सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण महाराष्ट्रात आढळणाऱ्या मुख्य खनिज संपत्तीचा आढावा घेतला. या लेखातून आपण महाराष्ट्रातील प्रमुख क्षयक्षम ( Non Renewable Energy Sources) आणि अक्षयक्षम ( Renewable Energy Sources) ऊर्जा संसाधनांबाबत जाणून घेऊ. मात्र, त्यापूर्वी ऊर्जा संसाधने ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. ऊर्जा संसाधने म्हणजे घरगुती व औद्योगिक कारणांसाठी लागणारी ऊर्जा (वीज, उष्णता, प्रकाश) तयार करण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर केला जातो, त्याला ऊर्जा संसाधने, असे म्हणतात. मानवी विकास असो किंवा राष्ट्राचा विकास असो, ऊर्जा हा विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे ऊर्जा संसाधनांच्या वापराच्या अवस्थेनुसार राष्ट्राची प्रगती ठरते.

ऊर्जा संसाधनांचे प्रामुख्याने दोन भागांत वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे क्षयक्षम ऊर्जा संसाधने आणि दुसरे म्हणजे अक्षय ऊर्जा संसाधने.

१) क्षयक्षम ऊर्जा संसाधने/ पारंपरिक ऊर्जा संसाधने (Non-renewable energy resources) : ही अशी ऊर्जा संसाधने आहेत की त्यांचा वापर केल्याने त्यांच्या साठ्यामध्ये घट होते. उदाहरणार्थ दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू इत्यादी. मानवी आयुष्याच्या कालावधीत या नूतनीकरण होऊ शकत नाही म्हणून त्यांना अनूतनीक्षम (नॉन-रिन्यूएबल) ऊर्जा संसाधन असेही म्हणतात.

२) अक्षय ऊर्जा संसाधने /अपारंपारिक उर्जा संसाधने (Renewable energy resources): ज्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर केल्याने ते नैसर्गिकरित्या स्वतःच्या साठा भरून काढू शकतात, त्यांना अक्षय ऊर्जा संसाधने म्हणतात. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा , भू औष्णिक ऊर्जा. यांनाच शाश्वत ऊर्जा संसाधने म्हणून सुद्धा संबोधले जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात खनिजसंपत्ती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते?

महाराष्ट्रात उपलब्ध असलेली क्षयक्षम ऊर्जा साधनसंपत्ती खालीलप्रमाणे :

  • दगडी कोळसा
  • खनिज तेल व नैसर्गिक वायू
  • अणुशक्ती
  • जलविद्युत
  • औष्णिक विद्युत

१) दगडी कोळसा :

भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या महाराष्ट्रातील दगडी कोळसा हा गोंडवाना काळातील दामुदा मालेत व बाराकार खडकात पाहावयास मिळतो. राज्यात कोळशाचे ५,००० दशलक्ष टन साठे आहेत. भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४% कोळशाचा साठा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सर्व दगडी कोळसा हा अकोकक्षम आहे.

कोळशाची पुढील तीन क्षेत्रे आहेत :

अ) वैनगंगा खोरे : नागपूर जिल्ह्यातील कामठी, उमरेड, पाटणसावंगी या प्रदेशांत दगडी कोळसा आढळतो.

ब) वर्धा खोरे : वरोडा, बल्लारपूर, दुर्गापूर-वणी इत्यादी ठिकाणी कोळशाचे साठे आहेत. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वांत मोठे साठे बल्लारपूर (चंद्रपूर जिल्हा) येथे आहेत.

क) यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग : या प्रदेशात घुग्गुस-तेलवासा, सास्ती-राजुरा, इत्यादी ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

२) जलविद्युत :

जेव्हा पर्वताच्या उतारावरून वेगाने पाणी खाली येते, त्यापासून पाण्याच्या गतिशील प्रवाहाचा वापर करून वीज निर्माण केली जाते. प्रथमतः पाणी उंचावर नेऊन, या जलाशयामधून मोठ्या आकाराच्या पाइपमधून ते पाणी पुन्हा उतारावरून खाली आणले जाते. या सखल भागात पाणचक्क्या (डायन्यामो) बसवलेल्या असतात. त्यावर पाणी वेगाने सोडल्यावर पाणचक्क्या फिरू लागतात आणि वीज निर्माण होते.

अ) कोयना जलविद्युत केंद्र : कोयना जलविद्युत केंद्रास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटले जाते. महाराष्ट्राच्या प्रद्योगिक विकासात कोयना जलविद्युत केंद्राचा सहभाग महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील आण्विक, औष्णिक व जलविद्युत केंद्रामधून निर्माण होणारी वीज एकत्र करून संपूर्ण राज्यात विद्युत जाळे उभारण्यात आले आहे. कृष्णा नदीची उपनदी कोयना नदीवर हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे धरण बांधून पाणी अडविण्यात आले आहे. या धरणामुळे विस्तृत जलाशय निर्माण झालेला असून, शिवसागर’ नावाने तो ओळखला जातो. शिवसागर जलाशयातील पाणी ४ कि.मी. लांबीच्या बोगद्यात सोडले जाते. या बोगद्याची त्रिज्या ३.२ मीटर आहे. तेथे टर्बाइन्स व जनित्रे असून, वीजनिर्मिती केली जाते.

