मागील लेखातून आपण संसदेची रचना तसेच संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांचा कार्यकाळ, त्यांच्या सदस्यत्वासाठी लागणारी पात्रता, त्यांना देण्यात येणारी शपथ आणि वेतन याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण संसदेच्या कामकाजातील महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण प्रश्नोत्तराचा तास म्हणजे काय? तसेच शून्य प्रहर म्हणजे काय? आणि या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? याबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – UPSC-MPSC : संसदेचा कालावधी किती असतो? संसद सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता काय?

प्रश्नोत्तरांचा तास :

संसदीय बैठकीचा पहिला तास हा प्रश्नोत्तराचा तास असतो. हा तास संसदेमधला सगळ्यात जिवंत कालावधी असतो असं म्हणता येईल. या तासाभराच्या काळात सभागृहाचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारतात आणि मंत्री त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो. गेल्या काही वर्षांत संसद सदस्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्यासाठी प्रश्नोत्तरांचा तास या संसदीय आयुधाचा यशस्वी वापर केला आहे. त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सरकारी पातळीवरील आर्थिक अनियमितता उघड होऊ शकली आहे. सरकारी कार्यपद्धतीची माहिती सार्वजनिक झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे १९९१ पासून प्रश्नोत्तरांच्या तासाचं दूरचित्रवाहिनीवरून प्रसारण सुरू झाल्यामुळे संसदेच्या कामकाजातील हा भाग पाहणं लोकांना शक्य झालं आहे.

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारण्यात येणारे प्रश्न हे साधारण तीन प्रकारचे असतात. १) तारांकित प्रश्न २) अतारांकित प्रश्न आणि ३) अल्प सूचना प्रश्न. यापैकी तारांकित प्रश्न म्हणजे असे प्रश्न, ज्याची उत्तरे तोंडी देणे आवश्यक असते. अशा प्रश्नांना पूरक प्रश्न विचारता येतात. अतारांकित प्रश्न म्हणजे असे प्रश्न, ज्याची उत्तरं लेखी देणे आवश्यक असते. अशा प्रश्नांना पूरक प्रश्न विचारले जाऊ शकत नाही; तर अल्प सूचना प्रश्न म्हणजे असे प्रश्न, जे दहा दिवसांपेक्षा कमी कालावधीची नोटीस देऊन विचारले जातात.

प्रश्नोत्तरांच्या तासातील सातत्य

संसद सदस्यांनी प्रश्न विचारणं, संबंधित मंत्र्यांनी उत्तरं देणं ही प्रक्रिया प्रश्नोत्तराच्या तासावर अवलंबून असते. संसदेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे १९५२ मध्ये लोकसभेच्या नियमानुसार प्रश्नोत्तराचा तास रोज असणार होता, तर राज्यसभेतील तरतुदीनुसार प्रश्नोत्तराचा तास आठवडय़ातून दोन वेळा होता. काही महिन्यांनंतर तो आठवड्यातून चार वेळा होईल, असा बदल करण्यात आला. त्यानंतर १९६४ पासून राज्यसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास दररोज करण्यात आला.

प्रश्नोत्तराचा तास केव्हा नसतो?

दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तरांचा तास रोज असतो. त्यासाठी फक्त दोन दिवसांचा अपवाद केला गेला आहे. निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होतं आणि या सरकारचं संसदेचं पहिलं अधिवेशन असतं तेव्हा राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या खासदारांना उद्देशून अभिभाषण करतात तेव्हा प्रश्नोत्तरांचा तास नसतो. जानेवारीमध्ये नवं वर्ष सुरू झाल्यानंतर जे पहिलं अधिवेशन असेल तेव्हा राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या खासदारांना उद्देशून भाषण करतात. तेव्हाही प्रश्नोत्तरांचा तास होत नाही. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात, त्या दिवशीही प्रश्नोत्तरांचा तास नसतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट यांच्यात नेमका काय फरक आहे? त्यांची रचना अन् कार्ये कोणती?

शून्य प्रहर

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शून्य प्रहर सुरू होतो आणि त्या दिवसांचा अजेंडा सुरू होईपर्यंत हा शून्य प्रहर सुरू राहतो. या दरम्यान, संसद सदस्य तातडीचे राष्ट्रीय महत्त्वाचे तसेच मतदारसंघामधले प्रश्न उपस्थित करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे शून्य प्रहर या वाक्प्रचाराचा संसदेच्या प्रक्रियेच्या नियमांमध्ये कुठेही उल्लेख नाही. संसदेच्या कामकाजाच्या परिक्षेत्रामधील ही संकल्पना १९६२ पासून सुरू झाली. इथे प्रश्नोत्तराच्या तास आणि शून्य प्रहर यांच्यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्नोत्तराच्या तासाला विचारले जाणारे प्रश्न सदस्यांनी १५ दिवस आधीच दिलेले, लिखित स्वरूपाचे प्रश्न असतात; तर शून्य प्रहरात खासदार ताबडतोबीचे प्रश्न उपस्थित करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian polity what is question hour and zero hour and difference between them spb
First published on: 17-09-2023 at 09:38 IST