंत्रण देण्यात आलेल्या पश्चिम वाहिनी नद्या सर्व प्रथम भारतातून वाहतात. यामुळे या नद्यांतील पाण्याचा वापर भारत केवळ सिंचन, वाहतूक व वीजनिर्मितीसाठी करू शकतो. याशिवाय सिंधू नदीच्या एकूण पाण्यापैकी केवळ २० टक्के एवढे पाणी भारताला वापरण्यास या करारातील तरतुदींनी परवानगी दिली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography indus river system mpup spb
First published on: 20-06-2023 at 15:33 IST