ब) पश्चिम घाटातील जलविद्युत प्रकल्प : महाराष्ट्रात मुख्य जलविद्युत प्रकल्प हे पश्चिम घाटात उभारलेले आहेत. घाटावर भरपूर पाऊस पडतो. घाटामुळे जलप्रवाहांना पुरेसा वेग प्राप्त होतो आणि नैर्ऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात पाऊस पडत असल्याने कायम वीजनिर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती असते. जायकवाडी- पैठण जलविद्युत प्रकल्प मराठवाड्यात गोदावरी नदीवर आहे. त्याच्या पायथ्याशी रिव्हर्सेबल टर्बाइन्स बसविलेले आहे. त्यांच्या आधारे सुमारे १२ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे.

३) औष्णिक विद्युत :

दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायूपासून औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी कोळशाच्या आधारे औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. विदर्भातील कोराडी, खापरखेडा, बल्लारपूर, दुर्गापूर ही केंद्रे औष्णिक ऊर्जानिर्मितसाठी सोईची आहेत.

अ) कोकणातील औष्णिक विद्युत केंद्रे : कोकणात चोला व तुर्भे (ट्रॉम्बे) या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्रे आहेत. चोला (ठाणे) जिल्ह्यात उल्हास नदीच्या खाडीच्या कडेला औष्णिक विद्युत केंद्र आहे. या केंद्रापासून मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण-पुणे, मुंबई-कल्याण-इगतपुरी रेल्वेमार्गाकरिता विद्युत पुरवठा केला जातो.

ब) पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र : पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकजवळ एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले आहे.

क) खानदेशामधील औष्णिक विद्युत केंद्र : खानदेशात जळगाव जिल्ह्यात भुसावळजवळ फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारले गेले आहे. त्याचा फायदा खानदेशच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला होत आहे.

ड) मराठवाड्यातील औष्णिक विद्युत केंद्र : परळी हे बीड जिल्ह्यातील औष्णिक केंद्र आहे.

इ) विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्रे : महाराष्ट्रात औष्णिक विद्युत केंद्रांचा विकास मुख्यत्वेकरून विदर्भात झालेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारा दगडी कोळसा होय. विदर्भात एकूण पाच औष्णिक विद्युत केंद्रे कार्यान्वित झालेली आहेत. अकोला जिल्ह्यातील पारस, नागपूरमध्ये कोराडी, नागपूरच्या वायव्येस खापरखेडा, चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूरजवळ दुर्गापूर, चंद्रपूरच्या दक्षिणेस बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र असून, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर व बल्लारपूर यांची एकत्रित विद्युतसम १८,४० मेगावॉट आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची भूगर्भ रचना नेमकी कशी आहे?

४) अणुविद्युत/अणुऊर्जा :

अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी युरेनियम, थोरियम, लिथियम यांसारख्या आण्विक इंधनाचा वापर केला जातो. महाराष्ट्रात मुंबई तारापूर अणुकेंद्र व तारापूर येथे अणुशक्तीची केंद्रे आहेत. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, ट्रॉम्बे मुंबईला तुर्भे येथे सहा अणुभट्ट्या आहेत : (१) अप्सरा अणुभट्टी, (२) सायरस अणुभट्टी, (३) झर्लिना अणुभट्टी, (४) पूर्णिमा – १ व (५) पूर्णिमा – २, (६) ध्रुव.

५) खनिज तेल व नैसर्गिक वायू :

बॉम्बे हाय : मुंबईजवळ पश्चिमेला १७६ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात ३ फेब्रुवारी, १९७४ रोजी ‘सागरी सम्राट’ने पहिली विहीर खोदली. हे तेलक्षेत्र ‘बॉम्बे हाय’ नावाने ओळखले जाते. भारतातील खनिज तेलाचे ५० टक्के उत्पादन बॉम्बे हाय तेलक्षेत्रामधून मिळते. भारतात १९७६ साली नैसर्गिक वायूचे उत्पादन नगण्य होते; परंतु १९९०-९१ साली नैसर्गिक वायूचे उत्पादन ७८२ दशलक्ष घनमीटरपर्यंत वाढले.
महाराष्ट्रात उपरोक्त क्षयक्षम प्रकारची ऊर्जा साधनसंपत्ती आढळते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian geography renewable and non renewable sources in maharashtra mpup spb
First published on: 12-10-2023 at 17:56 IST